Thursday 28 July, 2011

अंक २८वा, २८ जुलै २०११

अधोरेखित *
बाळशास्त्री आता तुम्हीच जन्म घ्यावा*
आद्य पत्रकार कै. बाळशास्त्री जांभेकर स्मारकाच्या नावाखाली जिल्हा प्रशासन आणि बांधकाम विभागाने आकड्यांचा खेळ केला आहे. बाळशास्त्रींच्या नावावर त्यांच्याच गावात (पोंभुर्ले, ता. देवगड) ५० लाख खर्ची पाडून ‘घेण्याचा‘ प्रशासनाचा घोटाळा माहिती अधिकार कायद्याने उघडकीला आणला. स्मारकासाठी राज्य मंत्रीमंडळाकडून मंजूर झालेला निधी वाटेल तसा खर्ची करुन सर्वसामान्य जनतेच्या सार्वजनिक पैशाबाबत मनमानी करण्याच्या प्रवृत्तीविरोधात सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वास्तविक सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघानेच कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी पहिल्यापासून आग्रही भूमिका घेतली. बाळशास्त्रींच्या पोंभुर्ले या जन्मगावात जाण्यासाठी १९८७ पूर्वी धड रस्ताही नव्हता. सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांच्या नेतृत्वाखाली सतत तगादा लावून गावाला जोडणारा रस्ता करुन घेतला. सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष गजानन नाईक यांचा तो ऐन उमेदीचा काळ. त्यावेळी पहिल्यांदा ६ जानेवारी १९८७ चा पत्रकार दिन. दर्पणकारांच्या जन्मस्थळी साजरा झाला आणि पायाभूत विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित राहिलेल्या पोंभुर्लेला विकासाचा मार्ग मिळाला. आता बाळशास्त्रींच्या स्मारकाकडे जाणारा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून होऊ घातला आहे. बाळशास्त्रींच्या जन्मगावाचे आणि पर्यायाने बाळशास्त्रींचे स्मरण करण्याच्या आंतरीक प्रेरणेने सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने त्यावेळी विकासाची बीजे पेरली, हे विसरुन चालणार नाही.
त्यानंतर ओरोस जिल्हा मुख्यालयात कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे स्मारक (पत्रकार भवन) व्हावे म्हणून सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने दोन दशके सतत मागणी केली. त्याचा परिपाक म्हणून श्री. शशिकांत सावंत सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष असताना ओरोस येथे झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत बाळशास्त्री जांभेकर स्मारकासाठी ५० लाख जाहीर करण्यात आले. कोकण पॅकेजमधून जाहीर झालेल्या या निधीला तेव्हापासूनच पाय फुटले. जिल्हा मुख्यालयात मागणी असताना हा निधी पोंभुर्लेकडे वळता झाला तरीही जिल्ह्यातील पत्रकारांनी त्याला विरोध केला नाही. कारण जागेपेक्षाही बाळशास्त्रींचे यथोचित स्मारक होण्यालाच सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे प्राधान्य आहे. परंतु या स्मारकाच्या नावावर बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाने आकड्यांचेच खेळ चालविल्याची बाब चर्चेत आली आणि स्मारकाचा विषय प्रशासनाच्या अपारदर्शक भुकिकेमुळे वादग्रस्त बनला, मग तो स्थानिक पातळीवरचा असो की जिल्ह्यातील पत्रकारांना विश्वासात घेण्याच्या मुद्द्यावर असो, दोन्ही बाजूंनी वादाला तोंड फुटले, तेव्हा माहिती अधिकार कायद्याखाली नेमकी वस्तुस्थिती जाणून घेण्याचा निर्णय झाला. निधीचे नियोजन करणा-या जिल्हा नियोजन कार्यालयाकडे माहिती अधिकारात अर्ज करण्यात आला. तो स्विकारण्या पासूनच टाळाटाळ सुरु झाली. चक्क शासकीय माहिती
अधिका-यानेच दर्पणकार कै. बाळशास्त्री जांभेकर स्मारकाच्या सद्यस्थिती बाबतची माहिती देता येणार नाही असे कळवून शक्य तेवढी माहिती लपविण्याचाच प्रयत्न केला. मात्र आम्हा घरी ‘धन‘ शब्दाचीच रत्ने म्हणणा-या पत्रकारितेने जेव्हा ‘प्रहार‘ सुरु केले तेव्हा मात्र अधिका-यांचा नाईलाज झाला. शक्य ते सर्व प्रयत्न करुन माहिती दडविण्याचा आटोकाट प्रयत्न करणा-या जिल्हा नियोजन कार्यालयाला सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या रेट्याने अपुरी का होईना, शक्य तेवढ्या विलंबाने स्मारका बाबतची माहिती उघड करावी लागली. तेव्हा समोर आलेले आकडे भंडावून सोडणारे होते.
पोंभुर्ले येथे कै. बाळशास्त्री जांभेकर यांचा अर्धकृती पुतळा, त्यांच्या ‘दर्पण‘ वृत्तपत्राच्या नावाने सभागृह अगोदरच उभे राहिले आहे. बाळशास्त्रींचे वंशज असलेल्या जांभेकर कुटुंबाच्या खाजगी जागेत ही इमारत उभी असतांना त्याच इमारतीच्या पहिल्या माळ्यावर अतिथीगृहाचे बांधकाम करुन तब्बल १९ लाख ७७ हजार १८१ रुपये खर्ची घालून ‘घेण्याची‘ नामी शक्कल प्रशासनाने लढवली. यासंदर्भात माहिती अधिकार कायद्याने दिलेल्या टिप्पणीत चक्क अधिका-यांनीच ही वस्तुस्थिती मान्य केली आहे. खर्चाच्या विभागणीत ‘अस्तित्वातील इमारतीवरच अतिथी गृहाचे बांधकाम करणे‘ असा स्पष्ट उल्लेख करण्याचा ‘प्रामाणिकपणा‘ कुडाळ येथील सार्वजनिक बांधकामच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी दाखवला आहे. जेमतेम सव्वा गुंठे जागेत अस्तित्वात असलेल्या इमारतीवरच खर्च करण्याची बादशाही (की नोकरशाही?) प्रवृत्ती चीनच्या जगप्रसिद्ध भितीशी स्पर्धा करणारी आहे. जेमतेम सव्वा गुंठे जागेत उभारण्यात
येणा-या संरक्षक भितीवर अंदाजपत्रकात तब्बल १४ लाख ११ हजार ३५२ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बांधकामचे सगळे ‘आदर्श‘ नमुने वापरले तरी एवढी खर्चीक संरक्षक भित सिधुदुर्गशिवाय जगाच्या पाठीवर कदाचित कुठेही मिळणार नाही. त्यामुळे संरक्षक भितीवरील निधीच्या खर्चाच्या बाबतीत तरी चीनला मागे टाकल्याचे समाधान बांधकाम विभागातील अधिका-यांना मिळाले असेल. अधिका-यांच्या या विक्रमाची नोंद शासन घेईल तेव्हा घेईल, तूर्तास तरी माहिती अधिकार कायद्याने कागदावर याची नोंद घेतली आहे. त्यामुळे शासनाला विक्रम मान्य करण्यासाठी वेगळ्या प्रमाणपत्राची गरज लागू नये, एवढे चोख काम बांधकाममधील अधिका-यांनी बजावले आहे.
पाईप आणि मो-यांच्या बांधकामात तर सिधुदुर्गच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा हात कोणीही धरु शकणार नाही. प्रस्ताविक स्मारकामध्येही मो-या आणि पाईपचे बांधकाम मोठ्या खुबीने करण्याचे बांधकाम विभागाने योजले आहे. त्यासाठी ९६ हजार ७९५ रुपये खर्चाचे अंदाजपत्रक आहे. त्यामुळे अधिका-यांच्या या कल्पकतेला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे.
मुख्य रस्त्यापासून अस्तित्वात असलेल्या इमारतीपर्यंतचे अंतर जेमतेम ७५ ते १०० मीटर असेल. या इमारतीकडे जाणारा एकमेव रस्ता जांभेकर कुटुंबियांच्या जागेतून जातो. मात्र हा एकमेव रस्ता कदाचित पुरेसा ठरणारा नसेल. म्हणूनच अंतर्गत ‘रस्ते‘ काढण्यासाठी तब्बल ६ लाख १३ हजार ३६३ रुपयांची तरतूद अंदाजपत्रक अगोदरच अधिका-यांनी करुन ठेवली आहे. अन्यथा जेमतेम शंभर मीटरच्या रस्त्याचे ‘रस्ते‘ होऊन एवढा निधी खर्ची पडला नसता.
निधी खर्ची करण्याचे शंभरटक्के उद्दिष्ट गाठण्या साठी बांधकाम विभागाचे एवढे मोठे प्रताप बघून कोणाचेही डोळे दिपणे स्वाभाविक आहे. त्यामुळे विद्युतीकरण, विहीर दुरुस्ती, मोटर पंप आणि इतर कामांसाठी तब्बल ८ लाख ७९ हजार ५२० रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद अधिका-यांनी करुन ठेवल्याने निधी खर्चाच्या बाबतीत ‘नियोजन‘ करुन विकास आणि शोध पत्रकारितेला अधिका-यांनी प्रचंड वाव दिल्याने ते देखील अधिका-यांचे योगदान मानून भविष्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘बांधकाम‘चे असे ‘आदर्श‘ उभे राहिल्यास आश्चर्य वाटायला नको. परंतु पत्रकारितेतील आमचे दैवत म्हणून बाळशास्त्री आता आपणच जन्म घ्यावा; हे आमच्या सारख्या येरा गबाळ्याचे काम नव्हे.
ओंकार तुळसुलकर, सावंतवाडी * ९४२३३०१७६२


संपादकीय *
सारे काही विकासाच्या नावाने
सिधुदुर्ग जिल्ह्यात गेला पंधरवडाभर अतिवृष्टीमुळे हवामानात थंडावा असला तरी राजकीय वातावरण मात्र तापलेले होते. सत्ताधारी आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन पक्षांतच ही शाब्दीक लढाई जुंपली होती. तशी ती नेहमीच चालू असते. अर्थात हे वाद जिल्ह्याच्या विकासाकरिता नसून आपल्या किवा आपल्या पक्षाला श्रेय मिळावे यासाठी असतात. हे त्या संबंधीच्या ज्या बातम्या प्रसिद्ध होत असतात त्यावरुन दिसून येते.
जिल्हा नियोजन विकास मंडळासाठी २०१०-११ या आर्थिक वर्षात आपण ९० कोटी रुपये आणले असे पालकमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. त्या निधीतील ९९ टक्के रक्कम विविध विकास कामांवर खर्च पडल्याचे नियोजन मंडळाच्या नुकत्याच झालेल्या सभेत सांगण्यात आले. याच सभेत त्यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व अन्य रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत असे सांगून निकृष्ट काम करणा-यांवर कारवाई होईल असेही सांगितले. यावर्षीच नवीन तयार केलेल्या किवा दुरुस्त केलेल्या रस्त्यांची पहिल्याच पावसामुळे कशी दुर्दशा झाली ते पालकमंत्र्यांनी प्रत्यक्षच पाहिले असणार. दुर्गम ग्रामीण भागात ब-याच ठिकाणी ओढ्या, नाल्यांवर साकव नाहीत. शेती आणि पिण्यासाठी पाणी पुरवठा करणारे तलाव, पाटबंधारे गाळमातीने भरले आहेत. त्यामुळे पाणी साठा कमी होऊन उन्हाळ्यात पाणी टंचाई होते. त्याबाबत कसलीही उपाययोजना झालेली नाही. जिल्हा परिषदेमार्फत अनेक योजनांसाठी साहित्य खरेदी केली जाते. त्यामध्ये शालेय मुलींसाठी सायकली, महिलांसाठी शिलाई मशिन्स, गावात स्ट्रीट लाईट, ग्रामीण रुग्णालयांसाठी औषधांची खरेदी, शेती, अवजारे, कीटकनाशके अशा अनेक साहित्यांच्या खरेदीत निकृष्ट दर्जाचे साहित्य घेऊन बाजारभावापेक्षा जास्त दराने पुरवठा ठेकेदारांना पैसे अदा केले जातात. ग्रामीण भागातील लोकांना ते साहित्य अल्प दराने दिले जाते. लवकरच ते भंगारात काढावे लागते इतके ते हलक्यादर्जाचे असते. पण इकडे या योजनांसाठी मंजूर झालेले पैसे मात्र शंभर टक्के खर्च झालेले असतात. अर्थात टेंडर प्रक्रिया करुन कागदोपत्री सर्व काही ‘नीट‘ असते. या योजनांमध्ये ‘लाभार्थींना‘ मिळणारी वस्तू ही पन्नास टक्केहून कमी दरात मिळते. त्यामुळे ते खूष असतात. तर या सर्व योजनांना मंजूरी देणा-यांना निम्मेहून अधिक टक्क्यांचा फायदा होत असतो. त्यामुळे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होणा-या विरोधी पक्षाच्या लोकांच्या तक्रारी पलिकडे कोणाचीच कसली तक्रार नसते. आता बातमी हा काही पुरावा होऊ शकत नाही आणि विरोधकांकडे काही कागदोपत्री पुरावे नसतात.
असे सगळे या सिधुदुर्ग जिल्ह्यातच चाललेले आहे असे नाही, तर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे. केवळ जिल्हा परिषदेतच हे घडते असे नव्हे. बहुतेक सर्व खात्यांमध्ये हे प्रकार वर्षानुवर्षे चाललेले आहेत.
पालकमंत्री नारायण राणे दीर्घकाळ मंत्री पदावर आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जिल्हा विकासाच्या मुद्यावर प्रत्येक सभेत ते तळमळीने बोलतात. जिल्हा लहान असूनही आपण एवढा मोठा निधी मंजूर करुन आणला, पण अपेक्षित गतीने आणि अपेक्षित दर्जाने कामे होत नाहीत, याबद्दल खंत व्यक्त करीत असतात. त्याबद्दल ते संबंधीत सरकारी अधिका-यांना आणि आपल्या पक्ष कार्यकर्त्यांनाही खडे बोल सुनावतात. पक्ष कार्यकर्ते व पदाधिका-यांनी त्यांनी या विकास कामांमध्ये लक्ष घालून कामे दर्जेदार होतील. याबाबतीत दक्ष असले पाहिजे. त्यांना मिळालेल्या सत्तेतील पदांचा उपयोग त्यांनी जनहितार्थ केला पाहिजे असे ते नेहमी सांगत असतात.
प्रत्यक्षात पालकमंत्री आपल्या मंत्रिपदाचा कारभार पाहण्यासाठी मुंबईला गेले की, इकडे सगळे सामसूम होते. राणे साहेब जिल्ह्यात असतांना त्यांच्या अवतीभोवती वावरणारे कार्यकर्ते, पदाधिकारी मागाहून निरनिराळ्या कार्यक्रमांच्या व्यासपीठावरुन श्रेयाच्या आणि विकासाच्या गोष्टी सांगायला मोकळे होतात.
जिल्हा परिषद राणे यांच्या वर्चस्वाखालील काँग्रेस पक्षाकडे आहे. जिल्ह्याचे तीन आमदार तीन तीन वेगवेगळ्या पक्षांचे त्यातील सत्ताधारी आघाडीतील. पण दोघांतही मतैक्य नाही. त्यामुळे विकासाच्या राजकारणापेक्षा एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या राजकारणात सगळे मग्न आहेत. त्या संबंधीच्या वृत्तपत्रातील उलटसुलट रसभरीत बातम्या वाचून लोक आपले मनोरंजन करुन घेत आहेत. विकासाचे कोणाला काय पडले आहे?

विशेष *
मध्वानुभव
पशुसंवर्धन खात्यात (सरकारी) नोकरी करीत असतानाचे २-३ किस्से आजही आठवतात. ऑडिट, ऑडिटर, सरकारी पद्धतीने जमा खर्चाच्या नोंदी ठेवणे, औषधेसाठा वापर या नोंदी ठेवणे, सरकारी पत्रव्यवहार या गोष्टी कॉलेजमध्ये शिकवल्या जात नसल्यामुळे सुरुवातीला खूप पंचाईत झाली होती. पण हळुहळू ‘जुने रेकॉर्ड‘ पाहुन पाहुन ‘मार्गस्थ‘ होणे जमू लागले. एकदा एका ‘ऑडिट पॉईंट‘ मध्ये पूर्वीच्या अधिका-याच्या नांवे रु. ११/- (अक्षरी रु. अकरा फक्त) ची रिकव्हरी दाखवली होती. सदर अधिका-याचे दुर्देवाने निधन झाले होते. त्यामुळे नियमानुसार त्याच्या वारसांकडूनही ‘अमाऊंट रिकव्हर‘ करावी लागेल असे मार्गदर्शन मला करण्यात आले. केवळ अकरा रुपयांसाठी वारस तपास वगैरे गोष्टी माझ्या आकलनाबाहेरच्या असल्यामुळे मी व माझे सहका-यांनी मिळून स्वतःच्या खिशातले पैसे जमा करुन विषय संपुष्टात आणला. (सदर रक्कम मिळविण्यासाठी ‘खोटी फिरती दाखवा‘ असा मौलिक व अनुभवी सल्लाही दिला गेला होता.)
एकदा एका योजनेमध्ये ‘शेतक-यांना नर-कोंबडे‘ वाटप केले गेले होते. सदर योजनेची ‘फाईल‘ घेऊन या असा ऑडिटरसाहेबांचा निरोप होता. मी (नवीन असल्याने) निरोप येताच फाईल घेऊन गेलो. कोंबडे वाटपाची फाईल (सकाळी) बघण्यात त्यांना इंटरेस्ट नव्हता. ही फाईल संध्याकाळनंतर पहावी लागते असे सूचक - सांकेतिक भाषेत सांगण्यात आले. पण मी ‘नव-खा‘ असल्याने मला अर्थबोध की खाद्यबोध झाला नाही. शेवटी येथेही एक कार्यालयीन शिपाई (कृष्णा असे त्याचे नाव होते व तो ‘कार्यालयाचा पोटपूजा‘ हा विषय समर्थपणे संभाळत असे) मार्गदर्शक ठरला. तो उत्कृष्ट खानसामा होता. त्याने एकूणच ऑडीट पार्टी, वरिष्ठांच्या भेटीची व्यवस्था इ. बंदोबस्ताचे संदार्भात मला ‘सार्थ सज्ञानी‘ केले. काय करणार? ध्र्ण्ड्ढद न्र्दृद्व द्धदृथ्र्ड्ढ डड्ढ ण्ठ्ठध्ड्ढ ठ्ठद्म द्धड्ढठ्ठथ्र्त्ड्ढदड्डद्म किवा पाण्यात राहून माशांशी वैर धरु नये अशा काही ‘टीप्स‘ याच प्रकारचे महागुरुंकडून दिल्या गेल्यामुळे एकूणच नोकरीतील दिवस संस्मरणीय ठरले.
जवळ जवळ एक तप मी राजापूर तालुक्यात नोकरी केली. ४० वर्षापूर्वी अनेक ठिकाणी पायीच फिरती करावी लागे. माझ्या स्मरणाप्रमाणे मी सर्व (म्हणजे सुमारे १३५) गावी चालतच गेलो आहे. एकदा तर संपूर्ण दिवसात २० कि.मी.चाललो होतो. तो किस्सा खूप काही अनुभव देऊन गेला. एका गावी पूर्वसूचनेनुसार दुपारी गुरांना लस टोचणीसाठी जायचे होते. सकाळी ९ च्या दरम्यान एस.टी तून उतरलो. शिपाई आदल्या दिवशीच पोचल्याने मी एकटा होतो. या स्टॉप पासून ५-६ कि.मी. (सुमारे २ तास) वर नियोजित गाव होते. स्टॉपपाशीच एक ओळखीचे घर होते. त्यांनी मला पाहताच ‘कपभर दूध घेऊन जा‘ असा आग्रह केला. तो दिवस श्रावण सोमवार होता. मी नॉर्मली उपास वगैरे करत नाही. पण त्या दिवशी ‘श्रावण सोमवार‘ करावा असे वाटले. मी दूध आवडत नसल्याने दुधाला नकार दिला. घरातील एक वृद्ध बाई ‘अहो, दूधाला नाही म्हणू नये‘ असेही म्हणाल्या. पण मी न ऐकताच मार्गस्थ झालो. गावात पोचून गुरं टोचून होईपर्यंत देान वाजून गेले. एकदा बीन दुधाचा चहा घेतला. उपास सोडण्याच्या हेतूने तासभर चालत चालत एका ‘बांधवाच्या‘ घरी गेलो. पहातो तर त्यांच्या घराला कुलूप!!! कोकणातील खेडेगावातील एकांडे घर. जवळपास माणसांच्या ‘पायरव‘ नाही. तेथून फक्त अर्धा तास चालल्यावर दुस-या परिचिताचे घर होते. त्यांच्याकडे पोचलो. सुदैवाने ‘ते‘ होते. गंमत म्हणजे त्यांच्या घरी नुकतीच गाय व्यायली होती. त्यामुळे ‘ग्लासभर दूध‘ घेऊन ‘पाहुणचार‘ केला. मी सकाळचा दूधाचा नकार, श्रावण - सोमवारचा उपास ही सर्व कथा सांगून सकाळपासून बिनदूधाचा एक कप चहा, व आत्ताचे दूध एवढ्यावरच असल्याचे सांगितले. माझ्या तोंडून उपास हा शब्द ऐकून त्यांनी ‘त्यांच्या‘ घरी ‘उपास‘ सोडण्याबाबतची ‘अडचण‘ सांगितली. मी भूकेने कासाविस झालो होतो. तेथून त्या गावच्या सीमेवर सुमारे तासभर चालत त्यांनी मला माझ्या एका ‘बांधवाकडे‘ पोच केले. सूर्यास्ताच्या दरम्यान स्नानादिकृत्ये आटपून मी श्रावण सोमवारचा उपास सोडला. विशेष म्हणजे यममानांनी ‘भोजनदक्षिणाही‘ दिली. रात्रौ दिवसभरच्या पायपिटीमुळे झोप कधी लागली ते कळलचं नाही. सकाळी उठल्यावर समोर (चहा ऐवजी) कपभर दूध आले. मी कालचा सर्व प्रसंग आठवून मुकाटपणे दूध पिऊन वडिलधा-या यजमानांना नमस्कार करुन त्यांचा निरोप घेतला. या प्रसंगानंतर आजपर्यंत मी केव्हाही दूध घेणार का? या प्रश्नाला ‘होकरच‘ देतो.
मधुकर घारपूरे, सावंतवाडी

आकेरीतील दगडांचे गूढ*
राकट देशा, कणखर देशा,
दगडांच्या देशा
असे कवी नारायण सुर्वे यांनी आपल्या कवीतेत म्हटले आहे. आकेरी व झाराप परिसरात याचा प्रत्यय येतो. विविध आकाराचे शेकडो दगड येथे पहावयास मिळतात. हजारो वर्षे झाली तरी जागच्या जागी घट्ट पकडून हे दगड उभे आहेत. झारापचा चेंडुगुंडा, माणगावचा सुळा गुंडा, तर साळगावचा हत्तीगुंडा असे नामकरण करण्यात आले आहे. वर्षानुवर्ष याच नावाने ते गुंडे म्हणजे दगड ओळखले जातात.
झारापचा ‘चेंडुगुंडा‘ याबाबत असे सांगितले जाते की पांडवांनी गोफणीतून पक्षांना हाकलण्यासाठी दगड टाकला व तो येथील उंच असणा-या उभा दगडावर येऊन पडला. तर पांडव चेंडूफळी खेळत असताना त्यांच्यापैकी भीमाचा चेंडू येथे येऊन थांबला म्हणून त्याचे नाव ‘चेंडुगुंडा‘ असे देण्यात आले अशीही कथा आहे. काही ग्रामस्थ याला भिमाचा चेंडू असे संबोधतात. येथे १५ फूटापेक्षाही उंच असा एक दगड आहे व त्यावर दहा मीटरपेक्षा अधिक व्यास असणारा दुसरा गोल दगड आहे. वर्षानुवर्षे उन्ह, पाऊस झेलत हे दगड उभे आहेत.
साळगाव येथे माऊली मंदिराच्या परिसरात ‘हत्तीगुंडा‘ आहे. हत्तीच्या आकाराचा भला मोठा दगड येथे कसा आला याचे गुढ अद्याप उलगडलेले नाही. या दगडाला निसर्गतःच हत्तीचा आकार आहे. रानटी हत्तीची प्रचंड दहशत माणगाव खो-यात असताना साळगावातील या हत्तीगुंड्याला पाहन रात्रीच्या वेळी एखादा घाबरला तर नवल वाटायला नको.
आकेरी येथील रामेश्वर मंदिराच्या समोर पूर्वेच्या बाजूला दोन काळे दगड दिसतात. हे दोन उंच दगड असून त्यापैकी एक थोडेसे कलंडलेले दिसते. या दगडांनाच ‘सवत पाथर‘ असे म्हटले जाते.
याबाबत ग्रामस्थ एक कथा सांगतात. संपूर्ण गावाचा मानकरी असणा-या आकेरी गावाचा प्रमुख याच्या दोन सवती होत्या. एक आवडती व दुसरी नावडती. दोन्ही सवती एक दिवस कपडे धुण्यासाठी येथील ओहोळावर गेल्या. त्यावेळी राग आल्याने एकीने दुसरीला ढकलले. की त्यामुळे दुसरा दगड थोडासा कलंडलेला दिसतो.
हे स्थळ गावाच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाते. या परिसरातील मंडळी ओटी व काजळ कुंकू असा मान अमावस्या-पौर्णिमेस या स्थळासाठी देतात.
या परिसरामध्ये गुहा असून त्यामध्ये ब-याच वेळा वाघाची वस्ती असल्याचे दिसून येते. या स्थळाकडे जाण्यासाठी आकेरी इथल्या रामेश्वर मंदिराकडून अगर कोळसुंदा या ठिकाणातून डोंगर चढून वर जाता येते.
- वैशाली खानोलकर, झाराप * ९४२११८७७९५

विशेष बातम्या *
गणेशमूर्ती महागल्या!
गणपतीची माती आणि रंगाच्या किमतीमध्ये यंदा ४० ते ४५ टक्के वाढ झाली आहे. १८० रुपयांना मिळणारे शाडू मातीचे पोते २६० रुपयांपर्यंत गेले आहे. दुसरीकडे रंगांच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे नाईलाजाने मूर्तींचे दरही वाढवावे लागले आहेत. साधारण एक फुटाची गणेश मूर्ती ५०० रुपयांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे बाप्पांनाही महागाईच्या झळा बसणार आहेत.

रिक्षाभाडे वाढ - सहा कि. मी. ला १५ रु.
सिधुदुर्ग जिल्ह्यात रिक्षा व्यवसाय गणपती व मे महिना अशा हंगामामध्ये चालतो. बाकीच्या हंगामात रिक्षा व्यवसायात मंदीच असते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शहरांचा विस्तार लहान असल्यामुळे तेवढ्यापुरताच रिक्षा व्यवसाय मर्यादित असतो. एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी भाडे केल्यास परतीच्या प्रवासात परतीचे भाडे मिळत नाही. त्यामुळे रिक्षा व्यवसाय परवडत नाही. दिवसेंदिवस वाढणारी महागाई, दर महिन्याला वाढणारे पेट्रोलचे दर, स्पेअरपार्टचे दर, परिवहन कार्यालयातील वाढलेले शुल्क, अन्य कर तसेच विमा कंपन्यांचे वाढलेले शुल्क यामुळे जिल्ह्यातील ऑटो रिक्षाचालक-मालक संघटनेकडून वेळवेळी रिक्षा भाडे दरवाढीबाबत मागणी करण्यात येत होती. याबाबत जिल्हाधिका-यांसह झालेल्या बैठकीत चर्चा होऊन प्रवासी ऑटो रिक्षाची सुधारित भाडे दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दरवाढीत पहिल्या १ ते ६ किलोमीटरला १५ रु. पुढील प्रत्येक किलोमीटरला ९ रु. असा दर ठरला आहे. ही सुधारीत दरवाढ २३ जुलैपासून अंमलात आली आहे. पालिका हद्दीबाहेर प्रवासाच्या झालेल्या भाड्याच्या ५० टक्के अधिक द्यावे. लगेज दर ६० सेमी ते ४० सेंटिमीटर मापापेक्षा लहान ब्रिफकेस, हँडबॅग आणि सुटकेसशिवाय असणा-या प्रत्येक नगास २ रुपये आकार घ्यावा. जास्त भाडे घेणे, भाडे नाकारणे याबाबत प्रवाशांची तक्रार असल्यास त्यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाशी संफ साधावा असे परिवहन अधिकारी अभिजित हावरे यांनी सांगितले.

बी.कॉम.पदवी परीक्षा निकालः खर्डेकर महाविद्यालय ८४ टक्के
मुंबई विद्यापीठाचया बी. कॉम. पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून खर्डेकर महाविद्यालयातून १२१ पैकी १०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाविद्यालयातून प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे -
रुपाली राजन वेंगुर्लेकर, २) निखिता संतोष वारंग, ३) वंदना उत्तम साळगांवकर. उत्तीर्ण १०१ पैकी ३२ प्रथम श्रेणीत तर ५२ द्वितीय श्रेणीत आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाइ्र, प्राचार्य, प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नांवे पुढीलप्रमाणे *
केळूसकर अजिक्य रा.- ३१५, मठकर उमेश अनिल- ३८२, बागायतकर काशिनाथ चं.- ३९३
घाडी जतीन अनंत- ३१८, होडावडेकर प्रथमेश रा.- ३२४, म्हापणकर समीर श.- ३२८
दळवी कुंदा विलास- ४४४, दळवी सुप्रिया चंद्रकांत- ४७५, घोगळे दयानंद दशरथ- ४१९
कांबळी ज्योत्स्ना रो.- ५०१, कोरगावकर स्वर्णिमा स.- ४६६, नाईक दिपाली महादेव- ४८२
नरसुले जान्हवी सुशील- ५४५, नरसुले कोमल किशोर- ५०९, पंडित कमल विनायक - ३७१
परब गिरिश विठ्ठल- ४०४, राळकर शिवराम स.- ४३५, राऊळ वैशाली सुहास- ४६४
साळगावकर रुपाली शं.- ५२३, साळगावकर वंदना उत्तम- ५५३, वळंजु योगिता रामदास- ४३५
बागकर जया सदानंद- ३०३, बागकर सुगंधा अर्जुन- ३६५, चेंदवणकर स्वप्निल स.- ३५५
दुतोंडकर समाधान चं.- ३६५, फर्नांडीस बोरीस पेद्रू * ३३२, गवंडे अक्षया अशोक- ४७४
गावडे कृष्णा आत्माराम- ४४८, गावडे क्षितिज विलास- ४२०, गावडे रामचंद्र हरिश्चंद्र- ३२५
कामत श्वेता लक्ष्मण- ३४९, खवणेकर पांडुरंग पुं.- ३८७, किनळेकर वैशाली स.- ३८६
कुबल राजेश हरिश्चंद्र- ३७६, मातोंडकर भावेश रविद्र- ३४६, म्हारव पुष्पलता भास्कर- ३६७
मुंडये गोविद बाळकृष्ण- ३४६, नाईक सुविधा अच्युत- ३९९, नार्वेकर राजेश गणपत- ४७१
पांढरे निकिता रमेश- ३४८, परब दिपिका आत्माराम- ३७५, परब कुलदीप बाळकृष्ण- ४१०
परब महेश एकनाथ- ३४९, परब मयुरी अशोक * ४२१, परब प्रविण एकनाथ- २७६
पेडणेकर वाटू रमेश- ४२३, फटजी चित्रा देविदास- ३४०, राणे दक्षता दशरथ- ३८१
राऊळ सुधाकर सुहास- ३४४, राऊळ सुषमा सुदर्शन- ४०५, रेडकर प्रियांका महादेव- ४०५
सागवेकर प्रशांत प्रदिप- ३७५, साळगावकर कमल स.- ३२५, सावंत अंकिता शामसुंदर- ३१०
शिरगावकर तृप्ती वि.- २८२, सुर्याजी सोनाली दशरथ- ३८३, तांडेल नविता भिवा- ४५०
टेमकर दिनेश सुरेश- ३०३, तेंडुलकर शिल्पा भगिरथ- ३४७, तोरसकर स्नेहांकिता ह.- ३७३
तुळसकर शंकर नामदेव- ४१६, वेळकर नितिन बाबुराव- ४७०, वेंगुर्लेकर रुपाली राजन- ५७३
वारंगे निकिता संतोष- ५४६, चिपकर अनादी यदुनाथ-३१६, शेगडे तुकाराम मोहन- ३८८
गावडे प्रियांका राजेंद्र- ५२८, कांबळी श्रद्धा प्रकाश- ५१५, मातोंडकर पल्लवी मोहन- ४७६
धुरी गणेश महादेव- २९१, फर्नांडीस लविना व्हि.- ४५५, गावडे दिप्ती दिलीप- ३८३
केरकर गजानन सद्गुरु- ३८७, लोणे रुपाली बाळकृष्ण- ४०४, मसुरकर ज्योती कृष्णा- ३४३
परब महेंद्र बाबाजी- २७८, राऊत कविता पुंडलिक- ४१९, सावंत बापू दाजी- ३५३
सावंत चित्रकला दाजी- ३७३, शेटये मयुरी मदन- ४२६, तोरसकर पूनम नरहरी- ४१२
भोने दिप्ती वसंत- ३२४, डिचोलकर प्रणिता उत्तम- ३९१, गवंडी प्राजक्ता शंकर- ३३६
कवठणकर श्रीकृष्ण ग.-३११, पालकर निखिल श्रीधर- ३४२, पाटील पराग प्रकाश- ३५३
पेडणेकर दमयंती वि.-३९८, रेवणकर नेत्रांजली श्री.- ३६३, तेंडोलकर हरिश्चंद्र पुं.-३५२
तेंडोलकर प्रणव मंगेश- ३७६, वायंगणकर महेश मारुती- ३३८, गावडे नारायण अरविद- ३१७
ठाकूर वैभव अच्युत- ३०६, नवार जयेश गंगाराम- ३२९, गिरकर ऋग्वेद विठोबा- ४३१
पंडित मिलिद पुरुषोत्तम- ४४३, तांडेल महादेव नागेश- २९९, पंडित श्रीधर दीपक- २९२
रेडकर अपर्णा अशोक- ३१२, साळगावकर पूनम ना.- २९६

Wednesday 13 July, 2011

अंक २६वा, १४ जुलै २०११

अधोरेखित *
राजकारणाची बदलती शैली
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडीचे सरकार सुमारे सात वर्षे एकमेकांना पाण्यात बघत चाललेले असतांना जिल्ह्या जिल्ह्यात मात्र दोन्ही पक्षांचा सवता - सुभा उफाळून आला आहे. नजिकच्या काळात जिल्हा परिषद, नगरपरिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या असताना दोन्ही पक्षातले कार्यकर्ते अधिकच जोरदार आणि हिसक पातळीवर उतरु लागले आहेत. त्याचे एक प्रत्यंतर वेंगुर्ले आमसभेतही दिसून आले. काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीतर्फे सावंतवाडी मतदार संघातून विजयी झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार दीपकभाई केसरकर हे आता राणे समर्थक काँग्रेस पक्षाला खलनायक ठरले आहेत. तर राष्ट्रवादी पक्षही काँग्रेस विरोधात आक्रमक पवित्र्यात उभा ठाकला आहे. दोन्ही पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावरच लढविणार अशा घोषणा सुरु केल्या आहेत.
मंत्र्यांना आणण्याची शर्यत - या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये आपापल्या पक्षाच्या मंत्र्यांना जिल्ह्यामध्ये आणण्याची शर्यत गेल्या महिन्याभरात पहायला मिळाली. या मंत्र्यांनी भर पावसात विविध विकासकामांच्या आश्वासनांचाही पाऊसही पाडला.
सेनेला प्रेमाच्या विळखा - दुसरीकडे शिवसेना - भाजप युती रुसवेफुगवे करत का होईना अधिकाधिक घट्ट होऊ लागली आहे. त्यांना रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्षाचा प्रेमाचा विळखा पडला आहे. आगामी निवडणूक हे तिन्ही पक्ष महायुती करुन लढविणार आहेत.
मनसेची भूमिका - या युती आणि आघाडीच्या निवडणूक लढाईत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय भूमिका राहील किवा ते किती जागा जिकतील आणि युतीचे किती उमेदवार पाडतील हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
या सर्व निवडणुकपूर्व घडामोडींमध्ये राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते कोणत्या थराला जाऊ लागले आहेत. याचे प्रत्यंतर त्या पक्षांच्या आपापसातील वादावादीमुळे दिसून येऊ लागले आहे. याची एक झलक वेंगुर्लेच्या आमसभेतही लोकांना पहायला मिळाली. आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ जुलैला झालेल्या आमसभेत आमदारांच्या दिशेने चप्पल भिरकवण्यात आली. या प्रकरणी युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष सचिन शेटये वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
- काँग्रेसच्या जिल्हा नेत्यांनी आमदार केसरकर काँग्रेसलाच नाहक बदनाम करत आहेत. त्यांनी घटनेचे आत्मपरिक्षण करावे असा सल्ला दिला आहे.
- राष्ट्रवादीच्या नेते आणि पदाधिका-यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बाबत लक्ष घालावे असे म्हटले आहे.
असे प्रकार वाढले तर जिल्ह्यात लोकशाही जीवंत राहणार नाही. जिल्ह्यात यापूर्वी दोन राजकीय बळी गेले आहेत. काही जणांना बेपत्ता केले गेले आहेत. तिसरा बळी आपलाही जाऊ शकतो. यापूर्वी काँग्रेसच्या लोकांनी सावंतवाडीची आमसभा होऊच दिली नाही. यावरुन लोकांनी बोध घ्यावा अशा तीव्र शब्दात केसरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
एकंदरीत जिल्ह्यातले बदलते राजकीय वातावरण पाहता सर्व सामान्य लोकांनाच यापुढे सक्रीय व्हावे लागेल. आपले मत कोणाला म्हणजे कोणत्या प्रवृत्तीला देतो? याचा विचार मतदारांना करावा लागणार आहे. लोकांच्या संवेदना खरोखरच तीव्र आहेत का? की त्या बोथट झाल्या आहेत याचे उत्तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळेल.
- श्रीधर मराठे

संपादकीय *
शेवटी दैवावरच हवाला..!
गेल्या पंधरा-वीस दिवसात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि राज्यातील अनेक मंत्र्यांनी सिधुदुर्ग जिल्ह्यात हजेरी लावून आश्वासनांचा पाऊस पडला. उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे हे महिन्यातून किमान दोनदा तरी जिल्ह्याचा दौरा करुन जातात. एकंदरीत भर पावसात यावेळी जिल्ह्यामध्ये मंत्र्यांची रेलचेल होती. साहजिकच सर्व प्रशासकीय यंत्रणा ‘मंत्रीग्रस्त‘ झाली होती. त्यात पुन्हा बदल्यांचे सत्र सुरु झालेले, त्यामुळे सर्वसामान्य लोकांची तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विविध सरकारी कार्यालयात असणारी कामेही खोळंबली. शेतकरी वर्ग शेतीच्या कामात व्यग्र असल्यामुळे त्यांना या मंत्र्यांच्या समवेत असणा-या गाड्यांच्या ताफ्यांकडे बघायलाही वेळ नव्हता. त्यामुळे मंत्र्यांना स्वतःच आपल्या खात्याशी संबंधीत ठिकाणांना भेटी देऊन बरोबरचे पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी आणि खात्याचे अधिकारी यांच्याशी चर्चा करुन दौरे सफल करावे लागले! विरोधी पक्षांच्या नेत्यांनी नेहमीप्रमाणे मंत्र्यांच्या या दौ-यांवर टीका केलीच.
शरद पवार आंबोलीत आले ते उस संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी पण ते पुण्यातील ‘लवासा‘ सिटीप्रमाणे आंबोली परिसरातही ‘आंबोली सिटी‘ करण्याच्या हेतूने आले अशा बातम्या छापून आल्या. तर अनेक मंत्री हे केवळ पर्यटनासाठी या जिल्ह्यात येऊन गेल्याची टीका झाली. राष्ट्रवादीचा मंत्री आला की, एक- दोन दिवसात काँग्रेसचे मंत्री असा खेळ जवळपास दोन आठवडे चालला होता.
दरम्याने पालकमंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्ल्यात बुद्धिवंतांचा मेळावा घेऊन येत्या निवडणुकीत नगरपालिकेची सत्ता काँग्रेसच्या हाती द्या. मग शहराचा आदर्श विकास कसा करायचा हे आम्ही दाखवून देऊ असे रोख ठोक आवाहन केले. यापूर्वीही सावंतवाडी आणि कणकवली येथे त्यांनी अशा बुद्धिवंतांच्या सभा घेऊन असेच आवाहन केले होते.
जिल्ह्यातील चार नगरपालिकांपैकी कणकवली आणि मालवण नगरपालिका या पूर्णतः काँग्रेस पक्षाच्याच बहुमताखाली आहेत. तर जिल्हा परिषदेवर गेली दहा वर्षे राणे समर्थकांचीच निर्विवाद सत्ता आहे. मग विकास खुंटला कुठे? विकास योजनांसाठी मंजूर असलेला निधी खर्च न होता परत का जातो? रस्त्यांची कामे होतात, निधी खर्च होतो तरीही रस्त्यांची दुर्दशा कां? सरकारी आरोग्य यंत्रणाच रुग्णाईत का? असे अनेक प्रश्न लोकांना पडत असतात. पण ते रोखठोक विचारु शकत नाहीत.
बारा महिने तेरा काळ राजकारणच करणा-यांना हे असले प्रश्न आपापल्या राजकीय पक्षाच्या सोयीनुसार पडत असतात. म्हणजे सध्याच्या सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीवर विरोधी पक्ष टीका करुन त्यांची उणी-दुणी काढणार तर सत्ताधारी त्यांना सत्तेच्या जोरावर दमबाजी करणार हे सगळे लोकांना वृत्तपत्रांतून वाचायला मिळत असते. पण त्यामुळे विकास कामांचे गाडे काही हलत नाही.
मंत्र्यांच्या दौ-यामुळेही ते हलत नाही असाच आजवरचा अनुभव आहे. आपल्या वाडीत, गावात, रस्त्यांची, साकवांची, पाणी पुरवठ्याची, शाळेची, वीजेची कामे व्हावीत म्हणून संबंधीत लोक मोठ्या आशेने मंत्र्यांना निवेदने देत असतात. ती निवेदने मंत्रालयातील कच-याचा एक भाग होऊन जातात. सरकारी यंत्रणा समोर आलेली निवेदने, त्या सोबतची कागदपत्रे यांची दखलही घेत नाही. मग ती प्रकरणे न्यायालयात जातात. मग यांची पळापळ सुरु होते. हा सर्व खेळ कमी म्हणून की काय, राजकीय पक्षांमध्ये सध्या शिववडा, छत्रपती वडा आणि काँग्रेसचे कांदेपोहे असले बालीश खेळ सुरु झाले आहेत.
अण्णा हजारेंनी सातत्याने आंदोलने करुन माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना मिळवून दिला. पण त्यामुळे भ्रष्ट नोकरशाहांना चाप लागला का? अगदी ग्रामीण पातळीवरही भ्रष्ट आचार चालू आहे. गावोगावी असे अण्णा हजारे निर्माण झाल्याखेरीज असा चाप लागू शकणार नाही. सध्याच्या स्वार्थपारायण समाजजीवनात ते शक्य होईल काय? याकामी दुस-याने लढावे अशी अपेक्षा प्रत्येकजण करीत असतो.
अण्णा हजारेंचे जन लोकपाल आंदोलन झाले. केंद्र सरकारने गेल्या चाळीस वर्षापासून संसदेपुढे असलेला तो प्रस्ताव मान्य करुन सरकारी आणि अण्णा हजारे प्रणित गैर सरकारी समित्यांच्या चर्चांमध्ये सध्यातरी तो गुंडाळून टाकला आहे.
या सगळ्यामध्ये वाढत्या महागाईने ग्रासलेला, सरकारी नोकरांप्रमाणे निश्चित उत्पन्नाचे साधन नसलेला सर्वसामान्य असंघटीत माणूस काय करु शकणार आहे? याचे उत्तर कोणा बुद्धिवंतांपाशी नाही की, कोणा राजकारण्यांपाशीही नाही. त्यामुळे लोकही आता दैवावरच हवाला ठेवून राहणे पसंत करतील.

विशेष *
मधुमेहासाठी औषधीहीन चिकित्सा
मधुमेह या आजाराच्या नावात जरी गोडपणाचा उल्लेख असला तरी या विकारामुळे आजारी व्यक्तीला गोड पदार्थांकडे पाठ फिरवावी लागते. एखाद्या व्यक्तीला मधुमेह आहे असे म्हटल्यावर मन भितीने आणि शंकेने घाबरुन जाते. पूर्व सूचना न देता हा आजार होतो. कोणत्याही प्रकारची वेदना नाही, कुरुपता नाही, संसर्ग नाही, तरीसुद्धा हा आजार व्यक्तीला आजीवन त्रस्त करीत असतो. त्या व्यक्तीला जीवनभर आपल्या आहारावर अंकुश ठेवावा लागतो. त्याचा परिणाम पुढे अशाच प्रकारच्या जीर्ण आजाराच्या स्वरुपात सहन करीत जीवन जगावे लागते. सामाजिक समारंभ, मित्रमंडळींच्या बैठकी, इतर सहभोजनात सहकारी मित्रमंडळी ज्या भोजनाचा आस्वाद घेत असतात ते भोजन, मधुमेही व्यक्तींसाठी दुर्लभ होऊन जाते.
मधुमेह म्हणजे शरीराकडून शर्करा, स्टार्च, कार्बोहाइड्रेट सारख्या पदार्थांचे चयापचय योग्य प्रकारे न होणे. ‘इन्सुलीन‘ नावाच्या तत्वाच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण होते. ‘इन्सुलीन‘ एक प्रकारचे हार्मोन आहे. ज्याचे उत्पादन ‘पॅनक्रियाज्‘ नावाच्या ग्रंथीमध्ये होते. ही ग्रंथी पोटाच्या साधारण खाली आणि पाठीमागच्या बाजूला असते. नैसर्गिकरित्या पॅनक्रियाजद्वारे इन्सुलीनचे स्त्रवण योग्य प्रमाणात होऊन आहाराच्या स्वरुपात घेतलेल्या स्टार्च आणि शर्करा यांचे नियमित स्वरुपात पचन होते. परंतु कुठेतरी गडबड होते आणि ‘पॅनक्रियाज्‘ च्या कार्यात अडथळा अथवा अनियमितता निर्माण होते. ‘पॅनक्रियाज्‘ या ग्रंथीने काम योग्य रितीने न केल्यामुळे इन्सुलीनचे स्त्रवण योग्य प्रमाणात होत नाही. परिणामी रक्तामध्ये रक्तशर्करेचा अतिरिक्त संचय व्हायला लागतो. हे रक्त मुत्राशयामध्ये नियमित प्रक्रियेप्रमाणे विघटनासाठी (फिल्टरसाठी) गेले असता रक्तातील अतिरिक्त साखर विघटीत होते. रक्तातील साखरेची पातळी सांभाळण्यासाठी शरीर ही साखर मुत्राशयावाटे लघवीद्वारे शरीराच्या बाहेर काढते. शरीर पोषणासाठी अतिशय उपयुक्त असलेल्या साखरेचा अशाप्रकारे क्षय झाल्यामुळे अनेक प्रकारचे शारीरिक कष्ट शरीरावर लक्षणांच्या रुपात दिसायला लागतात. असाधारण तहान लागणे, वारंवार लघवी होणे, योग्य प्रमाणात आहार घेतला तरी वजन कमी होणे, कधी कधी त्वचेवर खाज येणे आणि फोडांचा त्रास होणे वगैरे. रक्तशर्करेचे प्रमाण जास्त वाढल्यास ‘डायबेटिक कोमा‘ (मधुमेहजन्य बेशुद्धी) अशी परिस्थिती निर्माण झाल्यास, मधुमेही व्यक्तीचे प्राण धोक्यात येऊ शकतात.
पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो. विशेषतः मध्यमवयीन, वजन जास्त असलेल्या महिला. आनुवंशिकतेने हा आजार होणा-या महिला ४० ते ४५ वयाच्या आसपास असतात. मधुमेह लहान वयातही होतो. पंधरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये सुद्धा हा आजार दिवसेंदिवस वाढत आहे.
१९२१ साली डॉ.बेटींग आणि डॉ.बेस्टन यांनी ‘इन्सुलीनचा‘ शोध लावला आणि मधुमेही व्यक्तीच्या जीवनात आशेचा किरण डोकावला. इन्सुलीनचे इंजेक्शन घेऊन मधुमेह नियंत्रित केला जाऊ लागला. तरीही मधुमेह घालवून लावण्यासाठीचा हा उपचार नाही. मधुमेही ग्रस्त व्यक्तीला आजीवन इन्सुलीन इंजेक्शनवर अवलंबून राहावे लागते.
अनेक चिकित्सेच्या शोधात आहारचिकित्सेचा अवलंब केला आहे. विद्वानांच्या मते सर्वसाधारण व्यक्तीच्या आहारामध्ये व्हिटॅमिन्सचा अभाव अधिक प्रमाणात असतोच. उदा. मशिनद्वारे दळलेले गव्हाचे पीठ अतिबारीक असते आणि या प्रक्रियेमध्ये शरीराला अत्यावश्यक असणा-या व्हिटॅमिन ‘बी‘ कॉम्प्लेक्सचा अभाव राहतो. म्हणून मधुमेही व्यक्तीने जाड कोंड्यासकट असलेले पीठ वापरले पाहिजे. आंबवलेल्या पिठामध्येही व्हिटॅमिन ‘बी‘ भरपूर प्रमाणात असते. हिरव्या ताज्या फळभाज्या आणि पालेभाज्यांमध्ये जीवनावश्यक खनिजे आणि क्षार जास्त प्रमाणात असतात. दैनंदिन खनिज क्षारांच्या पूर्ततेसाठी फळे आणि भाज्या भरपूर प्रमाणात खावयास हव्यात. योग्य आणि संतुलित आहार घेतल्यामुळे पाचन संस्थेवर जास्त भार न पडता शरीराचे योग्य प्रकारे पोषण होऊ शकते. मधुमेही व्यक्तींना सर्वसाधारण व्यक्तीपेक्षा कमी उष्मांक असलेला पण खनिज क्षारांनी परिपूर्ण असलेला आहार घ्यावा लागतो. ताजी फळे, ताज्या फळभाज्या आणि पालेभाज्या, कोशिबिर, कमी उष्मांक देतात आणि खनिज क्षारांची पूर्तता करतात. त्यासोबत तंतुमय पदार्थ मिळण्यामुळे पोट स्वच्छ होण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात.
मधुमेही व्यक्ती कुठल्याही प्रकारचा जंतुसंसर्ग सहन करु शकत नाही. कुठे कापले किवा जखम झाली तर ती जखम लवकर बरी होत नाही. आपण अशी बरीच उदाहरणे पाहिली असतील की पायाला एखादी जखम झाली, बुरशीमुळे जंतूसंसर्ग झाला आणि परिणाम म्हणून पाय गमावण्याची वेळ आली. आपणांस जखमा वगैरे होतील या भीतीने मधुमेही व्यक्तीच्या कार्यात मर्यादा पडतात. त्यामुळे ते सक्रिय राहण्याचे टाळतात. अशी व्यक्ती बराचसा वेळ असाच बसून घालवते व त्यामुळे वजन वाढते व ही गोष्ट मधुमेही व्यक्तींसाठी अतिशय घातक आहे.
व्यायामामुळे रक्तातील अतिरिक्त साखरेची पातळी कमी होते. मधुमेही व्यक्तींने नियमित व्यायाम करावा. त्यामुळे कार्बोहायड्रेट पदार्थांचे चयापचय चांगल्या रितीने होण्यास मदत होऊन व्यक्तीला लागणा-या इन्सुलीनची गरज कमी होऊ शकते. स्थूल असलेल्या मधुमेही व्यक्तीचे व्यायामामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. ज्या मधुमेही व्यक्ती निष्क्रिय राहतात त्यांच्या लघवीतही साखर आढळून येते. अशा व्यक्तींनी जर चालण्याचा व्यायाम नियमपूर्वक केल्यास लघवीतील सारखेचे प्रमाण आपोआप कमी होते. व्यायामामुळे पॅनक्रियाज ग्रंथीला इन्सुलीनच्या उत्पादनासाठी मदत होते. श्वासाच्या व्यायामामुळे शरिराच्या कोट्यावधी पेशींची ऑक्सिजनची गरज पूर्ण होते. मोकळ्या आणि प्रदूषणमुक्त वातावरणात केलेल्या व्यायामामुळे मधुमेही व्यक्तीला नक्कीच स्वास्थ्य उंचावल्याचा अनुभव येईल.

सर्कारी नोकरी
सध्याच्या काळात शिक्षण असूनही ‘नोकरी‘ मिळविण्यासाठी जे काही ‘मार्ग‘ अनुसरावे लागतात ते ऐकता, सुमारे ४० वर्षापूर्वी आम्हाला विनासायास नोकरी मिळाली होती हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल. एकतर आम्ही महाराष्ट्र सरकारचे ‘स्टायपेंडरी स्टूडंट‘ म्हणून पशुवैद्यकीय शिकत होतो त्यामुळे पदवीनंतर सरकारी नोकरीची शाश्वती होती. मुलाखत वगैरे सोपस्कार होत असत, पण ‘नेमणुकीचे आदेशपत्र‘ ब-याच वेळा मुलाखत संपताच हातात देत असत. कोकणात नोकरीसाठी बाहेरचे उमेदवार उत्सुक नसत आणि त्यामुळे रत्नागिरी (जुन्या) जिल्ह्यात नोकरी मिळण्यास अडचण नव्हती. मलाही मुलाखतीच्या वेळीच राजापूर या तालुक्याच्या गावी ‘पोस्टींग‘ देण्यात येईल असे सांगण्यात आल्याने त्या आनंदात मी ‘स्वगृही‘ परतलो. नेमणुकीचे आदेशपत्र पोस्टाने येईल अशी वाट पहात होतो. मुलाखतीनंतर ८-१० दिवसांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दापोली तालुक्यात दौ-यावर आले होते. त्यांच्याकडे माझ्या वडिलांनी माझ्या नेमणुकीबाबत चौकशी केली, त्यावेळी ‘अपॉईटमेंट लेटर‘ दौ-याचे ठिकाणीच मला ‘इश्यू‘ करण्यात आले व त्या आधारे मी नोकरीचे ठिकाणी रुजू झालो. नेमणूक आदेशपत्राची कार्यालयीन प्रत राजापूर येथे पोहोच झालेली होती. मुलाखतीच्या दिवशीच मला नेमणूक मिळाली असती. तथापि माझ्या अज्ञानामुळे मी ८ दिवस नोकरीवर उशिराने हजर झालो.
पशुवैद्यक शास्त्रातील पदवीधारक झालो होतो तरीही ‘सर्कारी‘ कामकाजाची मला अजिबात माहिती नव्हती. हजर झाल्यावर जॉईनिग रिपोर्ट घ्यावयाचा असतो हे माहितच नव्हते! हा रिपोर्ट ‘मसुद्याबरहुकूम‘ दवाखान्याच्या असिस्टंटनी लिहून दिला कारण मी लिहिलेला ‘रिपोर्ट‘ फॉर्मेटमध्ये नव्हता. सारांश नोकरीच्या पहिले दिवशीच ‘सर्कारी काम विशिष्ट चाकोरीतूनच करायचे असते - करावे लागते‘. हा महत्त्वाचा धडा मिळाला.
पुढे यथावकाश सरकारी कामकाजाची पद्धत कळली पण समजली नाही. अंगळवणी तर शेवटपर्यंत पडली नाही. सुरुवातीला दवाखान्यात काम करतांना एक ‘अनुभव‘ नमूद केल्यावाचून रहावत नाही. गुरांना रोगप्रतिबंधक लसीकरणाचे काम करतांना एका गावी, पडवीतच (गुरांच्या शेजारी) एक म्हातारी झोपलेली आढळली. त्यांच्याकडील एका गायीवर मी पूर्वी उपचार केले होते. ही म्हातारी सांधेदुखीने बेजार त्रस्त झाली होती. म्हातारीने सांधेदुखीवर माझ्याकडे औषधाची मागणी केली. मी ‘गुरांचा डॉक्टर‘ असल्याने माणसावर उपचार करु शकत नाही असे सांगताच ती म्हणाली, ‘अरे बाबा, ती मोन जात, काहीबी बोलत नाही, सांगत नाही, तरी पण तूं परीक्षा करुन उपचार करतोस, माझे सांधे धरलेत, चालतांना दम लागतोय असे सांगूनही तुला माझ्या रोगाची परीक्षा कां होत नाही? मागं आमची गाय उठत नव्हती तेव्हा तूं ज्या दवा - गोळ्या दिल्या होत्यास त्याच मला दे. आमची गाय बरी झाली होती तशीच मी बी बरी होईन! देव तुझं भलं करो!‘
बहुतेक या म्हातारीच्या आशीवार्दानेच माझी सरकारी नोकरी सुरळीतपणे पार पडली. माझ्या पेशंटकडून मला कधीही त्रास झाला नाही. मात्र सरकारी कामकाजातील नियम, नोकरीतील वरिष्ठ अधिकारी, सहकारी यांचेकडून खूपच अनपेक्षित अनुभव आले. काही गोड, काही कटू! काही अविस्मरणीय तर काही ‘दिसतं तसं नसतं‘ प्रत्यय देणारे!!!
-मधुकर घारपुरे

लोकपाल विधेयक
भ्रष्टाचार हा आपल्या देशाला कॅन्सरसारखा पोखरतो आहे. भारत हा आशियात भ्रष्टाचारी देशातून १६ व्या तर जगात ८७ नंबरवर आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून देशाच्या अर्थव्यवस्थेला काळ्या पैशाने मोठे संकट निर्माण केले आहे. ७० लाख कोटी रुपये परदेशी बँकांमध्ये काळ्या पैशाच्या स्वरुपात आहेत. हे देशाने घेतलेल्या परदेशी कर्जाच्या १३ पटीने आहे. हे पैसे भारतात परत आले तर देशातील ४५ कोटी गरीब लोकांना प्रत्येकी रु. १ लाख मिळू शकतात.
भ्रष्टाचार अनेक मार्गाने निर्माण होत आहे. सरकारी निविदा मंजूर करणे, बनावट औषधांची निर्मिती व विक्री, अनेक मार्गानी कर चुकविणे, सरकारी मालमत्तेचे/साधनांचे स्वतःच्या मर्जीने वाटप करणे, सरकारी कार्यालये, न्यायालये, पोलीस, लष्करी दले, प्रसारमाध्यमे यातील भ्रष्टाचार, सहकारी, धार्मिक संस्थांच्या पैशाचा अपहार अशा अनेक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. भ्रष्टाचारातील अलिकडील काही ठळक उदाहरणे आपल्याला माहिती आहेत. २क्र स्पेट्रममधील ए राजाचा रु.१,७६,००० कोटीचा घोटाळा, कॉमन वेल्थ गेममधील सुरेश कलमाडींचा रु.७०,००० कोटींचा घोटाळा, स्टॅम पेपरातील तेलगीचा रु. २०,००० कोटीचा घोटाळा, सत्यम कॉम्प्युटरचा रु. १४,००० कोटीचा घोटाळा, लालूप्रसाद यादवांचा रु. ९०० कोटींचा चारा घोटाळा अशी घोटाळ्यांची मालिका चालूच आहे. आणि हे घोटाळे रोखण्यासाठी व दोषींना कडक शासन करण्यासाठी देशातील प्रचलित कायदे आणि यंत्रणा सक्षम नाही. प्रभावी नाही हे वेळोवेळी उघड झालेले आहे. या सर्व यंत्रणा सरकारी अधिपत्याखाली असल्यामुळे निःपक्षपातीने आपले कर्तव्य पार पाडू शकत नाहीत.
सामान्य माणसाला आता जीवन जगणे मुश्किल झालेले आहे. हे आपण कुठवर सहन करायचं? गेली ४२ वर्षे लोकपाल विधेयक लोकसभेत सादर केल्याचे नाटक केले जाते व नंतर ते सभागृहातून नाकारले जाते. सरकार या विधेयकाबद्दल गांभिर्याने पाहत नाही. अशा वेळी अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली जनताच भ्रष्ट्राचाराच्या विरुद्ध उभी राहून लोकपाल कायदा करण्यासाठी सरकारशी संघर्ष करते आहे.
नागरी समितीला अपेक्षित असणारे जन लोकपाल बिलातील काही ठळक मुद्दे-
- जन लोकपाल यंत्रणेला केंद्रात लोकपाल तर राज्यपातळीवर लोकायुक्त म्हणून संबोधले जावे.
- सर्वोच्च न्यायालय तसेच निवडणूक आयुक्त याप्रमाणे लोकपालांना स्वायत्तता मिळावी.
- भ्रष्टाचारी प्रकरणे १ वर्षाच्या आत निकालात काढावी.
- भ्रष्टाचारामुळे झालेल्या राष्ट्रीय नुकसानीची भरपाई त्या दोषी व्यक्तीकडून करावी व ती रक्कम देशाच्या महसूलात जमा करावी.
- लोकपाल दोषी अधिका-याला दंड देऊ शकतो व ती दंडाची रक्कम भरपाई म्हणून तक्रार कर्त्याला देऊ शकतो.
- कोणताही अधिकारी, न्यायाधीश, राजकारणी यांची चौकशी करुन त्यांना शिक्षा करण्याचे अधिकार लोकपालांना असावेत.
- भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवणा-या कार्यकर्त्यांना लोकपालाकडून संरक्षण मिळावे.
आतापर्यंत सरकारच्या प्रतिनिधी व नगरी समितीच्या ७ सभा झाल्या. या सभांमध्ये सरकारकडून तसेच नागरी समितीकडून आपापले मसुदे सादर केले गेले. परंतु अजूनही काही मुद्यांवर एकमत झालेले नाही. सरकारने ८० ते ८५ टक्के तरतुदीवर एकमत असल्याचे जाहीर केलेले आहे. तर नागरी समितीने महत्वाच्या मुद्यावर मतभेद कायम असल्याचा दावा केला आहे. एकमत न होवू शकलेले काही मुद्दे-
सरकारने सुचित केलेले मुद्दे-
- लोकपाल हे स्वतः भ्रष्टाचारावर चौकशी करु शकत नाही.
- सर्वसामान्य नागरिकांकडून आलेल्या तक्रारीवर लोकपाल कारवाई करु शकत नाहीत.
- थ्लोकसभेचे सभापती व राज्यसभेच्या अध्यक्षाकडून खासदारांवर आलेल्या तक्रारींवर लोकपाल कारवाई करील.
- लोकपाल हे एक सल्लागार मंडळ आहे. ते भ्रष्टाचाराच्या बाबींवर आपला अहवाल संबंधित खात्याला देईल.
- लोकपालांना पोलिसी अधिकार असू नयेत.
- सी.बी.आय.शी लोकपालाचा संबंध नसावा.
- दोषींना कमीत कमी ६ महिने तर जास्तीत जास्त ७ वर्षे शिक्षा असावी.
- लोकपाल हे सरकारी अधिकारी आणि नोकरशहा यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करु शकत नाहीत.
- लोकपाल देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधातील प्रकरणाची चौकशी करु शकत नाही.
- थ्लोकपाल मंडळ हे सर्वोच्च न्यायालयाच्या तीन निवृत्त न्यायमूर्तींचे असावे.
नागरी समितीची मुद्दे-
- लोकपानांना तो अधिकार असावा.
- लोकपालाना तसा अधिकार असावा.
- भारतीय नागरिकाकडून आलेल्या तक्रारींवर खासदाराची लोकपाल चौकशी करु शकतो.
- लोकपाल हे केवळ सल्लागार मंडळ नसून दोषी असलेल्यांना शिक्षा करण्याचे अधिकार त्यांना असावेत.
- पोलिसी अधिकार असावेत.
- सी.बी.आय.ची अँटी करप्शन विग लोकपालमध्ये विलीन करावी.
- दोषींना कमीत कमी ५ वर्षे तर जास्तीत जास्त आयुष्यभर कैद असावी.
- लोकपालाला सर्व भ्रष्टाचारी प्रकरणांची चौकशी करता यावी. त्यात राजकारणी, नोकरशहा तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायाशिधाचीही.
- लोकपाल सदस्याची निवड सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, निस्पृह निवृत्त अधिकारी, स्वच्छ चारित्र्याचे राजकीय नेते यांतून व्हावी.
लोकपाल मंडळाला आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आवश्यक ते अधिकार देणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी जन लोकपाल विधेयक प्रभावी असावे. म्हणून आपण सर्वजण प्रथम लोकपाल विधेयक जाणून घेवू व त्याचा प्रसार करु. तसेच नागरी समितीच्या व मा. अण्णा हजारे यांच्या उपक्रमांना सक्रीय पाठिबा देवू या. देशाचे भवितव्य त्यांच्या हाताता आहे त्या तरुण पिढीला जागे करुया. आणि देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊ या.
एस. एस. (बापू गिरप),
गोरेगाव, मुंबई , मो. ९९२०९५५१७५.

आकेरीत भरते भानसाची जत्रा
जत्रा हा शब्द जरी उच्चारला तरी लगेचच समोर दिसू लागतात ती खेळण्याची दुकाने, अगरबत्ती, केळी, नारळ, हार अन् त्यासोबत चणेफुटाणे, खडीसाखर, खाजा, चहा-भजीचे स्टॉल, याचबरोबर मध्यरात्री नमनास सुरुवात होऊन पाहाटे सूर्योदया अगोदर संपणारी दशावतार नाट्यमंडळांची पौराणिक, काल्पनिक नाटके चर्चेत असतात. मात्र, अशा जत्रेहून वेगळीच खास निसर्गाबरोबर संवाद साधणारी आकेरी येथील भावई देवी मंदिर परिसरात ऐन पावसाळ्यात भरणारी जत्रा वैशिष्ट्यपूर्ण म्हणायला हवी. विशेष म्हणजे या जत्रेत हॉटेल्स, खेळण्याची दुकाने इतकेच काय देवपूजेच्या साहित्याची केळी-नारळाची दुकानेसुद्धा दिसणार नाहीत. ही जत्रा दिवसा ऐन दुपारच्या वेळेस पार पडते. आकेरी गावात या आगळ्या वेगळ्या पद्धतीने साज-या होणा-या जत्रेस आकेरीवासीय करमळच्या खोल्याची (पानांची) जत्रा तथा भानसाची जत्रा म्हणून संबोधतात.
खडकाळ प्रदेशात १० ते १२ मी. उंचीपर्यंत वाढणारी करमळाची झाडे येथून फर्लागभर अंतरावर असलेल्या सिद्धमहापुरूष डोंगरीत मोठ्या प्रमाणात पूर्वी आढळायची. ही पाने साधारणतः २ फूट लांब व फूटभर रुंदीची असतात. पूर्वी घनदाट स्वरूपात आढणारी ही झाडे आता खूप कमी प्रमाणात पहायला मिळतात. अवैध वृक्षतोडीमुळे त्याचं अस्तित्व जवळपास संपून गेलं आहे. ब-याच वर्षापूर्वी काहीजण केळीच्या पानाऐवजी करमळच्या झाडाची पाने ब्राह्मण भोजन, गणेशचतुर्थी,महालय श्राद्धसारख्या कार्याना बहुसंख्येने उपस्थित असणा-या आत्पस्वकीय नातेवाईकांना जेवणासाठी वापरली जायची. आता आधुनिक युगात बाजारात प्लास्टिक पत्रावळ अगदी कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने रानावनात फिरून करमळाची पाने जमा करायचा जमाना जाऊन काळाच्या ओघात या पानांचा वापर मागे पडला. मात्र, आजही सिद्धाच्या डोंगरीच्या कुशीत वास्तव्यास असलेले लोक विशेषतः कशेलवाडीतील रहिवाशी शुभकार्यादिनी ही करमळाची पाने जेवणासाठी वापरतात.
करमळाच्या खोल्यांची (पानांची) जी भानसाची जत्रा म्हणूनही ओळखण्यात येते, ते पावसाळ्यात आर्द्रा नक्षत्रात साज-या केल्या जाणा-या जत्रेसाठी आकेरी रामेश्वर पंचायतनातील श्री भावई देवीसाठी भातशेती जमिनीचे ठिकाण असून ते मंदिराचे पुजारी घाडी कसवून त्यातून मिळणा-या उत्पन्नातून या जत्रेचा खर्च भागवला जातो. बारा-पाचाच्या देवस्कीत ३६० खेड्यांचे देवपण हा जो प्रकार आहे. त्यात ही जत्रा मोडते. रामेश्वर देवस्थान संबंधित जी गाव रचनेतील झाराप, आकेरी, नेमळे या तीन गाव मर्यादेतील १४ स्थळे येतात. त्यांचाही समावेश यात केला जातो.
जत्रेदिवशी न वापरलेल्या नव्या मातीच्या मोठ्या मडक्यात तांदूळ घालून त्याचे तोंड केळीचे पान बांधून बंद करून घाडीवाडीतील घाडी मानक-यांच्या कुळाच्या देवळाकडून घाडी समाजातील एखाद्याच्या डोकीवर देऊन वाजतगाजत बाराच्या पूर्वसाच्या मंदिरात आणून उतरले जाते. तेथून गा-हाणे करून तांदूळ व नारळाचा समावेश असलेले १२ शिधे मांडले जातात. यातील ६ शिधे २ शेर तांदूळ व नारळ तर उर्वरित १ शेर तांदूळ, नारळ अशा स्वरूपाचे असतात. संबंधितांकडून गा-हाणे करून प्रत्येक मानक-याच्या मानाप्रमाणे शिधे दिले जातात. या शिध्याची गुळ, खोबरे, दूध घालून खिर करून शिधा मिळालेल्या प्रत्येकाने आपापल्या देवतेस दुपारी नैवेद्य दाखवायचा असतो. मंदिरात तांब्याच्या पातेल्यात तांदूळ शिजवून भात तळवावर ठेवला जातो. तसेच पुन्हा भात शिजवून पातेले तसेच ठेवले जाते. मातीच्या मडक्यातही मडके भरून भात शिजवला जातो. हे ताजे मडके असल्याने त्यात तांदूळ शिजवणे जोखमीचे असते. ते फुटू नये यासाठी तांदूळ न धुता व आत तांदूळ शिजवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी बाहेर न टाकता तो तसाच शिजवण्याची पूर्वापार पद्धत आहे. रितीरिवाजानुसार कुड्याच्या पानांवर परळ मांडले जातात. जत्रेसाठी लागणारे बांबूपासून तयार केलेले दादरे (फुलांच्या परडीच्या आकाराचे) त्यात करमळीची पाने घालून तळवावरचा भात भरून अवसारास हाक दिली जाते. अवसार हे दोन्ही दादरे हातात घेऊन पश्चिमेस असलेल्या विराच्या चाळ्याकडे नेऊन ठेवतो. तेथे १४ स्थळांचे १४ नारळ फोडले जातात. संबंधित मानकरी फोडलेल्या नारळाचे खोबरे व नैवेद्याचा भात घेतो. यानंतर मंदिराच्या पूर्वेस असलेल्या छोट्या-मोठ्या दगडवजा पाषाणाकडे करमळाच्या खोल्यावर १४ वाड्या करून गा-हाणे करून तो प्रसाद स्थळाच्या मानक-यास दिला जातो. भाताने भरलेले मातीचे मडके वाजतगाजत बाराचा पूर्वस मंदिरात आणून त्यातील भात करमळाच्या खोल्यांवर (पानांवर) नैवेद्य स्वरूपात ठेवून गा-हाणे केले जाते. यावेळी भगत मानक-यास जेवणकर म्हणून गंधाक्षता (आकीत) लावल्या जातात. हा नैवेद्य परब मानकरी नेतात. उपस्थित सर्व मानक-यांस करमळाच्या पानावर भात व नारळाचे खोबरे (शिरवणी) प्रसाद वाटून हे मडके उर्वरित भातासह हरिजन बांधव घरी नेऊन प्रसाद म्हणून मडकीतला भात देतात. या दिवशी घाडी कुळातील सवत पाथर या देवतेसह नैवेद्य दाखवण्यात येतो.
भावई मंदिरातील तळवावरचा कोरडा भात प्रसाद म्हणून सर्वांना अर्पण करून तांब्याचे भात भरलेले मडके (भानास) घाडी मानकरी डोकीवरून जेथून या जत्रेची सुरुवात झाली त्या घाडीवाडीतील कुळाच्या देवळीकडे वाजत नेऊन तेथे घोगळे कुटुंबियापैकी एका व्यक्त्तीस जेवण वाढून गंधाक्षता लावून येथे जमलेल्या सर्वांना भात खोबरे वाटले जाते. मडक्यात शिजलेला हा भात व खोबरे खाण्यासाठी दरवर्षी बहुतेकजण येथे आवर्जुन उपस्थिती दर्शवितात. जोपर्यंत ही जत्रा होत नाही, तोपर्यंत करमळाच्या जत्रेअगोदर ही पाने वापरायची झाल्यास ती उलटी वापरायची असा प्रघात या गावात आहे.
मनोज परब, आकेरी

संस्कार
तीन-चार दिवस दुकान बंद असल्याने त्याची भेट झाली नाही. भेटला तेव्हा विचारलं, ‘‘का रे, दुकान बदं का? चार दिवस कुठे होतास?‘‘
‘‘सर, हे मे महिन्याचे दिवस. त्यातही हा शेवटचा आठवडा. बाबांनी हातात घेतलेलं विहीर खणायचं काम पाऊस सुरु होण्यापूर्वी पूर्ण व्हायला हवं. त्यांची ओढाताण मी पाहिली आणि चार दिवस दुकान बंद ठेवून त्यांच्या मदतीला गेलो.‘‘ त्याचा चेहरा थकलेला जाणवत होता पण त्यामागे समाधानाचा अंश जाणवत होता, त्याचवेळी त्याच कौतुक करावं असं वाटलं. पण मला ते बर वाटल नाही. मी त्याच्या कौतुकाचा विचार मनातच ठेवला. मात्र त्याचा तो गुण मनात ठसला तो कायमचाच.
व्यवसायाने तो शिपी. टेलर. दुकान आमच्या शाळेच्या समोरच. छोटासा पत्र्याचा गाळा. तिथे सतत हिदी, मराठी गाणी लागलेली. लेडीज टेलर असल्यामुळे मुलींची वर्दळ फार. त्याचं व्यक्तिमत्वही शंभरजणात सहज उठून दिसणारं. हसतमुख. दुकानाच्या समोर साधारण फुटभर लांबीच्या चपला दिसल्या की ओळखावं तो दुकानात आहे. तो एक तर कामात असतो किवा मोबाईलवर बोलत असतो. मात्र दुकानासमोरुन कोणीही आलं वा गेलं की न चुकता त्याच्या चेह-यावर हसूच असणार. उंची आणि चेह-यावरील हास्य ही त्याची दोन वैशिष्ट्येच. घरात संगीताची जाण असणारं कुणी नाही. तरीही आमच्या युसुफला गाण्याची ओढ. त्यातही भक्तीगीतांकडे कल जास्तच. गावातील जिल्ह्यातील विविध संगीत स्पर्धा कार्यक्रमातून त्याने आपला ठसा उमटविला आहे. त्याला स्वरांची जाण आहे. आता तो विविध संगीतगुरुंकडे धडे घेतो आहे.
या सामान्य वाटणा-या माझ्या माजी विद्यार्थ्याची मी एवढी मोठी ओळख का करुन देत आहे असा काहीसा प्रश्न वाचकांस पडला असेल. मानवाकडून अपेक्षित असणा-या सद्गुणात प्रामाणिकपणाला बरेच वरचे स्थान आहे. याचाच प्रत्यय मला त्याच्याकडून आला. ती छोटीसी घटना त्याच्यावरील संस्काराचे दर्शन देऊन गेली.
मी एक रेडिमेड पँट खरेदी केली. त्या पँटची उंची कमी करण्यासाठी ती त्याच्याकडे सोपविली. सोबत माप घेण्यासाठी माझी एक जुनी पँटही दिली. लग्नसराई असल्याने त्याने माझे काम थोडेसे मागेच ठेवले. कपडे देऊन साधारण पंधरा-वीस दिवस झाले असतील. एकदा दुपारी तो अचानक माझ्या घरी आला. आला तो, इकडच्या - तिकडच्या गोष्टी झाल्या. अन् जायला निघाला तेव्हा म्हणाला, ‘‘सर, तुम्ही माझ्याकडे दोन पँटस् दिल्या होत्या. त्यातील जुन्या पँटच्या खिशात काही पैसे होते. दोन-तीन दिवस मी तुमची वाट पहात होतो पण तुम्ही बाहेरगावी गेल्याचे समजले. आज मी आरवलीला एका लग्नाला गेलो होतो. घरी परतताना म्हटलं तुम्ही आहात की नाही ते पहावं आणि तुमचे पैसे द्यावेत.‘‘
‘‘सर, मी ते पैसे मोजलेही नाहीत. तुमची किती रक्कम होती ती तुम्ही पाहून घ्या.‘‘ त्या आठ-दहा दिवसात मला एकोणीसशे रुपयांचा हिशोब लागत नव्हता. मी पैसे मोजले. ते बरोबर एकोणीसशे होते. रक्कम फार मोठीही नाही आणि म्हटलं तर तशी छोटीही नाही. पण तिचा मोह कोणालाही पडला असता आणि हा साधा, सरळ मनाचा युसुफ मला ते पैसे परत द्यायला आला होता. मी त्यावेळी त्याने त्याच्या वडिलांना केलेल्या मदतीचे कौतुक केले. यावेळच्या प्रामाणिकपणाबद्दल फक्त पाठीवर हात ठेवला. तो भरुन पावला. मी शाबासकी दिली ती त्याला नाही तर त्याच्यावर झालेल्या संस्कारांना आणि मनोमन नतमस्तक झालो तो त्या संस्कार करणा-यांपुढे.
- प्रा. पी. एस. कौलापुरे, शिरोडा, ९७६७२९५८२९

विशेष बातम्या *
आमदार केसरकरांच्या दिशेने चप्पल फेक
वेंगुर्ले आमसभेतील घटना
वेंगुर्ले पंचायत समितीच्या आमसभेत शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन शेटये यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या दिशेने चप्पल भिरकावल्याने प्रचंड खळबळ उडाली. या प्रकारानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन शेटयेला अटक केली. यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. सायंकाळी न्यायालयाने सचिन शेटये यांची जामिनावर मुक्तता केली. राष्ट्रवादी काँग्रेसने या घटनेचा निषेध केला असून तहसिलदारांच्या समक्ष चप्पल फेकली जात असतांना पोलिस फिर्याद मागत असल्याबद्दल केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. अशा घटना घडत राहिल्यास जिल्ह्याचा बिहार होईल. या राजकीय दहशतीबाबत आपण आपण शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसने मात्र पोलिसांकडे तक्रार नसतांना नाहक युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याबद्दल पोलिसांनी निषेध व्यक्त केला

Friday 1 July, 2011

अंक २५वा, ७ जुलै २०११

अधोरेखीत *
माहिती अधिकाराची लढाई सुरुच!
रोजगार हमीचा कायदा प्रथम महाराष्ट्रात झाला. २००५ साली केंद्र सरकारने त्याचे अनुकरण करत सर्व राज्यांसाठी ग्रामीण रोजगार हमी कायदा आणला. त्याचा फायदा आज अनेक राज्यात मजुरांना होत आहे. पण याच रोजगार हमीचे महाराष्ट्रात तीन-तेरा वाजले. हीच गोष्ट महाराष्ट्रातल्या माहिती अधिकार कायद्याची झाली आहे.
अण्णा हजारेंच्या चळवळीचा परिणाम म्हणून २००२ मध्ये महाराष्ट्रात माहितीच्या अधिकाराचा कायदा झाला. या कायद्यामुळे सार्वजनिक कामासाठी मंजूर केलेली रक्कम त्याच कामासाठी योग्य पद्धतीने वापरली आहे का? झालेल्या कामाचा दर्जा प्रमाणित निकषांवर आहे का? अशा अनेक प्रश्नांची उकल या कायद्याने करता येते. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या या कायद्याचा व्यापक परिणाम म्हणून यु.पी.ए. सरकारने २००५ मध्ये देशपातळीवर माहिती अधिकाराचा कायदा संसदेत मंजूर केला.
महाराष्ट्रातले प्रशासन एवढे हुशार आणि कार्यक्षम आहे की, एका हाताने दिलेला माहितीचा अधिकार दुस-या हाताने काढून घेण्याची किमया प्रशासनाने साधली आहे. त्याला सिधुदुर्ग तरी अपवाद कसा असेल.
कायद्या अंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ
मराठी वृत्तपत्र सृष्टीचा पाया घालणा-या कै. बाळशास्त्री जांभेकर यांचे जिल्हा मुख्यालयात सिधुदुर्गनगरी येथे उचित स्मारक व्हावे हे सिधुदुर्गातील पत्रकारांचे गेल्या दोन दशकांपासूनचे स्वप्न आहे. यासाठी सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने आवश्यक तो निधी उभा करुन जिल्हा प्रशासनाकडून स्मारकासाठीची जागा ताब्यात घेतली. महाराष्ट्र शासनाने या खर्चाचा काही भाग उचलावा यासाठी शासनाकडे सातत्याने मागणी करुन त्याचा पाठपुरावा केला. शेवटी २००९ मध्ये निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाच्या सिधुदुर्गनगरी येथे झालेल्या बैठकीत ५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर झाले. या पॅकेजमधील ५० लाख रुपयांची रक्कम जांभेकर स्मारकासाठी देण्याची घोषणाही झाली.
निवडणूका पार पडल्या. मंत्रीमंडळ बैठकीस उपस्थित असलेले मंत्रीच पुन्हा सत्तेत आले. पण कोकण पॅकेजमधील बरीच रक्कम खर्ची पडलीच नाही. जांभेकर स्मारकासाठी मंजूर झालेल्या निधीची काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा वापर करुन ३ जूनला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने एका पत्रकाराने जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयात अर्ज केला.
विचारलेल्या माहितीवर २१-६-२०११ ला शासकीय माहिती अधिकारी सोमण यांनी पोस्टाने उत्तर दिले. ‘‘माहितीपैकी उपलब्ध असलेल्या कागदपत्रांची पृष्ठ संख्या तेरा आहे. तरी प्रती पान २ रुपये प्रमाणे २६ रु. व रजिस्टर्ड पोस्टेज खर्च २५ रु. मिळून एकूण ५१ रु. रक्कम शासकीय कोषागारात चलनाद्वारे भरुन आपण भरलेल्या चलनांची छायांकित प्रत या कार्यालयाकडे पाठविण्यात यावी. तद्नंतर माहिती पाठविण्यात येईल.‘‘ असा उल्लेख आहे.
या पत्रानुसार संबंधित अर्जदार आरोसला गेला. तेथे जिल्हा नियोजन कार्यालयात शासकीय माहिती अधिकारीच उपस्थित नव्हते. त्यामुळे अपिलीय अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी विजय अहिरे यांच्याशी संफ साधला. मात्र त्यांनी हात झटकले. कायद्यानुसार माहितीचे शुल्क भरून घेण्याची कार्यालयात व्यवस्थाच नाही असे बिनदिक्कतपणे सांगितले. अर्जदार सावंतवाडीला येऊन सावंतवाडीच्या कोषागारात गेला. तेथील अधिका-याने मात्र वरील पत्रानुसार चलन भरण्याची कायदेशीर तरतूदच नाही असे स्पष्ट करणारा शासन आदेश हातात ठेवला, त्यात तीनशे रुपयांपेक्षा कमी रक्कम त्याच कार्यालयात (जिल्हा) रोखीने स्विकारणे बंधनकारक असल्याचे नमूद केले आहे.
एवढा सगळा त्रास झाल्यानंतर आणि अपिलीय अधिकारी अहिरे यांनी केलेली दिशाभूल लक्षात आल्यावर कोणीही माहिती मिळविण्याचा नाद तिथेच सोडून दिला असता. मात्र या अर्जदाराने आपली नैतिक जबाबदारी ओळखून माहितीच्या अधिकाराचे सर्व संबंधित कागदपत्र मिळविले आणि पुन्हा मुख्यालय गाठले.
शासकीय माहिती अधिकारी यांच्यासमोर संबंधित कागदपत्रे ठेवली आणि पैसे भरुन घेण्यास सांगितले. पण सोमण यांनी आपला हेका सोडला नाही. तिनशे रुपयांच्या खालची रक्कम संबंधित कार्यालयात रोखीने स्विकारली पाहिजे हे शासनाने स्पष्ट करुनही शासनाच्याच खजिन्यातून वेतन घेणारे सोमण पैसे भरुन घ्यायला तयार झाले नाहीत. तेवढ्यात तेथे अपिलीय अधिकारी विजय अहिरे आले. त्यांच्याही नजरेस कागदपत्रे आणली. पण अहिरे यांनी या सर्वावर कळसच केला. माहितीच्या अर्जाची गरज काय? मी तुला अर्जाशिवायही माहिती द्यायला तयार आहे अशी मखलाशी करुन रोखीने माहितीचे शुल्क घेण्यास टाळाटाळच केली. त्यांची ही कृती माहिती अधिकार कायदा आणि शासन आदेश यांचा भंग करणारी आहे हे अर्जदाराने निदर्शनाला आणून दिले. मात्र अहिरे यांनी तुम्ही काही वाटेल ते करा अशी भूमिका घेतली.
अपिलीय अधिकारी अहिरे यांचा पूर्वानुभव लक्षात घेता दिशाभूल होणार हे गृहीत धरुन अर्जदाराने माहितीच्या अधिकाराचा कायदेभंग माहिती अधिकारीच करीत आहेत, याची नोंद करणारा अर्ज देवून त्या अर्जावर पोच घेतली आणि जिल्हा कार्यालयात उपस्थित असलेल्या सहका-यांच्या नजरेस या सर्व गोष्टी आणल्या आणि त्यांच्यासह पुन्हा नियोजन अधिकारी अहिरे यांच्या कार्यालयात धडक दिली.
तेव्हा रोखपालाला केबीनमध्ये बोलवत अहिरे यांनी माहितीचे शुल्क स्विकारण्याची तरतूद कार्यालयात आहे का? असा उलटाच प्रश्न विचारला. रोखपालाने तशी व्यवस्था असल्याचे सांगितल्याने त्यांची वाचा बंद झाली. काल-परवापर्यंत अशी व्यवस्थाच नसल्याचे सागून बेकायदेशीर वर्तन करीत सर्वसामान्यांची छळवणूक करणा-या अहिरेंचे पितळ त्यांच्याच केबिनमध्ये उघडे पडले. रोखपालाने रितसर पैसे भरुन घेतले. पावती दिली. संबंधित पावती घेऊन तयार असलेल्या माहितीची सोमण यांच्याकडे मागणी केली. पण सोमण यांनी नेहमीचा शासकीय दिरंगाईचा सूर आळवत नकार घंटाच वाजवली. अपिलीय अधिकारी विजय अहिरे यांनी तीच री ओढली.
असा हा नन्नाचा पाढा माहिती देण्यासाठी नेमलेले अधिकारी मोठ्या खुबीने माहितीपासून अर्जदारांना वंचित ठेवतात. २१ जूनच्याच पत्रात सोमण यांनी दिलेली माहिती अशी, ‘मंत्रिमंडळाने दोन वर्षापूर्वी निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेल्या कोकण पॅकेजपैकी कै. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारकासाठी शासनाकडून अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे स्मारकाच्या सद्यस्थितीबाबतची माहिती देता येत नाही.‘ त्यामुळे जनतेपुढे स्पष्ट झाले की, मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्या रक्कमेपैकी एकही रुपया आलेला नाही.
एका छोट्याशा माहितीसाठी पत्रकाराला कोणत्या दिव्यातून जावे लागते, याचा अनुभव घेत असतांना सतत डोळ्यासमोर एखादा शेतकरी किवा कुठेतरी श्रम करणारा मजूर या माहितीच्या अधिकाराचा कधीतरी वापर करु शकतील काय? असा प्रश्न अर्जदाराच्या मनात येऊन गेला.
माहिती देणारे अधिकारीच माहिती देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असले तरी थोडे संयमाने आणि धीराने अर्जदाराने पाठपुरावा केल्यास अधिका-यांनाही आपण वठणीवर आणू शकतो हा विश्वास कायद्याने दिला आहे. त्यामुळे माहिती अधिकार कायद्याची ही लढाई सुरुच राहणार आहे!
ओंकार तुळसुलकर, सावंतवाडी
९४२३३०१७६२



संपादकिय *
कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिका-यांचे इथे काम नाही!
प्राथमिक शिक्षक बदल्यांच्या संदर्भात ‘कडक‘ धोरण स्विकारणा-या आणि प्रशासनाला शिस्त लावू पाहणा-या सिधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौ. अश्विनी जोशी यांची वर्षभरातच बदली करुन राज्य सरकारने जि.प.मध्ये मनमानी करणारे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची पाठराखण केली आहे.
अर्थात भारतीय प्रशासन सेवेतून राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या उच्चशिक्षित, उच्चपदस्थ अधिका-यांना हा अनुभव नवा नाही. यापूर्वीही मंत्र्यांची, लोकप्रतिनिधींची नाराजी ओढवून घेतलेल्या अधिका-यांना तडकाफडकी बदल्यांना सामोरे जावे लागलेले आहे, परंतु सध्या देशभर भ्रष्टाचाराच्या विरोधात वातावरण निर्माण झालेले असतांना उच्चपदस्थ अधिका-यांच्या धोरणामुळे भ्रष्टाचार करता येत नाही किवा ते कठीण झाले असे वाटणारे लोक शिरजोर होतील अशीच राज्य सरकारची पावले पडत आहे.
जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जोशी यांची बदली मुंबई येथे झाली आहे. त्यामुळे त्यांची बदली सोयीची असल्याची त्यांची भावना असेल. परंतु जि.प.मधील थोडेफार कर्तव्यदक्ष व भ्रष्टाचारमुक्त असे अधिकारी, कर्मचारी असतील त्याना आणि जि.प.तील सार्वत्रिक भ्रष्टाचाराला वैतागलेल्या संबंधीत लोकांच्या दृष्टीने त्यांची तडकाफडकी झालेली बदली क्लेषदायक ठरु शकेल. कारण डॉ. जोशी यांनी प्रशासनातील बेशिस्तीला आळा घालण्याचे आणि प्रशासन भ्रष्टाचारमुक्त करण्याचे प्रामाणिक प्रयत्न चालविले होते, अशी त्यांच्याबाबत चर्चा होती. त्या मूळच्या कोकणातील (चिपळूणच्या) असल्याने त्यांना कोकणी माणसाची मनोवृत्ती आणि इरसालपणा चांगलाच माहिती असावा. परंतु जिल्हा परिषदेतील बहुसंख्य अधिकारी हे घाटावरुन आलेले. प्रशासन व्यवस्थेत मुरलेले. त्यांनी संघटीतपणे इथल्या लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या काही मंडळींना हाताशी धरुन पद्धतशीरपणे डॉ. जोशी यांना वर्षभरातच दूर करण्यात यश मिळविले आहे. त्यात त्यांना शिक्षक बदल्यांचे प्रकरणही जोडीला मिळाले.
जि.प.च्या बदल्यांमध्ये, नेमणुकांमध्ये करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल होते अशी चर्चा आहे. बहुतेक बदल्या या ग्रामसेवक, आरोग्य खात्यातील कर्मचारी आणि प्राथमिक शिक्षकांच्या असतात. कारण जि.प. प्रशासनात त्यांची संख्या जास्त आहे. गावोगावी काम करणा-या या शिक्षक किवा अन्य कर्मचा-यांमध्ये त्यांना आपला मतदार आणि आपला प्रचारकही दिसत असतो. हेही एक कारण लोकप्रतिनिधींनी या बदल्यांमध्ये रस घेण्यामागे असावे. त्यापैकी पैसे देतील त्यांची बदली त्यांना सोयीस्कर ठिकाणी व जे देणार नाहीत किवा कमी देतील त्यांची गैरसोयीच्या ठिकाणी अशी सरळ विभागणी असते. तरीही त्यात कमी सोयीची, कमी गैरसोयीची अशीही पोट विभागणी असते. हे असे सर्वच जिल्ह्यांमध्ये चाललेले असते.
गेली अनेक वर्षे वरीष्ठ अधिका-यांच्या संगनमताने चाललेला हा धंदा यावर्षी बंद पडल्याने क्रोधीत झालेल्या जि.प.सदस्य, पदाधिकारी व अधिकारी यांनी पालकमंत्री नारायण राणे यांच्याकडे तक्रार केली. परंतु राणे यांनी यावर काहीच निर्णय दिला नाही. उलट या बदल्या योग्य असल्याचे सांगितले होते. परंतु नंतर कुठे कशी चक्रे फिरली कोणास ठावूक! डॉ. अश्विनी जोशी यांची बदली झाल्याची बातमी आली. त्यामुळे ‘बदलीग्रस्त‘ शिक्षक, कर्मचारी, जि.प. सदस्यांसह अनेकांना हर्षवायू झाला असेल. पण तो दर्शविणे सध्या गैरसोयीचे असल्याने त्यावर फारशी जाहीर प्रतिक्रिया उमटली नाही.
या बदलीमुळे डॉ. जोशी यांची सोय झाली असेल. परंतु कर्तव्यदक्ष अधिका-याला अशा अपमानास्पद प्रकारे जिल्ह्याचा निरोप घ्यावा लागला याचे वैषम्य बहुसंख्य लोकांना निश्चितच वाटले असणार. त्यामुळे एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिका-यांचे या जिल्ह्यात काहीएक चालणार नाही. एकतर त्यांनी प्रस्थापित भ्रष्ट प्रशासन यंत्रणेशी जुळवून घ्यावे, लोक प्रतिनिधींशी संगनमत करुन स्वतःसुद्धा जमेल तेवढा भ्रष्टाचार करावा आणि आपले आसन स्थीर ठेवावे!
डॉ. जोशी यांच्या बदलीनंतर या जिल्ह्यात आलेले नवे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी हे नक्षलवाद्यांनी घेरलेल्या गडचिरोलीसारख्या दुर्गम आदिवासी व मागास जिल्ह्यातून आले आहेत. कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिका-यांना ‘शिक्षा‘ म्हणून ह्या जिल्ह्यात नेमणूक दिली जाते. तथा नवीन आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी तशा प्रकारचे असतील तर या जिल्ह्यातही ते डॉ. अश्विनी जोशी यांच्याप्रमाणेच प्रशासनात शिस्त आणण्याचा प्रयत्न करतील-नव्हे जनतेची तशीच अपेक्षा आहे. मग पुन्हा त्यांच्याही बदलीसाठी सूत्रे हलू लागतील, ती केव्हा हे पहायचे.

विशेष *
प्राचीन खजिन्याची किल्ली
प्रसाद मासिकाच्या मे २०११ अंकात श्री. आशुतोष बापट यांनी कसाल नजिक हिवाळे येथे असलेल्या कातळावरील प्राचीन चित्रांची माहिती दिली आहे. याचप्रमाणे मालवण तालुक्यात बुधवळे इथे राजापूर तालुक्यात निवळी फाटा येथे व तारव्याचा सडा या ठिकाणीही अशा स्वरुपाची चित्रे अस्तित्वात असल्याची माहिती दिली आहे. आमच्या मोहिमेमध्ये सामील असलेले श्री. शिवप्रसाद देसाई यांनी दोडामार्ग तालुक्यात ‘आई‘ या गावीही अशी चित्रे पाहिल्याचे सांगितले. मुख्य रहदारीच्या मार्गापासून दूर, उघड्या मोकळ्या सड्यांवर अशाप्रकारे चित्र, खुणा रेखाटणारी संस्कृती वा समाज आजच्या ज्ञात इतिहासाला अज्ञात आहे. एवढेच नव्हे तर अशाप्रकारची फार मोठ्या आकारातील शे-दोनशे फूट लांबी रुंदीचा संलग्न पसारा असणारी रेखाचित्रे, भारतीय प्राचीन अवशेषांमध्ये देखील एकमेवाद्वितीय अशी आहेत. इतरत्र कुठेही आढळलेली नाहीत.
ज्या ठिकाणी पाण्याचा एखादा झरा, विहीर अशा प्रकारचा एकमेव स्त्रोत ज्या सा-या परिसरात उपलब्ध असेल, अशाच ठिकाणी ही चित्रे आढळून आलीत. असे साम्यस्थळ इथे जाणवले. या चित्रखुणा वर्षांनुवर्षे काळाच्या मा-यापुढे पावसा-वा-याने झिजल्या आहेत. गवताच्या बेलगाम वाढीने अस्पष्ट, दिसेनाशा झालेल्या आहेत. कोकणातल्या तमाम आबालवृद्धांना आमचे आवाहन आहे की, अशा प्रकारच्या खुणा, कोरलेले कातळ आपल्या आसपास, आपल्या माहितीत असतील, तर कृपया आम्हाला जरुर कळवावेत. आम्ही ही सारी माहिती योग्य त्या संशोधकांपर्यंत पुढे पोहचवायचा प्रयत्न करु.
मोबाईलवर फोटो काढणे सहज सोपे झाले आहेत. तसे आम्हाला ई-मेलवर पाठवावेत. चित्रे, रेखाटने, वा शिल्पे ज्या जशा स्थितीत असतील त्यांचे, हानी न पोहचवता, बदल न करता तपशील कळवा.
आपल्या जाणकार पूर्वजांनी फार चांगल्या रितीने असे अवशेष खुणा जपायची तजवीज करुन ठेवलेली आहे. हिवाळेतील सदर चित्रांची जागा हा देवराईचा भाग आहे. त्यामुळे स्थानिक धनगर व ग्रामस्थ तिथला एखादा छोटासा दगडही इकडचा तिकडे आपणहून हलवित नाहीत. ज्या खड्ड्यातून तिथले महापुरुषाचे मंदिर बांधण्यासाठी चिरे काढले गेले तेथून ते मंदिरापर्यंत नेतांना वाटेत पडलेले, आज शेकडो (हजारो) वर्षे तसेच त्या काळाची, त्या घटनांची साक्ष द्यायला जशाचे तसे पडून आहेत.
हिवाळेच्या सड्यावर तीन गोष्टींचा आम्हाला एकमेकांशी घनिष्ठ संबंध असल्याचे जाणवले. पहिली गोष्ट म्हणजे साधारण दहा फूट खोल असलेली व पाच फूट घेराची चि-यांनी बांधलेली प्राचीन विहिर. हा त्या सा-या सपाट उंच पठरावरील एकमेव पाण्याचा स्त्रोत आहे. पाण्याची चव गोड आहे. तिला ‘फराळाची भाब‘ म्हणतात. भाब या शब्दाचा अर्थ पाण्याचा खोलगट भाग असा होतो. ‘फराळाची‘ कारण वर्षातून एकदा स्थानिक लोकांचा इथे महाप्रसादाचा, जेवणाचा सामुदायीक कार्यक्रम होतो. विहिरीच्या चार हात दूर लागून एक चिरे रचून बांधलेली तळी आहे. उन्हाळ्यात तिच्यात सुकलेला चिखल उरला होता व तळाशी असलेली शंकराची छोटीशी पिड स्पष्ट दिसत होती. तळीच्या एका बाजूने घाटाप्रमाणे तळापर्यंत पोहोचणा-या पाय-या आहेत. संपूर्ण हिवाळे पंचक्रोशीत फक्त या तळीत कमळे आढळतात. अशी स्थानिकांनी माहिती दिली. उघडच आहे, कमळांची बीजे मुद्दाम आणून या तळीत रुजवलेली आहेत.
आदीमानवांच्या काळात पाण्याचे साठे दर्शविण्यासाठी त्या परिसरात मुद्दाम काही खाणाखुणा निर्माण केल्या जात. कातळांवर चित्रे काढली जात. त्या मानवनिर्मित खुणा पुढे येणा-या टोळीला मार्गदर्शन करत की, इथे जवळपास पाणी आहे. मात्र त्या जमिनीवर शे दिडशे फूट लांबी रुंदीत काढल्या जात नव्हत्या. याशिवाय आदीमानवांकडून चिरे खणून काढून, तासून, घडवून त्याची बांधकामे केली जात नव्हती.
हे अशाप्रकारचे बांधकाम विहीरी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महापुरुषाच्या मंदिराचे आहे. त्यात चिरे साधण्यासाठी चुना वा इतर कोणताही पदार्थ वापरलेला नाही. हेमाडपंथी देवळांप्रमाणे एकात एक अचूक बसणारे दगडांचे आकारही नाहीत. तरीही कुशलतेने दगडांना आकार देऊन ते नुसते रचलेले आहेत. मूळ गुहेच्या तोंडावर ती बंदिस्त करण्यासाठी केले गेलेले बांधकाम आहे. दूरवरुन ती जागा लक्षात येण्यासाठी कळस बांधलेला जाणवतो. या दगडांवर कोणतेही कोरीव काम वा चित्रे नाहीत. घुमटामुळे असलेला प्रवेशद्वाराचा तोरणासारखा भाग आता गेल्या दहा-बारा वर्षात कोसळलेला आहे. जेमतेम एक माणूस वाकून रांगत जावू शकेल असे बिळासारखे दार आहे. त्यातून रांगत आत गेले की,बरीच मोठी गुहा आत आहे. पुरुषभर उंचीची व पंधरा-वीस फुट लांबी रुंदीची समोरच छोटेखानी फुटभर चौथ-यावर दगडी पादुका आहेत. त्यांची पूजा होते. एका कोप-यात छोटे दार असून ते अजून आत एका छोट्या गुहेत नेते. काळोखामुळे तिथे पुढे जाता आले नाही. दगडात घडविलेल्या गुहेत एका कोप-याची जमिन मातीची आहे. लहानग्यांकडून माहिती मिळाली की ते बुजलेले भुयार आहे.
या गुहामंदिरासमोर एक अरुंद घळ आहे. ज्यातून पावसाळ्यात पाणी वाहत जाते. त्यापलिकडे पठार आहे. ज्यावर उठाव चित्रे आहेत. जिथून बांधकामाला चिरे काढले तो खड्डा आहे. ही चित्रे साधारण ३ इंच जाडीच्या रेषांनी व ३ इंच खोलीचे खोदकाम करुन बनवलेली आहे. मात्र त्यात गवताची मुळे वर्षानुवर्षे घट्ट रुजल्याने ती झाकली गेली आहेत. ती सारी व्यवस्थित साफ करुन पुरातत्व शास्त्राच्या विहीत प्रक्रियांनुसार मोकळी केली गेली तर सुस्पष्ट होतील. अशा संशोधनासाठी खास प्रकारची प्रकाशयोजना वापरणारे कॅमेरे वापरले जातात. खुणा स्पष्ट झाल्या की त्यांचा अर्थ लावणे सोपे जाईल.
बेंगळूरमधील एका इतिहास शास्त्रकारांनी या चित्राविषयी एक प्रबंध इतिहास परिषदेत वाचलेला आहे. प्रत्यक्ष जागेला भेट न देता, केबिनमध्ये बसून संशोधन करणा-या अशा शास्त्रकारांबद्दल व त्यांच्या दिव्यचक्षूंबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे. आमच्या देशी शास्त्रज्ञांचा व सरकारी पुरातत्व खात्याचा हा नेहमीचा खाक्या आहे. देशी विद्यापीठांतील प्राध्यापक वर्गाने अध्यापनासोबत संशोधन करावे की नाही, ही त्यांच्या दृष्टीने वादग्रस्त बाब आहे. जर पैसे मिळणार तर आम्ही विचार करणार, अशी उत्तरे आमच्या लोकांकडून मिळाली. मात्र विदेशातील विद्यापीठांतील काही प्राध्यापकांनी ताबडतोब इ-मेलला उत्तरे पाठविली. कधी येऊ ते कळवा म्हणून उत्साह दाखवला. ते येतील. पदरखर्च करुन संशोधन करतील. काही नवीन सत्ये जगासमोर आणतील. मग आमची सरकारी खाती हलतील. आम्हाला न विचारता तुम्ही संशोधन केलेच कसे? म्हणून जाब विचारतील. ही जागा पुरातत्व खात्याने ताब्यात घेतली आहे म्हणून पाटी लावतील. त्यानंतर कोणालाही या जागी सरकारी माणसांचे हात ओले केल्याशिवाय फिरकायलाही मिळणार नाही. महाराष्ट्रातील अनेक प्राचीन गडकोट आणि लेण्यांची ही अवस्था आहे. स्थानिक गावक-यांच्या, ‘चित्रे‘ बघायला पर्यटक येतील, त्यांच्या सरबराईच्या रुपात व्यवसाय - धंद्याच्या संधी निर्माण होतील या अपेक्षा हवेतच राहतील. असो.
या चित्रांच्या बाबतीत अर्थातच ती कोणी बनवली? केव्हा बनवली? आणि का बनवली? या तीन प्रश्नांची उत्तरे शोधणे खरे आव्हान आहे. गावक-यांकडून मिळणारी माहिती व त्यांच्यातील समजूती यासाठी कोणतीही विशेष मदत करु शकत नाहीत. जसे सिधुदुर्गात इतरत्र कोठेही दगडी घडीव फार जुने बांधकाम असले की त्यावर ‘पांडवांनी एका रात्री बांधले‘ असा शिक्का मारला जातो. तसेच गावकरी या चित्रांबाबत सांगतात, पांडव एका रात्रीत खेळ खेळले ती ही चित्रे. महापुरुषाचे मंदिर म्हटले गेले तरी, दारावर बांधलेली पितळी घंटा व आतमध्ये असलेल्या पादुका (ज्या मुळ कोरीव दगडाचा भाग नाहीत. मागाहून ठेवलेल्या असू शकतात.) या दोनच खुणा मंदिरदर्शक आहेत. महापुरुषाचे मंदिर म्हणून हा सारा भाग वयात आलेल्या स्त्रियांना निषिद्ध आहे. पादुका सोडल्या तर इतर कोणत्या गोष्टीची पूजा होत नाही. गावक-यांच्या रुढी, विधींमध्ये सड्यावरील चित्रांना कोणतेही स्थान नाहीत. प्रत्येक जाणता माणूस आम्हाला चित्रे आहेत की ती लिपी आहे की अजून काही माहित नाही, असे सांगतो. मात्र छोट्या निरागस मुलांनी माहिती दिली की, मंदिरातील भुयारात शिरले की एक एक सात खोल्या आहेत. जो कोणी सड्यावरील चित्रात घातलेले कोडे सोडवणार त्यालाच त्या खोल्या सापडतील व त्यातील सिद्धींचा खजिना. पिढ्यान पिढ्या धनगरांनी जपलेले हे रहस्य (आजोबांनी) लहानग्याला सांगितले होते.
ही चित्रे म्हणजे एखादा नकाशा आहे का? आपल्या सिधुदुर्गात अशा गुप्त भुयारांसंबंधीत अनेक जुन्या आख्यायिका आहेत. वेंगुर्ल्यात डच वखार ते यशवंत गड असे भुयार असल्याची बोलवा आहे. तुळसमधील वाघेरीचा डोंगर व त्यावरील सिद्धपुरुषाची असलेली गुहा वेंगुर्ल्यातील मूठच्या टोकाकडे कड्याखाली समुद्रात उघडते. तिथेही स्त्रियांना मज्जाव आहे. जिल्हाभर विखुरलेली दूर दुर्गम सड्यांवरील ही भुयारे म्हणजे जुन्या काळातील विजनवासातील आश्रयस्थाने आहेत का? ही चित्रे या भुयारी जाळ्यांचे नकाशे व आराखडे आहेत का? त्या भुयारांतून प्राचीन संपत्ती व खजिने दडवलेले आहेत का?
बोलता बोलता जुन्या जाणत्या भाऊ फौजदारांनी सांगितले की, पूर्वी एक कुत्रा महापुरुषाच्या मंदिरातील भुयारात शिरला व देवगड तालुक्यातील श्रावण या गावी बाहेर पडला, अशी बोलवा आहे.
महापुरुष, सिद्धपुरुष अशा नावांनी ही स्थाने नाथपंथियांशी संबंधीत आहेत. ह्या चित्रखुणा म्हणजे अजून उलगडा न होऊ शकलेली साबरी लिपी व त्यातील लेख आहेत का? त्यांच्या उपासनेची गुप्त स्थाने आहेत का? चि-यांचा रचीव बांधकामांचा काळ हा त्या काळाशी जुळतो. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या शे-सव्वाशे वर्षे आधीच्या कालखंडाशी. हाच कालखंड विजयनगरच्या साम्राज्याशी जुळतो. कुडोपी-हिवाळे येथील दोन डोक्याच्या गरुडाचे चित्र हे याच साम्राज्याचे कुलचिन्ह आहे. हा गरुड गंडभेरुड म्हणून ओळखला जातो. सिधुदुर्गातील अनेक लाकडी कोरीव मंदिरशिल्पांमध्ये हे दोन डोक्याच्या गरुडाचे चिन्ह आळढते.
अशा प्रकारच्या उत्पत्तीही अनेक आहेत. सरकारी खाती किवा संशोधक गेली दहा वर्षे या चित्रांचे अस्तित्व शहरी समाजाला ज्ञात होऊनही थंड आहेत. पण खजिन्याची आणि साहसाची ओढ असेल तर या चित्रांचा मागोवा तुम्ही घेऊ शकता. चित्रांचे कोडे सर्वांना खुले आहे. पाहा तुम्हाला तरी उलगडते का? कुडाळपासून कणकवलीला जाणा-या हमरस्त्यावर कसाल सोडले की २ कि. मी. अंतरावर डावीकडे जाणारा एक फाटा आहे. तो राठिवडे, हिवाळेला जातो. ओवळीये गाव सोडले की, पुढे नऊ आंबुली म्हणून थांबा येतो. तिथून कच्चा रस्ता उजवीकडे आत डोंगरावर जातो. त्याच्या टोकाशी गाडी सोडून स्थानिक माहितगार मदतीला घेऊन डोंगर चढून वर जावे लागते. साधारण २५ मिनिटांचा चढाव आहे. वर खड्यावर धनगरांच्या १०-१२ उंब-यांच्या वाडीपर्यंत सुमारे २० मिनिटे चालावे लागते. मंदिर व चित्रे तिथून हाकेच्या अंतरावर आहेत. चित्रांचा उलगडा झाल्यास कळवायला विसरु नका! खजिना ठेवा तुम्हाला, ज्ञान द्या आम्हाला.
किशोर सावंत, दोडामार्ग



कृष्णलीला
हल्लीच सावंतवाडीत ‘संभवामी युगे युगे‘ या महानाट्याचा नेत्रदिपक आणि सर्वांर्थाने सुंदर असा प्रयोग पाहिला. या महानाट्यातील ‘कृष्ण-सुदामा भेटीचा‘ प्रसंग पाहून मला माझ्या प्राथमिक शालेय जीवनातला प्रसंग आठवला.
शाळेमध्ये ‘विविध करमणुकीचे कार्यक्रम‘ होणार होते. नाच, नकला, नाट्यप्रवेश असे ‘आयटेम‘ होते. मी बहुधा इयत्ता ३रीत असणार - उमर वय वर्षे ९ किवा १०! आमच्या गुरुजींनी शालेय पाठ्यपुस्तकातला ‘सुदाम्याचे पोहे‘ हा नाट्यप्रवेश सादर करण्याचे ठरवले. ‘स्क्रिप्ट‘ तयार होतेच. पात्रे दोनच! कृष्ण आणि सुदामा!!! कृष्णाच्या भुमिकेसाठी वर्गातल्या एका गोड चेह-याच्या गुटगुटीत धीट मुलाची निवड केली होती. कृष्णाच्या पाट्यार्साठी ‘मोरपीस‘ मिळविण्यात आले. सुदाम्यासाठी माझी अंगकाठी किवा शरीरयष्टी होतीच. (फाटक्या ठिगळ लावलेल्या) धोतरांची घरात कमतरता नव्हती. डोक्यावर कानटोपी सदृष्य ‘टोपी‘ दिली गेली. बरगडीन् बरगडी मोजून घ्यावी असे एकमेव पात्र वर्गामध्ये मीच असल्याने सुदाम्याच्या भुमिकेसाठी माझी निवड सार्थ ठरणार होती. याशिवाय आमच्या पाठांतरावर गुरुजींचा विश्वास होता. या सर्वांमुळे ‘सुदाम्याचे पोहे‘ सादर करण्याचे निश्चित झाले. प्रत्यक्ष कार्यक्रमाआधी दोन आठवडे तालमी घेतल्या गेल्या. (या तालमीचे निमित्ताने अभ्यासाला ‘सुट्टी‘ मिळत असे हा मोठा प्लस पॉईंट होता!)
कार्यक्रमादिवशी आमचा ‘आयटेम‘ चौथा-पाचवा होता. कृष्ण खरंच दृष्ट लागण्यासारखा नटवला होता. सुदाम्याला कुणाची दृष्ट लागण्याचा प्रश्नच नव्हता. आमचे आई-वडील प्रेक्षकात हजर होते. (त्यावेळी आई-वडिलांचे ‘पालक‘ झाले नव्हते!) आई-वडील, वर्गमित्र, गुरुजी, बाई, कन्याशाळेतल्या मुली असा ‘प्रेक्षकवर्ग‘ होता. गावातील मान्यवरही होतेच. (ही मंडळी ‘आर्थिक भार‘ उचलत असत पण त्यांना ‘प्रायोजक‘ ही संज्ञा नव्हती.)
आमच्या नाट्यप्रवेशाची वेळ झाली. गुरुजींनी कृष्णाला स्टेजवर ‘धाडले‘. कृष्ण माझ्या एन्ट्रीची वाट पहात ‘महालात‘ येरझारा घालीत होता. विगेमधून ‘प्रेक्षक‘ पाहूनच माझे पाय लटपटू लागले. कपाळावर व शरीराच्या शक्य असेल त्या भागातून घाम येत होता. धोतर, कानटोपी, पडशी (त्यात खरंच पोहे होते) सांभाळत (गुरुजींनी ढकलल्यामुळे) सुदाम्याची एंट्री झाली. कृष्णाने मला पाहून त्याचा डॉयलॉग चोख म्हटला असावा. कृष्ण माझ्या ‘डॉयलॉगची‘ वाट पहात परत येरझारा घालत होता. गुरुजी आतून ‘प्रॉम्प्टींग‘ करत माझा संवाद (प्रेक्षकांना एकू जाईल एवढ्यानं) सांगत होते. पण माझा घसा कोरडा पडला होता. काहीच ऐकू येत नव्हते. शेवटी कृष्णच सुदाम्याच्या मदतीला धावून आला. सुदाम्याचे डॉयलॉग कृष्णाने प्रश्नार्थक रुपात विचारुन मला ‘चालना‘ देण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्ष परमेश्वर हतबल झाला! प्रेक्षकांमधून टाळ्या, हशा, पडदा! पडदा!! असे आवाज ऐकू येऊ लागले. एवढ्यात मला कसे अन कां सुचले हे ‘श्रीकृष्णच‘ जाणे, मी मूळ स्क्रीप्टमध्ये नसलेला डॉयलॉग म्हणत कृष्णाला हात धरुन विगमध्ये जवळजवळ ओढत नेले. मला ऐनवेळी सुचलेला डॉयलॉग होता- ‘‘चल मित्रा, मी प्रवास करुन खूप दमलो आहे. तुझ्या महालात आत जाऊनच बोलूया!!!‘‘
सुदाम्याने कृष्णाला ओढत नेण्याचा प्रसंग या पृथ्वीतलावर प्रथम अन् शेवटचाच घडला असावा. सर्वात कहर म्हणजे या आमच्या नाट्यप्रवेशातील कृष्णाला पहिले बक्षिस तर मला ‘उत्तेजनार्थ‘ बक्षिस मिळाले. कृष्णलीला... नाहीतर दुसरे काय म्हणायचे?
डॉ. मधुकर घारपुरे, सावंतवाडी

विशेष बातम्या *
महामँगोचे होणार पुनरुज्जीवन ः ९ कोटींचा निधी
वेंगुर्ल्यात साकारणार फलोत्पादन महाविद्यालय
कुडाळ येथील महामँगो संस्थेची दीड कोटी थकीत रक्कम सिधुदुर्ग जिल्हा बँकेला देऊन पणन विभागामार्फत महामँगोच्या पुनरुज्जीवनासाठी ४ कोटी रुपये देण्यात येतील. सिधुदुर्गनगरीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डच्या २५ एकर जागेसाठी ५ कोटी रुपये देण्यात येतील. तेथे कोल्ड स्टोरेज, अन्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. वेंगुर्ले येथील फलोत्पादन महाविद्यालयालाही मंजूरी देण्यात आली. आंब्यातील साका तपासणी केंद्र सुरु करायला अडीच कोटीचा खर्च आहे. सुरुवातीला वेंगुर्ले येथे केंद्र सुरु करण्यात येऊन टप्प्याटप्प्याने मालवण, देवगड येथे साका तपासणी केंद्र सुरु करण्यात येईल. राज्याचे कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सिधुदुर्गनगरीमधील कृषी व पणन विभागाच्या खरीप आढावा बैठकीत जाहीर केले. यावेळी पणनमंत्री विखे पाटील यांनी सिधुदुर्गातील बागायतदारांचे प्रश्न जाणून घेतले. मिश्र खत पुरवठ्याच्या बाबतीतील समस्या लवकरच दूर केल्या जातील असे आश्वासन दिले.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री नारायण राणे, खासदार डॉ. निलेश राणे, जि.प.अध्यक्ष सुमेधा पाताडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
शिवाजीराव कुबल यांचा पाठपुरावा
वेंगुर्ले येथे कोकण कृषी विद्यापीठाचे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र १९५० साली स्थापन करण्यात आले. या केंद्राशी संलग्न अशी चार उफद्रही स्थापन झाली. कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेमध्ये झालेल्या सातत्याने पाठपुरावा आणि फलोद्यान महाविद्यालयाची मागणी शिवाजीराव कुबल यांनी लावून धरली होती. हा प्रस्ताव विद्यापीठाच्या कार्यकारी समितीने मंजूर करुन अंतिम मंजूरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला होता. त्याचाच परिपाक म्हणजे तातडीने वेंगुर्ले येथल्या फलोत्पादन महाविद्यालयाला तातडीने मंजूरी मिळाली आहे.

२३ जणांना कृषी पुरस्कार
महाराष्ट्र शासनाने वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रासह सिधुदुर्ग जिल्ह्यातील २३ शेतक-यांना विविध शेतीविषयक पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यांचा गौरव समारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते १ जुलै २०११ रोजी पुणे झाला.
राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शासनाने शेतक-यांना हे पुरस्कार जाहीर केले होते. पुरस्कारप्राप्त शेतक-यांची नावे पुढीलप्रमाणे - वसंतराव नाईक-कृषीभुषण पुरस्कार-फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले, शिवाजी रमाकांत कुबल-वेंगुर्ले, गोपुरी आश्रम- वागदे, हेगडेवार स्मृती सेवा प्रकल्प माणगाव, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, सौ. सुहासिनी उत्तम वैद्य-मातोंड, शेतिनिष्ठ पुरस्कार - रावजी बापू चव्हाण - वराड-मालवण, अरुण गजानन कांबळी-वायंगणी-मालवण, लक्ष्मण धोंडू नाईक-आसोली-वेंगुर्ले, प्रकाश सेनापती दळवी, होडावडे-वेंगुर्ले, शिवराम गोविद गोगटे - वेतोरे-वेंगुर्ले, मनोहर बाबू पेडणेकर-चिचवली-कणकवली, मधुकर सिताराम घोगळे-नेमळे-सावंतवाडी, श्रीपाद शंकर मांजरेकर-नाधवडे -वैभववाडी, रघुनाथ विठ्ठलराव नाईक-आरोस-सावंतवाडी, विजय वसंत प्रभू-काळसे-मालवण, लक्ष्मण राजाराम परब-कुणकेरी-सावंतवाडी, बाजीराव झेंडे-हिर्लोक-कुडाळ, शरद गणपत धुरी-झाराप-कुडाळ, उद्यान पंडित पुरस्कार - प्रसन्ना तुकाराम कुबल-वेंगुर्ले, बाळकृष्ण गणेश गाडगीळ-वेतोरे, विलास अनंतराव ठाकूर-मठ, सूर्यकांत महादेव देऊलकर - दोडामार्ग

पालकमंत्री नारायण राणे यांचा वेंगुर्ल्यात बुद्धिवंतांशी संवाद
समाज घडविणे ही बुद्धिजीवी लोकांचीही जबाबदारी आहे. अशा लोकांनी एकत्र येऊन आपल्या ज्ञानातून समाजाचा विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे पालकमंत्री नारायण राणे यांनी सिद्धिविनायक मंगल कार्यालयात ३० जूनला शहरातील बुद्धिजीवी नागरिकांशी बोलतांना सांगितले. तालुका काँग्रेसतर्फे आयोजित या कार्यक्रमास व्यासपीठावर खासदार डॉ.नीलेश राणे, आमदार राजन तेली, माजी आमदार शंकर कांबळी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, काँग्रेस प्रवक्ते काका कुडाळकर, नगराध्यक्ष संदेश निकम, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संजय परब उपस्थित होते. तालुकाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी स्वागत केले.
उपस्थितांपैकी काही नागरिकांनी आपले प्रश्न व समस्या मांडल्या. नागरी कृती समितीचे अध्यक्ष अतुल हुले यांनी शहरातील पाणीटंचाई व जिल्ह्यात पर्यटनाविषयी पायाभूत सुविधांचा अभाव हा प्रश्न मांडला. बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. शंकरराव पाटील यांनी शहरातील गटार योजनेसह अन्य मूलभूत सुविधा पूर्ण कराव्यात, अशी मागणी केली. लायनेस क्लबच्या अध्यक्षा सौ. स्मिता डुबळे यांनी येथे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे स्मारक व्हावे, खर्डेकर कॉलेजचे प्राध्यापक नरगच्चे यांनी महाविद्यालया -तील बारावीच्या प्रवेशप्रक्रियेतील मर्यादित क्षमता १०० वरुन १५० करावी. मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश्वर उबाळे यांनी ग्रामीण रुग्णालयातील समस्या मांडल्या. आंबा बागायतदार भूषण नाबर यांनी आंबा फवारणीसाठी केरोसीनचा पुरवठा करावा. संजय पुनाळेकर यांनी शहरातील देवस्थान इनाम जमिनीचा प्रश्न सोडवावा. लायन्स अध्यक्ष नीला यरनाळकर यांनी पाणी टंचाईबाबत, महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर व काजू कारखानदार दिलीप सामंत यांनी काजूवरील कर परतावा मिळावा, डॉ.प्रसाद साळगांवकर यांनी जिल्ह्यात मेडिकल कॉलेज असावे. कैवल्य पवार यांनी डोंगरी भागाचा, राजन गिरप यांनी जिल्ह्याचा पर्यटन नकाशा चुकीचा आहे. तो नव्याने व्हावा. एस.व्ही.कदम यांनी जिल्ह्यात सैनिक शिक्षण-प्रशिक्षण केंद्र व्हावे. एस.के.बिराजदार यांनी संशोधन केंद्रात फळ रोपवाटिका अभ्यासक्रम पुन्हा सुरु व्हावा अशा सुचना मांडल्या.
यावर पालकमंत्री श्री. राणे यांनी आढावा घेतांना सांगितले की, ‘वेंगुर्ले तालुक्याबाबत माझ्या मनात भावनिक स्थान आहे. ब्रिटिशांच्या काळात स्थापन झालेली ही पालिका अजूनही पाहिजे त्या प्रमाणात प्रगतीकडे गेली नाही. गेल्या पालिका निवडणुकीत पूर्ण सत्ता काँग्रेसकडे द्या. मग शहराचा विकास कसा होतो ते पहा, असे सांगितले होते, मात्र दुर्देवाने काँग्रेसला या निवडणुकीत मोठे यश आले नाही. वेंगुर्लेवासीयांनी मांडलेले प्रश्न व समस्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करु.‘
नगरसेवक अॅड. शशांक मराठे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास शहरातील सुमारे ३०० नागरिक उपस्थित होते.
भुयारी गटाराचे काम पूर्ण करावे
वेंगुर्ले शहरातील बहुचर्चित असलेल्या भुयारी गटाराचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश आपण ठेकेदाराला दिले आहेत. यात काही अडचण आल्यास आपल्याशी संफ साधावा, असे आपण ठेकेदाराला सांगितल्याचे श्री. राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

अंक २४वा, ३० जून २०११

अधोरेखीत *
वर्षा पर्यटनाचा बहर
उन्हाळी सुट्टीतील पर्यटनाचा हंगाम संपला की, अलिकडच्या काळात बहरलेल्या ‘वर्षा पर्यटनाचा‘ हंगाम सुरु होतो. डोंगर-माथ्यावरुन कडेकपारीतून पडणारे पाणी कुठे मोठ्या धबधब्याच्या स्वरुपात तर कुठे कड्यावरुन खाली दगडधोंड्यातून उड्या मारत अवखळत येत असते. अगदी अरसिक माणसालाही हे दृष्य भुरळ घालते. मग निव्वळ निसर्गाचा आनंद लुटायला गेलेल्या हौशी मंडळींची काय कथा? हे लोक मग त्या कोसळणा-या धबधब्यातच शिरतात.
कोकणात विशेष करुन सिधुदुर्ग-रत्नागिरीत अशी पावसाळी वर्षा पर्यटनाची सहल काढण्यासारखी अनेक ठिकाणे निसर्गानेच निर्माण केली आहेत. वेंगुर्ले - बेळगांव रस्त्यावरचे आंबोली हे हिलस्टेशन गेल्या १०-१५ वर्षात पावसाळ्यात गजबजलेले असते.
गेल्या २ वर्षात घाट कोसळण्याच्या घटनांमुळे इथल्या पर्यटनाला घरघर लागलीय. यंदाही मागील वर्षाच्या ठिकाणी पुन्हा दरड कोसळल्याने घाट आठ दिवस बंद होता. या घाटाला केसरी - फणसवडेचा पर्यायी मार्ग झाल्यास अवजड वाहतूक त्यामार्गे वळवल्यास आंबोली घाटाचा ताण कमी होईल. अजून पर्यायी मार्ग अस्तित्वात येण्याअगोदरच मार्गाचा प्रस्ताव सर्वप्रथम कोणी ठेवला? यावर आमदार दीपक केसरकर आणि विधानपरिषद आमदार राजन तेली यांच्यात श्रेयवाद सुरु आहे. राजकीय वादांमध्ये रस्ता तिथेच अडकू नये अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.
आंबोलीतील या धबधब्यांप्रमाणे चौकुळ गावानजिक कुंभवडे, दोडामार्ग तालुक्यात असनिये, मांगेली, देवरुखजवळ मार्लेश्वर, कणकवलीजवळ सावडाव, नापणे धबधबेही पर्यटकांसाठी आकर्षक ठरत आहेत.
मार्लेश्वर हे धार्मिक स्थळ असल्याने तसेच आंबोली, सावडाव धबधबे वगळता इतर ठिकाणी पर्यटकांची गर्दी नसते. त्यामुळे ही ठिकाणे काहीशी दुर्लक्षितच होती. यंदाही आंबोली घाटात कोसळणा-या दरडींमुळे दोडामार्गजवळील मांगेली, असनिये, तळवणे, देवगड-शिरगांव येथील सैतवडे अशा धबधबे असलेल्या ठिकाणी पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. एक दोन दिवसांच्या कौटुंबिक सहलींसाठीही अशी ठिकाणी आकर्षण ठरत आहेत.
वर्षा पर्यटन बहरण्यासाठी या सुविधांची गरज
पर्यटन स्थळांकडे कसे जायचे याची माहिती मार्गदर्शक फलक आणि होर्डिगच्या माध्यमातून व्हायला हवी. शुभेच्छांचे बॅनर्स लावणा-या राजकीय नेत्यांनी आपल्या नेतेमंडळींच्या सौजन्याने ही माहिती दिल्यास पर्यटन व्यवसायाला हातभार लागेल.
जवळपास राहण्या-जेवण्याची किफायतशीर व्यवस्था हवी.
पर्यटन स्थळे जोडणारे चांगले रस्ते, लाईट्स अशा पायाभूत सुविधा असतील तर या हंगामी स्वरुपाच्या वर्षा पर्यटनाला बहर यायला नक्कीच मदत होईल.


संपादकीय *
आव्हानांना तोंड देण्यास सज्ज व्हा!
इंग्रजांच्या राजवटीत लॉर्ड मेकॉले या इंग्रज गृहस्थानी भारतात जी शिक्षण पद्धती रुजविली तिचाच अवलंब आपण आजही करीत आहोत. तत्कालीन इंग्रज राज्यकर्त्यांना खंडप्राय भारताचा राज्यकारभार चालविण्यासाठी स्थानिक प्रादेशिक भाषा आणि इंग्रजी भाषा शिकलेली नोकरशाही हवीच होती. त्यानुसार शिक्षण पद्धती तयार करण्यात आली. त्यामागे इंग्रजांचा हेतू कोणताही असो पण, इंग्रजी व प्रादेशिक भाषांमुळे भारतात शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले. त्यांनी आखून दिलेल्या शिक्षण पद्धतीला आज आपण कितीही नावे ठेवत असलो तरी ते शिक्षण घेऊनच भारतीयांनी देश विदेशांत विविध क्षेत्रांमध्ये आपले प्राविण्य सिद्ध केले आहे, हे नजरेआड करुन चालणारे नाही.
या शिक्षण पद्धतीला आपण भारतीय वळण देण्याचा प्रयत्न केला. कालानुरुप बदल केले. व्यवसायाभिमुख नवे अभ्यासक्रम आणले. आता नवे तंत्रज्ञान, संगणकयुग हे सारे आले. त्यांचाच अवलंब करुन देशभरातील कोट्यावधी लोकांनी नोकरी, धंदा-सेवा व्यवसाय मिळविले आणि स्वतःच्या तसेच देशाच्या संपत्तीतही भर घातली. यामुळे इंग्रजांनी दिलेली शिक्षण पद्धती पूर्णतः चुकीची होती, भारतीय समाजमनाला ती पचणारी नव्हती असे म्हणता येणार नाही. आपल्या आजच्या शिक्षण पद्धतीत जे दोष निर्माण झाले आहेत ते आपले आपणच निर्माण करुन ठेवलेले आहेत.
एक तर शिक्षणावर सरकार सर्वात कमी - खर्च करते. शिक्षण पद्धतीमधील बदलांबाबत नेहमीच धरसोड केली जात असते. शिक्षणासाठी होणा-या सरकारी खर्चाचा वाटा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाही. पोचला तरी कागदोपत्री नोंद होण्यापुरता. ब-याचशा सरकारी शाळांमधील शिक्षक आणि एकूणच शिक्षणाच्या दर्जाविषयी बोलण्याचीच सोय नाही. त्यामुळे सरकारच्याच प्रोत्साहनाने खाजगी शिक्षण संस्था सुरु झाल्या. तिथे कोणतीही मोफत सुविधा नसते. उलट भरमसाठ फी मात्र वसुल केली जाते. इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि व्यावसायीक शिक्षण देणारी महाविद्यालये यांवर खाजगी शिक्षण संस्थांचाच कब्जा आहे. काही नामांकित आणि प्रामाणिक संस्था सोडल्या तर तेथील शिक्षणाचा दर्जाही सुमारच असतो. यामध्ये बहुतेक संस्था या राजकीय किवा सत्ताधारी नेत्यांच्या खाजगी मालमत्तेसारख्या असतात.
अशा सगळ्या शैक्षणिक घोळांमधून शिक्षणातले १०वी, १२वीचे टप्पे पार पडत असतात. सरकारी पाहणी नुसार पहिल्या इयत्तेपासून शिक्षणाची सुरुवात करणा-या मुलांपैकी जेमतेम २० ते २५ टक्के मुले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करतात. मधली गळती होते कशी? सरकारी शाळांत शिक्षकांचे वेतन, शाळा इमारती इतर अनुषंगीक खर्च आणि शिक्षण खात्याची यंत्रणा सरकारच पोसत असते. शिवाय शाळेत मुले यावीत आणि ती टिकावीत म्हणून त्यांना पुस्तके, वह्या, गणवेश, पोषण आहार, मोफत दिला जातो. मुलींना सायकली आणि शैक्षणिक फी माफी सर्वांनाच. असे असूनही सरकारी शाळांतील गळती चालूच असते.
सरकारी शिक्षणाची ही त-हा तर दुसरीकडे मोठ्याच नव्हे तर, लहान शहरांतूनही इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांना विद्यार्थी संख्या इतकी वाढते की त्यांना प्रवेश बंद करावा लागतो. असे का? याची उत्तरे शिक्षणखात्याच्या भ्रष्टाचारामध्ये आणि शिक्षणखात्यातील एकूण अनागोंदीमध्ये सापडतील. सरकारचे शिक्षण खाते शिक्षण संस्थांना मदत किवा मार्गदर्शन करण्याऐवजी अडचणीत आणून भ्रष्टाचार करण्यातच मग्न असते. अशी अनेक उदाहरणे आहेत.
शिक्षणाचे नियोजन आणि निश्चित धोरण नसल्यामुळेच सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढते आहे. नुसत्या पुस्तकी शिक्षणामुळे श्रमाची कामे कोणी करु पहात नाही. जीवनाचा प्राधान्य क्रम पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी असा होता. आता उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असा नेमका उलटा झालेला आहे. हे होण्यास कारणही शैक्षणिक धोरणच आहे.
आज अनेक प्रकारची प्रलोभने मुलांसमोर आहेत. विविध ज्ञानशाखांचे शेकडो अभ्यासक्रम देणा-या हजारो शिक्षण संस्था आहेत. त्याशिवाय पालक प्रशिक्षित असतील तर मुलांना संगणकाच्या आधारे आपले शिक्षण घरबसल्या घेता येईल अशी सोय नजिकच्या काळात उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारचे शिक्षणातील तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी संस्कार आणि व्यवहारी जगाची ओळख ही ज्याची त्यानेच करुन घ्यायची असते.
यावर्षी दहावी-बारावी उत्तीर्ण झालेली मुले पुढील पारंपारीक किवा व्यवसायाभिमुख शिक्षण घेण्यासाठी वरच्या वर्गात प्रवेश घेतील. त्यांचे अभिनंदन करतांना यापुढील काळातील सर्वच आव्हानांना ती तोंड देण्यास समर्थ व्हावीत यासाठी त्यांना शुभेच्छाही आपण देऊया.

विशेष *
कॅलिफोर्नियाचे स्वप्न अधुरेच!
अलीकडेच कोकणच्या भौगोलिक परिस्थितीशी साम्य असणारे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्य पाहण्याची संधी मिळाली. पर्यटन, फळप्रक्रिया उद्योग, शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कॅलिफोर्नियाने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. या प्रगतीमागे शेतक-यांची मेहनत, कष्ट, राज्यकर्त्यांचे सुयोग्य नियोजन याही गोष्टी आहेत. कॅलिफोर्नियाप्रमाणेच भौगोलिक परिस्थिती लाभलेल्या कोकणचा कायापालट घडविणे आपल्याच हातात आहे. तेथील चांगल्या गोष्टी उपलब्धतेनुसार आपल्याकडे अंमलात आणाव्यात यासाठीच हा लेखनप्रपंच.....
महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजतगायत कोकणचा कॅलिफोर्निया होणार! असे स्वप्न माझ्यासहीत कोकणी माणसांनी पाहिले आहे. त्याकरिता राज्य शासनाकडून बरेच प्रयत्न झाले आहेत आणि आजही कोकणचे नेते, उद्योगमंत्री ना. नारायणराव राणे यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यांना यामध्ये यश येईल व यावे. योगायोगाने माझी मुलगी सुयश्री हिला वचन दिल्याप्रमाणे बायो मेडिकल इलेक्ट्राॅनिक इंजिनिअरींग पदवी प्रदान कार्यक्रमाला अमेरिकेला येण्याचे कबूल केले होते. त्याप्रमाणे मी आणि माझी पत्नी सौ.अनुराधा हिच्यासमवेत तेथे कार्यक्रमाला हजर राहिलो. या २५ दिवसांच्या काळात कॅलिफोर्निया राज्या-मधील काही महत्वाची ठिकाणे, युनिव्हर्सिटी पाहण्याची, तिथली संस्कृती, लोकजीवन जवळून अभ्यासण्याची संधी मी घेतली.
कॅलिफोर्निया हे अमेरिकेच्या पन्नास राज्यातील आहेत तीन मोठया राज्यांपैकी एक. सॅक्रीमेंटो हे राजधानीचे शहर. या राज्यात ५३ जिल्हे आहेत. त्यापैकी २८ किनारपट्टीवर वसले आहेत. सुमारे १३५२ कि. मी. लांबीची किनारपट्टी या राज्याला लाभली आहे. इथले हवामान विषुववृत्तीय असून हिवाळयात थंडी व पाऊस असतो. उन्हाळयात वातावरणात दमटपणा असतो आणि पाऊस पडतो. भौगोलिक सारखेपणा असणारे कॅलिफोर्निया हे कोकणाप्रमाणे पर्यटन, मासेमारी आणि विविध प्रकारच्या फळांसाठी प्रसिद्ध आहे. अमेरिकेच्या श्रीमंतीत कॅलिफोर्नियाचा मोठा वाटा आहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये.
कॅलिफोर्नियाचे वेगळेपण- या राज्यातील नागरिक, राज्यकर्त्यांचे नियोजन, गतिमान प्रशासन यंत्रणा, उपलब्ध साधनसामग्रीचा पुरेपूर वापर यामुळे राज्याने प्रगती साधली आहे. कॅलिफोर्नियाकडूनच अमेरिकेला सर्वात जास्त महसुल मिळतो. फलोत्पादन, मत्स्य व्यवसाय, पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरुन केली जाणारी शेती हे इथले प्रमुख व्यवसाय आहेत. सॅन फ्रान्सिसको इथे सोन्याच्या खाणी आहेत. अमेरीकेत सर्वात जास्त फळे, फुले, भाजी, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय याच प्रदेशात होतो. फळांवर प्रक्रिया करण्याचे आधुनिक पद्धतीचे उद्योगही इथे विकसित झाले आहेत.
शेतीमधील प्रगती-इथले शेतकरी सुशिक्षित, नवीन माहिती तंत्रज्ञानाचा आपल्या शेतीत वापर करणारे आहेत. मी युनिव्हर्सिटी अॅाफ कॅलिफोर्निया,बर्कले येथे प्रो. लॅटियस कार्फ यांची भेट घेतली. इथल्या डिपार्टमेंटची पाहणी केली. ते या युनिव्हर्सिटीत कृषि व अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. तसेच इंग्लंडमधल्या युनिव्हर्सिटी अॅाफ केंब्रिजमध्ये गेस्ट लेक्चरर आहेत. त्यांनी लिहिलेल्या अनेक लेखांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार मिळाले आहेत. प्रो. कार्फ यांच्या मतानुसार चालू मार्केटच्या स्थितीनुसार शेतीपिके आणि फळांचे उत्पादन घेणे गरजेचे आहे. पिकांची निवड करताना अर्थशास्त्राचाही अभ्यास व्हायला हवा.
कॅलिफोर्नियातील सेंट्रल व्हॅली आणि नापा व्हॅली या भागात मोठया प्रमाणांवर फलोत्पादन होते. प्रामुख्याने द्राक्षे, अॅारिकोर्डस, बदाम, पेरु यांचे उत्पादन घेतले जाते. द्राक्षांपासून वाईन बनविली जाते. तसेच भाज्यांमध्ये गवार, वाटाणा, गाजर, फरसबी, भोपळा, कांदा, बटाटा ही पिके घेतली जातात. कॅलिफोर्नियामधून निर्यात होणार्‍-या शेतीमालाची आकडेवारी थक्क करणारी आहे. वेस्टर्न युनायटेड सेंटर अॅग्रीकल्चरर्स असोसिएशन व इंटरनेशनल ट्रेड डेव्हलपमेंट असोसिएशन मार्फत शेतकर्‍-यांचा माल निर्यात होतो.
एकटया कॅलिफोर्निया या राज्यातच देशातील ५० टक्के भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते (घेवडा वर्गीय भाजी, कांदा, गाजर, काकडी, डब्बू मिरची, टॅामेटो, अळंबी, लसूण फुलकोबी इ.) सेंद्रीय प्रकारच्या शेतीला प्राधान्य दिले जाते. सेंद्रीय खतांचा वापर करुन घेतलेली पिके अॅारगॅनिक या प्रकारात मोडतात. त्यांची किमत अमेरिकन बाजारात जास्त असते. शेतकर्‍-यांना जास्त फायदा मिळतो. रासायनिक खते वापरुन घेतलेल्या पिकांना इनअॅारगॅनिक म्हटले जाते आणि ती स्वस्त दरात विकली जातात. त्यामुळेच इथे अल्फोन्सो आंब्याऐवजी मेक्सिकन आंबा दिसतो. फुलशेतीतही कॅलिफोर्निया आघाडीवर आहे. जरबेरी,कार्नेशन्स,लिली, अॅारकिड, गुलाब यांचे उत्पादन घेतले जाते. एकूण अमेरिकेतील ७५ टक्के फुलांचे उत्पादन केलिफोर्नियात होते.
आपल्याकडे यातले काय होऊ शकते शेतीच्या बाबतीत भौगोलिक परिस्थिती जरी सारखी असली तरी आपण बर्‍-याच अंशी निसर्गावर अवलंबून आहोत. आंबा, काजू, नारळ, भात सारे काही निसर्गाच्या मेहरबानीवर अवलंबून आहे. फळ -पिकांसाठी मिळणार्‍-या अनुदानामुळे सिधुदुर्गात लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली असली तरी पुरक योजनांच्या बाबतीत मात्र आपण खूपच मागे आहोत. एकूण ५, ४ हजार हे.पैकी ६५ हजार हे. क्षेत्र लागवडी खाली आहे. आजही २१ हजार हे.क्षेत्र पडीक आहे.
फळपिकांच्या बाबतीत १००टक्के अनुदान योजनेतून मोठया प्रमाणावर झालेली लागवड अलीकडच्या १०-१५ वर्षातील आहे. मात्र कृषी खात्याच्या इतर शेतीपूरक विस्तार योजना, आजही ७० टक्के लोकांपर्यत पोचल्या नाहीत. यामध्ये ग्रामपंचायत स्तरांवर वाडी-वाडीमध्ये कृषी साहाय्यकां -मार्फत या योजना तळापर्यंत राबविल्या पाहिजेत. एकदम आधुनिक होऊनही आपल्याला चालणार नाही. मात्र संशोधन केंद्रांमध्ये होणार संशोधन, नवीन तंत्र क्षेत्र अगदी ग्रामीण शेतकर्‍-यांपर्यंत पोहोचले पाहिजे. मोठया प्रमाणावर जाणीव जागृतीही झाली पाहिजे.
कॅलिफोर्नियातील पर्यटन - दरवर्षी साडे तीन कोटी लोक इथल्या पर्यटन स्थळांना भेटी देतात. गोल्डन स्टेट ऑफ टुरीझम पॉवर असे कॅलिफोर्नियाला म्हटले जाते. ४,३५,००० कोटी एवढे उत्पन्न पर्यटकांकडून येते. नॅशनल पार्क,१० कि.मी. लांब गोल्डन गेट ब्रीज,डिस्नेलॅन्ड, नॉर्थ पार्क, सेंट फ्रान्सीस्को प्राणी संग्रहालय ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.
प्रगत वाहतूक व्यवस्था - येथील रस्ते, सहा पदरी, आठ पदरी, ५० कि.मी.पर्यंत सलग, विनावळणाचे असे आहेत. कॅलिफोर्निया राज्यातच ५० विमानतळ असून २८ विमानतळ किनारपट्टी-लगतच्या जिल्हयात आहेत. २ इंटरनॅशनल विमानतळ आहेत. हवाई वाहतूक जास्त संख्येने उपलब्ध असल्याने विमान प्रवासही तुलनेने स्वस्त आहे. सामान्य पर्यटकही हा प्रवास करु शकतो. इथले सार्वजनिक रस्ते आणि रेल्वे वाहतुक ही उत्त्तम आहे. एड्ढूण वैमानिकांत ३० टक्के महिला वैमानिक आहेत.
अमेरिका श्रीमंत कशामुळे आहे ?
अमेरिका समृद्ध आहे, श्रीमंत आहे म्हणून हया सर्व चकाचक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नसून निसर्गाने भरभरुन दिलेल्या साधनसामग्रीचा पुरेपूर वापर करुन पर्यावरण बिघडणार नाही याची काळजी घेऊन अमेरिकन सरकारने योग्य नियोजन करुन कॅलिफोर्नियाचा विकास साधला आहे. पर्यटन व्यवसाय बहरलेला असल्याने आदरातिथ्य इथल्या माणसांच्या रक्तातच भिनलेलं आहे. त्यांच्या प्रत्येक वाक्याची सुरुवात घ्थ्ड्ढठ्ठद्मड्ढ ने होते. आणि शेवट च्र्ण्ठ्ठदत्त् न्र्दृद्व, ण्ठ्ठध्ड्ढ ठ्ठ दत्डड्ढ ड्डठ्ठन्र् ने होतो. एवढी यांच्या वागण्यात विनम्रता आहे. इथले पोलिसही नम्र आहेत. पण कोणतेही नियम मोडलात तर भागवा भागवी चालत नाही. कठोर दंडवसूली असल्याने असल्याने गाडी चालक आणि रस्त्याने चालणारे वाहतुकीचे नियम सहसा मोडत नाहीत. एकूणच या सर्व साधनसुविधांचा उपयोग करुन कॅलिफोर्निया हे एक प्रगत राज्य बनले आहे.
कोकणचा कॅलिफोर्निया होईल का ?
नैसर्गिक साधन सुविधांच्या बाबतीत कॅलिफोर्निया आणि कोकणच्या प्रदेशामध्ये निश्चितच साम्य आहे. कोकणला ७२० कि.मी.ची किनारपट्टी लाभली आहे. कोणत्याही ऋतचा अतिरेक इथे होत नाही. परंतु पर्यटनदृष्टया प्रगत होण्यासाठी देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यानंतर सिधुदुर्ग जिह्यात तब्बल १४ वर्षानंतरही पुरेशा पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या नाहीत. एम.टी.डी. सी.सा.बां.विभागाच्या सहकार्याने पनवेल पासून गोव्यापर्यंत महत्त्वाच्या पर्यटन स्थळांपर्यत जाणारे दिशादर्शक फलक, पर्यटनस्थळे जोडणारे रस्ते, महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारणार आहे. पण या सर्व गोष्टी लालफितीत न अडकण्यासाठी सर्व खात्यांमध्ये समन्वय हवा आहे.
इथल्या तरुणांना आदरातिथ्यांचे प्रशिक्षण देणार्‍-या संस्था, सरकारी अधिकार्‍-यांची मानसिकता बदलण्याच्या कार्यशाळा घेण्याची गरज आहे. प्रगती करीत असताना पर्यावरणाचे संतूलन राखणे हेही आवश्यक आहे. फळप्रक्रिया व कृषीसंबंधी शिक्षण, तंत्रज्ञानाचा शालेय शिक्षणापासून समावेश व्हायला हवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संशोधन केंद्रामधील तंत्रज्ञान शेतकर्‍-यांच्या बागेपर्यत पोहोचणे गरजेचे आहे.
कॅलिफोर्नियाप्रमाणे सर्वच गोष्टी इथे अंमलात आणणे कठीण आहे. पण ज सर्वोत्तम आहे. ते स्विकारुन त्याची अंमलबजावणी केली तर सर्वानाच कोकणचा हेवा वाटेल. राज्यकर्ते, प्रशासनाचे नियोजन, धोरणात्मक निर्णय, त्यांची अंमलबजावणी, उच्च शिक्षणाची उपलब्धता या गोष्टी जबाबदारीने केल्या व लोकांनीही कष्ट करण्याची प्रवृत्ती, विनम्रता हे गुण घेतले तर कोकणचा व सिधुदुर्गचा कायापालट सहज शक्य आहे.
- प्रवीणभाई भोसले,
सावंतवाडी (माजी राज्यमंत्री)

सच्चा स्नेही
दि. १६ जून २०११ चा कै. विष्णुपंत नाईक जन्मशताब्दी विशेषांक सर्वांगसुंदर आहे. वाचतांना मन पन्नास वर्षे मागे धावले. आमचे वडील कै. ना. वि. सामंत (नाना) स्व. विष्णुपंतांचे समवयस्क. विष्णुपंतांचे पुष्कळ वेळा आमचे परुळे येथील घरी येणे जाणे असे. तसेच नानासुद्धा वैद्यक व्यवसायाबरोबरच परुळ्याच्या जडणघडणीत कार्यरत असल्याने ते वेंगुर्ले या तालुक्याचे गावी वरचेवर जात तेव्हा ते आवर्जून विष्णुपंतांच्या घरी जात. स्व. विष्णूपंत अनेकदा रात्रौ आमच्याकडे मुक्कामाला असायचे. रात्री उशीरापर्यंत त्यांच्या अनेक विषयांवर गप्पा रंगत असत. मी आणि माझी बहीणही त्यांचे घरी जात असू. कै. सौ. माई आम्हाला अत्यंत आपुलकीने आणि अगत्यपूर्वक जेवायला ठेऊन घेत असत.
१९५७ मध्ये कै. स्व. अण्णासाहेब देसाई, डॉ. व्ही. बी. सामंत आणि त्यांचे अनेक सहकारी यांनी परुळे येथे ‘विद्या प्रसारक विश्वस्त मंडळ‘ ही संस्था स्थापन करुन ‘विद्यामंदिर, परुळे‘ ही माध्यमिक शाळा सुरु केली. शाळा विनाअनुदान होती. देणग्या जमवून शिक्षकांचे पगार आणि इतर शैक्षणिक साहित्य यांचे खर्च भागविले जात होते. माझी पहिलीच तुकडी होती. शिक्षण खात्याच्या नियमांनुसार शिक्षकांचे पगार देणे परवडणारे नव्हते. ती. नानांनी विष्णुपंतांना आमचेकडे १०वीला मराठी शिकविण्याची विनंती केली. ती त्यांनी आनंदाने मान्य केली. १९६०-६१ मध्ये ते आम्हाला मराठी आणि संस्कृत शिकवीत. मानधन अल्पच होते. त्यांचा मुक्काम आमचे घरी असायचा. शनिवार, रविवारी वेंगुर्ल्याला जायचे. मराठीवर त्यांचे प्रभुत्व तर होतेच शिवाय संस्कृत, संतवाङमय, संगीत, देशभक्ती अशा विविध पैलूंचे दर्शन आम्हाला घडले. त्यांनी सुमारे आठ दिवस शिकविलेला ‘पतीत पावन नाव ऐकून आलो मी द्वारा। पतीत पावन न होसी म्हणुनी जातो माघारा‘ हा अभंग म्हणजे संत वाङमयाच्या अभ्यासाचा उत्कृष्ट नमुनाच होता. त्याच कालावधीत त्यांनी परुळे येथे प्रवचने, कीर्तनेही केली. ‘वंदे मातरम्‘च्या अनेक चाली ते उत्तम त-हेने म्हणत असत. परुळ्यांत कोणी महनीय व्यक्ती यायची असेल तर नाना त्यांना मुद्दाम बोलावून घेत. त्यांचे स्वागतगीत, मानपत्र वगैरे ते बसल्या बसल्या तयार करुन देत. तत्कालीन कृषीमंत्री बाळासाहेब सावंतांसाठी ‘स्वागत नरवीरा करुया‘ हे स्वागतगीत स्वतः लिहून मुलींकडून उत्तम बसवून घेतले होते.
स्वातंत्र्य लढ्यात कार्यरत असूनही त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांचे मानधन नाकारले. राष्ट्रीय सणादिवशी ते मारुती मंदिराजवळील स्वतःच्या घरासमोर झेंडा वंदन करीत. प्रखर देशाभिमान आणि निस्वार्थी देशभक्तीचा तो जमाना होता. स्व. दे. भक्त आबासाहेब वालावलकर हे आमच्या नानांचेही गुरु होते. कदाचित त्यामुळेच कै. पंतांची आणि कै. नानांची मैत्री मनोमन जुळली असावी.
सेंट लुक्स हॉस्पीटलमध्ये कै. विष्णुपंतांची आठवड्यात अनेकवेळा फेरी होत असे. आमचे वडील तिथे विशेष उपचारांसाठी गरीब रुग्ण पाठवितांना विष्णुपंतांना पत्र देत असत आणि तेसुद्धा तत्परतेने सेंट लुक्समध्ये जाऊन डॉ. सीटन, डॉ. सर्विड वगैरेंकडून माफक खर्चात त्यांचेवर उपचार करुन घेत असत. डॉ. सीटन यांना ते मराठी शिकवत असत. डॉक्टर त्यांच्याकडे येणा-या ग्रामीण भागांतील रुग्णांचे मालवणी शब्द न समजल्याने इंग्लिशमध्ये लिहून ठेवत आणि पंतांना विचारुन अर्थ समजावून घेत असत.
१९७९ मध्ये माझे वडील आकस्मिक मेंदूतील रक्तस्रावाने आजारी झाले. उपचार चालू असतांच त्यांना बोलणे अशक्य होऊ लागले. तेव्हा मला जवळ बोलावून स्व. आबासाहेब वालावलकर आणि विष्णुपंतांना कळविण्यास सांगितले. मी तसे लगेच कळविले. विष्णुपंत आले पण तत्पूर्वी दहाच मिनिटं अगोदर आम्ही और्ध्वदेहिक आटोपून घरी आलो होतो. स्व. विष्णुपंतांना आपल्या स्नेह्याची अखेरची भेटही होऊन न शकल्याने अतीव दुःख झाले. ते आल्यापावली जड अंतःकरणाने मागे फिरले. स्मशानात जाऊन आपल्या प्रिय स्नेह्यास अखेरचा निरोप देऊन मार्गस्थ झाले.
कै. विष्णुपंतांच्या कुटुंबियांनी वेंगुर्ले येथील सेंट लुक्स हॉस्पिटलला मोलाची आणि भरघोस देणगी देऊन त्यांची स्मृती अजरामर केली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. आपण सर्वांनीच त्यांचे शतशः आभार मानले पाहिजेत.
प्रिय स्व. विष्णुपंतांच्या स्मृतीस त्यांच्या जन्मशताब्दी वर्षी सादर प्रणाम!
-डॉ. उमाकांत सामंत, परुळे, ९४२२४३६९३४.

विशेष बातम्या *
सेंट लुक्सच्या अतिदक्षता विभाग/सुतिकागृह/रुग्णवाहिकेचे उद्घाटन
वेंगुर्ले येथील जुन्या पीढीतील सामाजिक कार्यकर्ते, नगरवाचनालयाचे माजी कार्यवाह कै.विष्णुपंत नाईक यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी वेंगुर्ले येथील सेंट लुक्स हॉस्पीटलला रुग्णसेवेसाठी नवीन आय. सी. यु. युनिट, सुतिकागृहाचे संपूर्ण नूतनीकरण आणि एक रुग्णवाहिका आपले आईवडील कै. विष्णुपंत आणि कै.सौ.लक्ष्मीबाई यांच्या स्मरणार्थ देणगी दिली आहे. त्यांचा नामफलक अनावरण समारंभ १७ जून २०११ रोजी विष्णुपंत नाईक यांचे सुपूत्र श्री.अनंत उर्फ काका आणि श्री.सगुण उर्फ आबा नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हॉस्पीटल ग्रुप मॅनेजमेंट कमिटीचे चेअरमन रेव्ह.बी.आर.तिवडे होते.
प्रारंभी हॉस्पीटलचे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ.जे.एम.दास यांनी प्रास्ताविक व परिचय करुन दिला. अरुण मोरजकर यांनी स्वागत केले. नाईक कुटुंबियांच्यावतीने श्री. आबा नाईक यांनी कै. विष्णुपंतांच्या जीवनकार्याचा आढावा घेऊन हॉस्पीटलला दिलेल्या देणगीमागचा उद्देश स्पष्ट केला. या सेवेचा लाभ सर्व गोरगरीब रुग्णांना हॉस्पीटलने करुन द्यावा असे आवाहन केले. यावेळी ‘किरात‘ ने कै. विष्णुपंत नाईक यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या विशेष अंकाचेही त्यांनी कौतुक केले. याच दिवशी आय.सी.यु.युनिटमध्ये हृदय रुग्णांसाठी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. डॉ.आरोसकर यांनी रुग्णतपासणी केली. सूत्रसंचालन व आभार व्यवस्थापक श्री.डी.के.तिवडे यांनी मानले.
कार्यक्रमास सर्व नाईक कुटुंबीय, व्यापारी संघाचे अध्यक्ष विभा खानोलकर, वेंगुर्ला हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एस. एस. काळे, श्री.लालामामा सावंत, आनंदराव चिटणीस, ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत कर्पे, अरविद शिरोडकर, विलास दळवी, नाना परब, पत्रकार श्रीधर मराठे, गोहीन मेमोरीयल चर्चचे पास्टर रेव्ह.मकवान, सौ.दास, सेंट लुक्स स्टाफ, नर्सिग विद्यार्थिनी व नागरीक उपस्थित होते.

नगरपरिषदेची नवीन प्रभाग रचना
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या डिसेंबरमध्ये होणा-या निवडणुकीत आता प्रत्येक वार्डासाठी नगरसेवक अशी निवडणुक होणार नाही तर तीन ते चार उमेदवारांचा एक वार्ड यानुसार १७ वॉर्डाचे ४ प्रभाग करण्यात आले आहेत.
प्रभाग १ मध्ये दाभोसवाडी, दोन्ही गावडेवाडी, गिरपवाडी ते गाडीअड्डा पश्चिमेकडील बाजू, गाडीअड्डा रस्त्याच्या पूर्व बाजूने कोकण किनारा हॉटेलच्या पुढे मांजरेकर कंपाऊंडपर्यंतचा भाग निश्चित केला आहे.
प्रभाग क्रमांक २ मध्ये मेनरोड भटवाडी (वेशीपर्यत दोन्हीबाजूने) खांबडवाडी, कॅम्पचा काही भाग, वडखोल, खालचे किनळणे, म्हाडा, गवळीवाडा ते रामघाटरस्त्यापर्यंतचा भाग.
प्रभाग ३ मध्ये टी.डी.मयेकर ते भाळी मार्केट, रामेश्वर मंदिर ते पिराचा दर्ग्यापर्यंत वरची बाजू, कुबलवाडा, महाजनवाडी, वेंगुर्लेकरवाडी, साकववाडी, कासकर घरापासून लकी स्टोअर्स ते खारलड ऑफीसकडील व्हाळी ते साकवापर्यंत, सातेरी मंदिर देऊळवाडा, कॅम्प एम.एस.ई.बी ऑफिससमोरील भाग यांचा समावेश आहे.
प्रभाग ४ मध्ये बंदर लाईन, कलानगर, मांडवी, भुजनागवाडी, पिराचा दर्गा, पश्चिम भाग, सुंदर भाटले रस्त्याच्या पश्चिम बाजूने मानसीश्वरपूलापर्यंत, नवीन एसटी स्थानकापासून सुंदरभाटले बाहेरच्या रस्त्याने मशिदीपर्यंत तेथूनच रामेश्वर रस्त्याने कुंभवडे नगरवाचनालयापर्यंत, पाटीलवाडा, दक्षिण राऊळवाडा, आंबेखण ते भराडी मंदिर रस्त्याच्या बाजूने मांजरेकर घरापर्यंत, आनंदवाडी ते मराठे गिरण हद्दीपर्यंत एवढा भाग निश्चित केला आहे.
प्रभाग रचनेनुसार आता राजकीय गणितेही मांडली जात आहेत. पालिकेच्या नव्या रचनेतील प्रभाग १ मध्ये विद्यमान नगरसेवक मोहन गावडे, प्रसन्ना कुबल, नगरसेविका सौ. लक्ष्मी वेंगुर्लेकर, सौ. श्वेता हुले यांचा समावेश आहे. या प्रभागासाठी दोन सर्वसाधारण खुला, एक मागास प्रवर्ग महिला व एक सर्वसाधारण खुला महिला असे आरक्षण निश्चित झाले आहे.
प्रभाग क्रमांक २ मध्ये विद्यमान नगरसेवक विशाल सावळ, संजय तुळसकर, शैलेश गावडे, तुषार सापळे यांचा समावेश आहे. या प्रभागासाठी दोन महिला सर्वसाधारण खुला, एक नागरिकांचा मागासवर्ग, एक सर्वसाधारण खुला असे आरक्षण आहे.
प्रभाग ३ मध्ये विद्यमान नगरसेविका व माजी नगराध्यक्षा नम्रता कुबल, बाळू नार्वेकर, उमेश येरम, सौ. गीता अंधारी यांचा समावेश आहे. या प्रभागासाठी दोन महिला सर्वसाधारण खुला, एक नागरिकांचा मागासवर्ग, एक सर्वसाधारण खुला असे आरक्षण आहे.
प्रभाग ४ मध्ये विद्यमान नगराध्यक्ष संदेश निकम, सौ. सुमन निकम, उपनगराध्यक्ष गिरगोल फर्नांडीस, सौ.सुचिता कदम व सुहास गवंडळकर यांचा समावेश आहे. या प्रभागासाठी दोन नागरिकांचा मागास महिला, एक सर्वसाधारण खुला महिला, एक अनुसूचित जाती, एक सर्वसाधारण खुला असे आरक्षण आहे.

मुले नाहीत जिल्ह्यातील १७ शाळा बंद!
कुटुंब नियोजनाचे चांगले काम, त्यामुळे घटलेला जननदर, आणि काही प्रमाणात इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा ओढा यामुळे सिधुदुर्ग जिल्ह्यातील १७ प्राथमिक शाळा यावर्षी बंद झाल्या आहेत. तर १७१ शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असल्याने त्याही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तालुकानिहाय बंद शाळा व बंद होणा-या (कंसातील आकडा) शाळा पुढीलप्रमाणे -
सावंतवाडी - ३ (३७), दोडामार्ग ३ (६), वेंगुर्ले २ (९), कणकवली ६ (१८), देवगड ३ (२८), कुडाळ, मालवण, वैभववाडी, तालुक्यात शाळा बंद नाहीत. पण बंदच्या प्रतीक्षेत अनुक्रमे १८, २२ आणि २३ शाळा आहेत. इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांना शह देण्यासाठी पहिली पासून इंग्रजीचा प्रयोग सुरु आहे. त्यासाठी शिक्षकांचेही वर्ग झाले. पण दर्जाबाबत शिक्षक व खात्याचे अधिकारीच बेफिकीर राहिले. परिणामी पालकांनी मुले खाजगी शाळांत दाखल केली. त्या शाळांनी शिक्षणखात्याची मान्यताही मिळविलेली आहे.
शिक्षण खात्याचे अधिकारी शाळा, शिक्षक वरकमाईच्या मागे असतात. त्यामुळे खात्याच्या कामांकडे त्यांचे दुर्लक्षच असते. त्यामुळेच पूर्वप्राथमिक शिष्यवृत्ती पात्र मुलांना दोन वर्षात शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही. तर मुलांना गणवेश द्यायचे ते शाळा सुरु होऊन महिना झाला तरी तयारच नाहीत. वह्या, पुस्तकांच्या पुरवठ्याबाबतही हीच त-हा आहे. दरम्याने शिक्षकांच्या झालेल्या बदल्यांची विभागीय स्तरावर चौकशी झाल्यावर २२ शिक्षकांच्या फेरबदल्या झाल्या आहेत आणि जिल्हा परिषद प्रशासनाला शिस्त लावून बदल्यांप्रकरणी कणखर भुमिका घेणा-या जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अश्विनी जोशी-पंडीत यांची वर्षभरातच बदली झाली आहे. त्यांच्या जागी अमित सैनी यांची तर जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांचीही दोन वर्षात बदली झाली असून त्यांच्या जागी विरद्र सिग यांची नियुक्ती झाली आहे.