Friday 16 September, 2011

अंक ३४वा, १५ सप्टेंबर २०११

अधोरेखित *
रेडी पोर्टच्या महाप्रकल्पात सागरी पर्यावरण झाकोळलं!
१२ सप्टेंबर रोजी ‘रेडी पोर्ट‘साठी जनसुनावणी घेण्यात आली. परंतु गोंधळ-गदारोळ आणि निषेध या वातावरणातच ही सुनावणी आटोपली.
‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा‘ या तत्वावर सरकारने रेडी पोर्टचा प्रकल्प ‘अर्नेस्ट जॉन ग्रुप ऑफ कंपनीज्‘ या खाजगी कंपनीकडे दिला. येत्या तीन ते चार वर्षाच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करु असा आशावाद कंपनीने व्यक्त केला आहे. हा महाप्रकल्प कागदावरच न रहाता प्रत्यक्षात आला तर खरोखरच रेडीत सुवर्णयुग अवतरेल. परंतु या प्रकल्पासाठी लागणारी जमिन संपादित करण्यासाठीच कंपनीला काही वर्षे जातील. कारण सद्यपरिस्थितीत जमिन संपादन प्रक्रियेला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. या कंपनीला ९८ हेक्टर एवढी जमिन अपेक्षित आहे. त्यातली सुमारे ५५ हेक्टर जमिन समुद्र हटवून तयार करण्यात येईल असे कंपनीच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे. याचा अर्थ कंपनी समुद्रात भराव घालून आपला प्रकल्प उभारील यामुळे पर्यावरणावर किती घातक परिणाम होतील याची थोडीशी कल्पनासुद्धा या उच्चविद्याविभूषित लोकांना आली नसावी? की स्वार्थ आणि भांडवलशाहीपुढे पर्यावरणाचं पारडं कमी पडलं?
निसर्गाच्या नियमाप्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समुद्र मागे गेला तर तो दुस-या बाजूने तेवढीच जागा व्यापतो. मग जर ५५ हेक्टर एवढी जागा तयार झाली तर तेवढीच जागा व्यापण्यासाठी समुद्र कोणत्याही बाजूने पुढे येईल याचा विचार व्हायला नको? फक्त विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा -हास करायचा हे कुठलं शहाणपण?
पर्यावरणाचा विचार करुन आणि समुद्री पर्यावरण तज्ञांच्या सल्ल्यानुसार हा प्रकल्प पूर्ण करता येईल अशी इच्छाशक्ती निर्माण झाली पाहिजे. ती फक्त कंपनी किवा सरकार पुरतीच मर्यादीत न रहाता प्रत्येक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधीमध्ये सुद्धा रुजली पाहिजे. कारण विरोधाला विरोध न करता असे महत्वाचे प्रकल्प कसे पूर्ण करता येतील याचा विचारही व्हायला हवा.
मुळातच ‘जन सुनावणी‘ ही प्रक्रिया कुठेतरी कुचकामी ठरतेय. या प्रक्रियेत जनतेची मते ‘रेकॉर्ड‘ केली जातात. मग ती पर्यावरण खाते, नंतर सरकारकडे पाठवली जातात. यापेक्षा कंपनी जो अहवाल तयार करते त्याचवेळी ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करुन ग्रामस्थांच्या सुचनेचा विचार आणि आदर करुन जर कंपनीने अहवाल तयार केला व त्यानंतर तो जनतेसमोर मांडला तर होणारा विरोध व अहवालातील चुका कमी होतील. परंतु असा प्रयोग का होत नाही हे एक कोडंच आहे.
विकास हवा असेल तर प्रकल्प आलेच पाहिजेत. परंतु पर्यावरणाचा समतोल ढळू न देता आणि गावातील लोकांना, त्यांच्या श्रद्धास्थानांना विस्थापीत न करता प्रकल्प झाले तर जिल्ह्यातील जनता त्याचं स्वागतच करेल. फक्त राजकारण करुन किवा आपली पोळी भाजून स्वार्थ भावनेने विरोध किवा समर्थन करायचा ही विचारसरणी बदलली पाहिजे. लोक काय सांगतात, लोकांना काय हवं? त्यांच्या समस्या काय? त्या कशा सोडवता येतील? याचा विचार प्रत्येक राजकीय पक्षाने, नेत्यांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनीही करायला हवा. केवळ मतांचं राजकारण आणि स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून विरोध किवा समर्थन करण्यात काय अर्थ आहे? कारण यामुळे समस्या सुटत नाहीत, त्या आणखी वाढतात.
‘रेडी पोर्ट‘च्या जनसुनावणीच्या वेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांचे प्रश्न मांडले. ‘आधी प्रश्न सोडवा, नंतर सहकार्य करु‘ ही भुमिका घेतली. ही बाब सिधुदुर्गच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा म्हणता येईल. एरव्ही एकमेकांच्या विरोधात उभे असणारी ही लोकं ग्रामस्थांचे प्रश्न तळमळीने मांडताना दिसली.
या ‘जनसुनावणी‘त कंपनी गोंधळलेली दिसत होती. विसंगत सादरीकरण आणि ग्रामस्थांच्या प्रश्नांना न मिळालेली योग्य उत्तरे यामुळे गोंधळ अधिकच वाढला. त्यामुळे ही प्रक्रिया आटोपतीच घ्यावी लागली.
- विक्रांत आजगांवकर , ९४२११४८३३६


संपादकीय *
रेडी बंदर प्रकल्प -रस्त्यांचा विकास महत्त्वाचा
रेडी बंदाराचा विकास आणि विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची परवानगी आवश्यक आहे. ती देण्यापूर्वी स्थानिक लोकांच्या सूचना ऐकून घेण्यासाठी सिधुदुर्ग जिल्हाधिका-यांनी १२ सप्टेंबरला रेडी येथे जनसुनावणी घेतली. जिल्हाधिकारी विरेंद्र सिह यांच्यासह पोलिस अधिक्षक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अधिकारी, रेडी पोर्ट लिमिटेड ही उफपनी ज्या अर्नेस्ट जॉन कंपनीची आहे त्या कंपनीचे चेअरमन अर्नेस्ट जॉन, रेडी बंदर परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या जनसुनावणीला उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत ग्रामस्थांतर्फे अनेक सूचना मांडण्यात आल्या. त्यामध्ये एकही शेतकरी अथवा ग्रामस्थ या प्रकल्पामुळे विस्थापीत होता नये. प्रकल्पातील नोक-यांमध्ये ८० टक्के स्थानिक लोकांना कायमस्वरुपी नोकरी देण्यात यावी. रेडीतील कनयाळ तलावातून प्रकल्पासाठी पाणी घेऊ नये. बंदरातून निर्यात होणा-या मालावर दर टनामागे ५ टक्के रक्कम रेडी ग्रामपंचायतीला मिळावी, बंदराकडे येणारा रस्ता स्वतंत्रपणे बांधावा. इ. मागण्या होत्या.
कंपनीतर्फे सांगण्यात आले की, प्रकल्पासाठी लागणारे पाणी कनयाळ तलावातून न घेता तिलारी धरणातून आणले जाईल. जास्तीत जास्त स्थानिकांना नोकरीत प्राधान्य दिले जाईल. एकूण ९८ हेक्टर क्षेत्रामध्ये हा प्रकल्प असून त्यातील ५५ हेक्टर जमीन समुद्रात भराव घालून तयार केला जाईल व त्यावरच जेटी बांधल्या जातील. उर्वरीत जमीन मुळात रेडी बंदाराचीच आहे. आणखी इंचभरही जमीन नव्याने संपादन केली जाणार नाही. त्यामुळे विस्थापितांचा प्रश्नच निर्माण होणार नाही. कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली जाईल. भराव घातल्याने समुद्राच्या लाटांपासून अन्यत्र धोका निर्माण होऊ नये यासाठी किनारपट्टीवर संरक्षक बंधारे घालण्यात येतील. इत्यादी आश्वासने कंपनीतर्फे देण्यात आली.
रेडी बंदर विकासाला कोणाचा विरोध दिसून आला नाही. उलट त्यामुळे या परिसराचा कायापालट होईल अशीच भावना दिसून आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाची ही जनसुनावणी असूनही पर्यावरणाविषयी कोणी फारसा विचार केलेला दिसला नाही. समुद्रात ५५ हेक्टर एवढा भराव घातल्यावर त्याचे काय परिणाम होतील यावर कोणीच चर्चा केली नाही.
ही जनसुनावणी पर्यावरण विषयापुरतीच मर्यादित होती म्हणूनही असेल, कोणीही अर्नेस्ट जॉन ग्रुप ऑफ कंपनी कुठली. बंदर विकासात या कंपनीचा पूर्वानुभव काय. महाराष्ट्र सरकारचे या कंपनीत ११ टक्के शेअर्स आहेत असे सांगितले जाते. तसे आणखी कोणकोणाचे, कोणत्या कंपनीचे कोणत्या वित्तीय संस्थांचे शेअर्स आहेत. या विषयीची माहिती समजू शकली नाही. सरकारच्या बी. ओ. टी. (बांधा-वापरा-हस्तांतरीत करा) या धोरणाप्रमाणे खाजगी कंपनी हा प्रकल्प उभा करणार आणि त्याचा वापर करणार, तो किती काळासाठी याचेही कोठे उत्तर नाही. कंपनीच्या रेडी प्रकल्पाचा प्रकल्प सविस्तर अहवालही कुठे प्रसिद्ध झालेला नाही.
प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार कंपनी सुमारे पाच हजार कोटीचा हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण करणार आहे. त्यातील पहिला टप्पा येत्या दोन वर्षात म्हणजे सन २०१३ अखेर पूर्ण व्हावयाचा आहे. या बंदरातून लोहखनिज निर्यात प्राधान्याने होणारच आहे. नंतर धान्य, साखर, औद्योगिक उत्पादने यांचीही निर्यात होईल. हा माल अर्थातच कोकणातील नसेल तर पश्चिम महाराष्ट्रातून येईल. एवढ्या मोठ्या बंदरातून निर्यात आणि आयात होणा-या मालाची वाहतुकही मोठ्या प्रमाणावर होणार, त्यासाठी कोकण रेल्वेवरील मळगाव किवा मडुरे येथून रेडी बंदरापर्यंत नवीन रेल्वेलाईन घालावी लागेल. भविष्यात कोकण रेल्वे बेळगांव किवा कोल्हापूरशी जोडावी लागणार, प्रचंड प्रमाणावर वाढणा-या वाहनांसाठी तसेच चार-सहा पदरी रस्ते बांधावे लागणार ते महामार्गाशी जोडावे लागणार या सर्वांचा पर्यावरणाशी, वनखात्याशी संबंध येतो.
रेडी बंदर हे नियोजित पश्चिम किनारी सागरी महामार्गावर येते. सध्या रेवस ते रेडी या मार्गाचे काम गेली ३५ ते ४० वर्षे अत्यंत कुर्मगतीने चाललेले आहे. आता मुंबई - कोकण - गोवा हा रस्ता चार पदरी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. तिथेही जमीन संपादनाचा जटील प्रश्न आहे.
उद्या रेडी बंदर झाले, जलमार्ग वाहतूक सुरु झाली तरी बंदरातून आयात-निर्यात होणा-या मालाच्या वाहतुकीसाठी योग्य रस्ते आणि रेल्वे मार्ग नसला तर समस्या आणखी वाढतील. यासाठी स्थानिकांच्या प्रश्नांबरोबरच मोठे रस्ते, रेल्वेमार्ग या बाबतीतही सरकार तहान लागल्यावर विहीर खोदायची असे धोरण ठेवील तर सगळीच धुळधाण होईल. हे संबंधितांनी लक्षात घेतलेले बरे.

विशेष *
भ्रष्टाचारी प्रशासनाला रोखणार कोण?आणि ठोकणार कोण?
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे सिधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या पोंभुर्ले गावचे हते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण काहीतरी केले पाहिजे अशी जाणीव खूपच उशीराने मराठी वृत्तपत्रसृष्टीला झाली आणि बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु केलेल्या ‘दर्पण‘ या पहिल्या मराठी वृत्तपत्राचा जन्मदिवस ६ जानेवारी हा प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाऊ लागला.
सिधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांनाही याची जाणीव अगदी अलिकडच्या काळात झाली. मग दुर्लक्षित व दुर्गम असलेले बाळशास्त्रींचे पोंभुर्ले हे जन्मगाव शोधले गेले. त्यांचे मूळ घर असलेली जागा शोधण्यात आली. बाळशास्त्रींचे वंशज असलेले तेथील जांभेकर कुटुंबिय आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने बाळशास्त्रींचे उचित स्मारक करण्याची योजना ठरविण्यात आली. परंतु त्यानंतर पुढे काही झाले नाही. त्या घराजवळ जाणारा रस्ता, पूल सिधुदुर्गातील पत्रकारांनी पाठपुरावा केल्याने होऊ शकला. दरम्यान फलटण स्थित महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्वस्त रविद्र बेडकीहाळ यांनी महाराष्ट्रातील संपादक, पत्रकार व पत्रकार कल्याण निधीतर्फे आवश्यक तेवढा निधी जमवून जांभेकरांचे स्मारक म्हणून पोंभुर्ले या त्यांच्या जन्मगावी २५ न् ४० फूट क्षेत्रफळाचे एक सभागृह उभारुन बाळशास्त्री जांभेकरांचा अर्धपुतळा या सभागृहात बसविला. दरवर्षी ६ जानेवारीला आपल्या पत्रकार सहका-यांसह ते या स्थळी येतात आणि पत्रकार दिन साजरा करतात. तसेच १७ मे हा बाळशास्त्रींचा जन्मदिनही याच ठिकाणी साजरा करतात. या पत्रकार कल्याण निधीतून एक राज्यस्तरीय आणि सहा विभागीय स्तरावर रोख रकमेचे ‘दर्पण पुरस्कार‘ पत्रकारांना दिले जातात.
सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ मात्र या स्मारक स्थळापासून दूरच राहिला आणि ६ जानेवारीचा पत्रकारदिन जिल्ह्यात निरनिराळ्या ठिकाणी साजरा करती राहिला. पत्रकार संघाने बाळशास्त्रींचे यथोचित स्मारक व्हावे यासाठी पालकमंत्री नारायण राणे आणि सरकारला साकडे घातले. कोकण पॅकेज अंतर्गत सरकारने त्यासाठी ५० लाख रुपये मंजूर केले.
या ५० लाखांचा प्रशासकीय स्तरावर गोलमाल करण्याचा प्रयत्न कसा झाला? हे जिल्हा नियोजन कार्यालयाचे प्रताप सा. किरातने दि. ७ जुलै आणि दि. २८ जुलै २०११ च्या अंकात अधोरेखित केलेलेच आहे. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या सिधुदुर्ग समितीनेही हा विषय उचलून धरला आणि जिल्हाधिकारी विरेंद्र सिह यांच्या नजरेला हा प्रशासकीय पातळीवरचा भ्रष्टाचार आणून दिला. जिल्हाधिका-यांनीही तत्परता दाखवत अशा प्रकारच्या सर्वच शासकीय भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी न्यासाच्या मदतीने तालुका-जिल्हा पातळीवर विशेष यंत्रणा राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. जांभेकर स्मारक प्रशासकीय गोलमाल प्रकरणी त्यांनी अरविद वळंजू या चौकशी अधिका-यांची नियुक्ती केली. त्यांचा अहवाल महिनाभरात येणे अपेक्षित आहे. तसेच ५० लाखाच्या कामाची चूकीची निविदा प्रक्रिया राबविणा-या सार्वजनिक बांधकाम आणि नियोजन मंडळाच्या जबाबदार अधिकारी आणि
कर्मचा-यांच्या पगारातून ३००० रु. वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
वाचनालयाची दूरावस्था
बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी वाचनालय असावे म्हणून पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविद्र बेडकीहाळ यांनी शिवसेनेचे खासदार, पत्रकार संजय राऊत यांच्या खासदार निधीतून पैसे मिळावेत यासाठी पाठपुरावा केला. २००५ साली संजय राऊतांनी २ लाखाचा निधी वाचनालयाच्या इमारतीसाठी खर्च करावा असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले. त्यातून १५ न् २० चा वाचनकक्ष आणि अर्ध्या भागात वाचनालय अशी स्लॅबची इमारत २००९ साली उभी राहिली.
२ लाख खर्ची घालून उभारलेल्या वाचनालय इमारतीच्या स्लॅबमधून पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी गळते असे तिथे राहणारे सुधाकर जांभेकर यांनी सांगितले आहे. वाचनालयासाठी मंजूर केलेल्या आपल्या खासदार निधीचा विनियोग कसा झाला याचा शोध पत्रकार खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक शैलीत घेणे आवश्यक आहे. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या आणि सर्वसामान्य जनतेला नाडणा-या प्रशासनाला रोखणार कोण आणि ठोकणार कोण? याचेही उत्तर खासदार संजय राऊत यांनी द्यावे.
सध्या या वाचनालयात एकही पुस्तक, नियतकालीके, वर्तमानपत्रे नाहीत. यासंदर्भात पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविद्र बेडकीहाळ यांच्याशी संफ साधला असता ऑक्टोबर २०११ नंतर ५०,००० रुपयांची पुस्तके, कपाटे, टेबल, खुर्च्या अशी साधने पत्रकार कल्याण निधीतर्फे उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले. (या वाचन कक्षासंदर्भात आपणाला काही मदत किवा सूचना करायच्या असल्यास आपणही पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविद्र बेडकीहाळ, ९४२२४००३२१ यांच्याशी संफ करावा.)
आजपर्यंत जांभेकर स्मारकाचा प्रश्न असो किवा कोणत्याही समाजोपयोगी उपक्रम राबविणा-या संस्था, कार्यकर्ते यांना काही सन्माननीय अपवाद वगळता शासकीय अधिका-यांच्या भ्रष्ट व्यवहारांमुळे त्रासच होत असतो.
सरकारी कर्मचारी संघटनांचीही जबाबदारी
अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला जाहीरपणे पाठिबा देणा-या सरकारी कर्मचारी संघटनांनीही आता अशा भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कंबर कसून आपल्याच अस्तनीतील निखा-यांना दूर केले पाहिजे, अशी लोकभावना व्यक्त होत आहे.
विवेकानंद वाडकर


विवाहपश्चात समुपदेशन
न जुळणारी मनं, संसाराच्या रहाटगाडग्यात रोजच्या रोज येणा-या अगणित संकटांशी आणि समस्यांशी सामना करता करता मनाची होणारी घुसमट, त्यातून एकमेकांबद्दल मनात निर्माण होणारी चीड, तिटकारा, एकाच घरात राहून जीवनाची वाटचाल करावी लागण्यातील अपरिहार्यता, अगतिकता, यामुळे पती आणि पत्नी दोघांच्या मनातही संसाराबद्दल आणि एकमेकांबद्दल निर्माण झालेला नकोसेपणा, एकमेकांना समजून घेण्याच्या पलीकडील ब्रेक पॉइंटवर पोहोचलेले नातेसंबंध, त्यामुळे होणारी जिवाची कुतरओढ, आपलं आयुष्य दुस-यावर लादून त्याचे जिणेही नकोसे करणा-या जोडीदाराबद्दल वाटणारा तिटकारा या सर्व गोष्टी घडणारे अनेक संसार आपल्या अवतीभवती असतात. जीवनातील या अंधारवाटांवर रोज प्रवास करणारी किती तरी जोडपी असतात.
ब-याच वेळा स्त्रीच्या वागण्यामुळेच संसाराची घडी विस्कटली जाते, असा आरोप केला जातो; पण बहुतेक वेळा पती आणि पत्नी यांचे एकमेकांना समजून न घेणेच या गोष्टीला कारणीभूत असते. दमून भागून येणा-या पुरुषाला वाटते, आपण कमावतो, दिवसभर बाहेर राबतो, घरी आल्यानंतर आपल्याला हवी ती स्वस्थता, शांतता मिळायलाच हवी.पण तो सोयिस्कररीत्या हे विसरतो की घरात राबताना, घरातील अनेक लहानमोठ्या गोष्टी सांभाळताना स्त्रीसुद्धा रोज तेवढीच थकून जाते. कंटाळून जाते. तिच्यासाठी तर एखादा दिवसही सुटी नसते. तू काय, घरी बसून असतेस, ही भावना नेहमीच पुरुषाच्या मनात ठाण मांडून असते.
बहुतेक वेळा आर्थिक चणचण, मुलांच्या जबाबदा-या पेलताना येणारे ताणतणाव, त्यामुळे निर्माण होणारी घुसमट, त्यामुळे निर्माण होणारा उद्वेग, नव-याबद्दल कधी कधी मनात असणारा संशय, यामुळे स्त्रीच्या वागण्यात त्याच्याबद्दलचा तिटकारा निर्माण होतो. अनेक कुटुंबांतील हे वास्तव रूप आहे आणि किती तरी वेळा या अशा मोडणा-या, पिचणा-या स्त्रियांना या गर्तेत आणून सोडणारे पुरुषच असतात. घर, मुलं, संसार यांतील लहान-मोठ्या कटकटींनी घरातील स्त्री गळ्यापर्यंत रुतून बसलेली असते. तिच्या जोडीदाराने तिला समजून घेण्याचा थोडा पयत्न केला तरी तिला तेवढाच आनंद पुरेसा असतो; पण कित्येक घरांमध्ये तिला तेवढेही महत्त्व दिले जात नाही. मग कुरबुरी सुरू होतात. भांडणं व्हायला लागतात. त्याचं बाहेरचं विश्व वेगळं असतं.व्यापक असतं. मात्र, तिचं आयुष्य उंब-याच्या आत बंदिस्त असतं. त्याच्या दृष्टीने स्वतःचे काम महत्त्वाचे असते. घरी गेल्यावर बायको कटकट करणारच. मग घरी लवकर जायलाच नको.म्हणून तो उशिरा यायला लागतो. पत्नीला वाटते, त्याला आपल्याबद्दल पेम वाटत नाही.उशिरापर्यंत बाहेर राहतो म्हणजे त्याच्या जीवनात दुसरी स्त्री असणार. तिचे मन संशयाच्या आवर्तात गुंतून जाते. घर विस्कटते; पण थोड्याशा समजूतदारपणाने हे सगळे बदलू शकते. पुरुषांनी आपले कुटुंबही महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. कुटुंबासाठी वेळ देणे महत्त्वाचे आहे. पत्नीला आधार केवळ तिचा पतीच देऊ शकतो. तिच्यासाठी थोडा वेळ देणे, तिचा स्वतःचा अवकाश जपू देणे, नाते संबंध जपायला पूरक ठरते.
संयोगिनी कंरदीकर

मध्वानुभव
सध्या श्री. अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधात केलेल्या आंदोलनाला जो जन-प्रतिसाद मिळाला तो पाहून ‘थक्क‘ व्हायला होते. पाठिबा देणा-या मोर्चामध्ये जी ‘मंडळी‘ दिसतात ती पाहूनही ‘थक्क‘ व्हायला होते. येशू ख्रिस्ताच्या काळातील एक गोष्ट सांगतात, ‘एका पापी स्त्रीला लोक दगड फेकून मारीत होते. तेथून येशूख्रिस्त चालले होते. त्यांना त्या स्त्रीची दया आली. त्यांनी जमावाला उद्देशून म्हटले, आपल्यापैकी ज्यांनी आयुष्यात एकही पाप केलेले नाही त्यांनीच या स्त्रीला दगड मारावा.‘ जमावातील एकालाही पुन्हा दगड मारण्याचे धैर्य झाले नाही. तो काळ तसा असल्याने पापाची बोचणी असणारे लोक होते. त्यांना येशु ख्रिस्ताबद्दलही आदर होता. आज ‘भ्रष्टाचारी कोण नाही?‘ या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने आरशात पाहून द्यावे व अण्णांच्या या आंदोलनाचे फलीत म्हणून आतातरी यापुढे ‘मी भ्रष्टाचार करणार नाही किवा भ्रष्टाचारात सहकार्य देणार नाही‘ अशी शपथ घ्यावी व ती पाळण्याचा कठोर प्रयत्न करावा. जनलोकपाल बिलाबाबतचा निर्णय नियतीच्या संकेतानुसार लागेल. ही सगळी प्रस्तावना करण्याचे कारण म्हणजे नोकरीच्या काळातील एक प्रसंग ‘मध्वानुभव‘ म्हणून लिहायचा आहे.
एका गावामध्ये कुकुट पालन प्रशिक्षण वर्गाच्या निमित्ताने गेलो होतो. वर्ग सायंकाळी थोड्या उशीराने संपला. त्यानंतर ‘मुख्यालयी‘ यायला जी एस.टी. होती ती खूपच उशीरा म्हणले २-३ तासानंतर होती. त्या गावात वहातुकीचे चेक नाके होते. प्रशिक्षण वर्गाच्या संयोजकाने मला नाकेदाराच्या हवाली करुन ‘साहेबांना एखाद्या ट्रकमध्ये बसवून दे‘ अशी आज्ञावजा सूचना केली. हवालदारानेही तत्परतेने बसायला खुर्ची दिली. मी बॅगेतला पेपर काढून वाचला. त्या नाक्यावरुन जी वाहने (ट्रक,टेम्पो इ.) जात होती. त्या प्रत्येक वाहनातील क्लीनर ‘नोट‘ देऊन ‘पास‘ होत होता. अतिशय शिस्तीत चाललेला हा व्यवहार बघायची मला सवय नसल्याने मी अस्वस्थ होत होतो. सुमारे अर्धा तास गेला आणि एका टेम्पोवाल्याला थांबवून नाकेदाराने माझी ‘व्यवस्था‘ केली. या टेम्पोच्या क्लीनरनेही माझ्या समोरच ‘नोट‘ सादर केलेली होती. टेम्पोचा ड्रायव्हर, (जो मालकही होता) चेह-यावरुन शिकला सवरलेला दिसत होता. मुख्य म्हणजे पानाचा तोबरा किवा पान मसाला, गुटखा खाणं चालू नव्हतं. केबीनही स्वच्छ होती. सुगंधी उदबत्ती, देवादिकांच्या तसबिरी यामुळे वातावरण प्रसन्न होते.
मी न राहवून ड्रायव्हरला ‘मगाचच्या व्यवहाराबद्दल बोलके केले.‘ तो म्हणाला, ‘साहेब हे नेहमीचच झालंय, काय करणार? ठरलेली पट्टी नाही दिली तर चेकिगसाठी गाडी साईडला उभी करायला लावतात, तास-दोन तास ढुंकूनही पाहत नाही. माझ्या गाडीचे सर्व कागदपत्र अपटुडेट असूनही काहीतरी फालतू कारण काढून वाद करतात. मुख्य म्हणजे या प्रकारात जो वेळ जातो त्यामुळे मुंबई मार्केटला (वाशी) पोचायला उशीर झाला की, पार्किगचा प्रश्न येतो, गाडी वेळेत खाली होऊ शकत नाही. मुंबईत राहणर कुठं? हे सर्व टाळण्यासाठी आम्ही नियमात असूनही त्यांची शिरजोरी चालवून घ्यावी लागते.‘
ड्रायव्हरने जी काही वस्तुस्थिती सांगितली ती व्यवहाराला धरुन होती. प्रतिवाद करण्यासारखा माझ्याकडे मुद्दा नसल्याने गप्प बसणे भाग होते. माझे उतरण्याचे ठिकाण येईपर्यंत त्याने, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली. एका सुसंस्कारीत कुटुंबाचा तो ‘चालक‘ होता.
माझे उतरण्याचे ठिकाण आल्यावर, उतरतांना त्याने, मी त्याला देत असलेले प्रवासी भाडे नाकारले. फुकटचा प्रवास मला करायचा नव्हता. त्यामुळे जवळच्या दुकानातून काही खाऊ घेऊन मी त्याच्या मुलांसाठी घे अशी विनंती केली. प्रवासी भाड्याऐवजी त्याने मुलांसाठीचा खाऊ साभार स्विकारला आणि ‘ओळख ठेवा‘ म्हणत तो केबिनमध्ये चढला. ड्रायव्हर केबीनच्या दारावर लिहिले होते, ‘पहले राम बोलो! फिर दरवाजा खोलो!!!‘
मधुकर घारपूरे, सावंतवाडी

विशेष बातम्या *
नेपथ्यकार रमेश राऊळ यांना पुरस्कार
वेंगुर्ल्याचे सुपुत्र आणि नाटकांचे नेपथ्यकार श्री. रमेश राऊळ यांना अ.भा.नाट्य परिषद पुणे शाखेच्या ३३व्या वर्धापनदिनाच्या समारंभात दिवंगत महान नेपथ्यकार पु.श्री.काळे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास अनेक नामांकित नाट्यकलावंत आणि नाट्यपरिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
रमेश राऊळ हे राऊळवाडा येथील रहिवासी असून त्यांची गणपती मूर्ती बनविण्याची चित्रशाळाही आहे. दरवर्षी ते गावी येऊन मूर्तीकाम करीत असतात. त्याबरोबरच व्यावसायीक नाटकांसाठी नेपथ्य, पडदे रंगकाम व इतर पेंटिग व्यवसाय करीत असतात. नाटकांसाठीच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.


वेंगुर्ल्यातील तंत्रनिकेतन कॅम्पमध्ये जाणार
वेंगुर्ले येथील भाड्याच्या जागेत सुरु असलेले शासकीय औद्योगिक तंत्रनिकेतन आता कॅम्पमधील म्हाडा कॉलनी समोर असलेल्या ८१ गुंठे भूखंडावरील स्वतःच्या इमारतीत जाणार आहे. गाडेकर कन्याशाळेच्या इमारतीत हे तंत्रनिकेतन सुरु होते. मात्र इमारतीची कोणतीच डागडुजी करण्यात आलेली नव्हती. वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटीच्या पूर्वीच्या निलंबीत संचालक मंडळाने यात बराच घोळ केल्याचे बोलले जात होते. पूर्वीचे ऑडीटच झालेले नसल्याने आणि वेतनेत्तर अनुदान सरकारने दिलेले नसल्याने नवीन संचालक मंडळही काही करु शकत नव्हते. या संचालकांनी गाडेकर कन्याशाळा पूर्ववत सुरु केल्याने तंत्रनिकेतन नवीन जागेच्या शोधात होते. न मिळाल्यास ते सावंतवाडीला वर्ग करण्यात येणार होते. दरम्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन वालावलकर यांनी हे तंत्रनिकेतन वेंगुर्ल्यातच रहावे यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यासाठी कॅम्पमधील सरकारी मालकीच्या जागेत हे तंत्रनिकेतन व्हावे यासाठी तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्याशी संफ साधून ८१ गुंठे क्षेत्र मंजूर करुन घेतले. आता लवकरच इमारत उभी होऊन तंत्रनिकेतन सुरु होईल. या तंत्रनिकेतनला कायम स्वरुपी प्राचार्य, कर्मचारी मिळावेत यासाठीही श्री. वालावलकर प्रयत्नशील आहेत.


वेंगुर्ले नगराध्यक्षांकडून धमकी -

भ्रष्टाचार विरोधी मंच जिल्हाध्यक्षांचा आरोप
भ्रष्टाचार विरोधी मंचातर्फे वेंगुर्ले पोलिस निरिक्षक विवेकानंद वाखारे यांना शहरातील अवैध धंदे बंद करा असे निवेदन दिल्यानंतर पोलिसांनी दखल घेतल्याने दारु, मटका धद्यांना खिळ बसली. मात्र नगराध्यक्ष संदेश निकम यांनी ‘तुला मारहाण करण्यासाठी ५० माणसे तयार आहेत. तु आत्ताच आपल्या घरी ये‘ अशी धमकी आपल्याला दिल्याची तक्रार भ्रष्टाचार विरोधी मंचाचे जिल्हाध्यक्ष अमीन हकीम यांनी पोलिसांना दिली आहे. या फोनचे रेकॉर्डींग आपल्याकडे उपलब्ध असल्याचे हकीम यांनी म्हटले आहे. या संदर्भात तात्काळ चौकशी करुन त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी तसेच भ्रष्टाचार विरोधी मंचच्या पदाधिका-यांना संरक्षण मिळावे अशी मागणी हकीम यांनी केली आहे.


अजूनही पाऊस
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सूनसारखा पडणारा पाऊस आता श्रावण महिन्यासारखा पडू लागला आहे. ऐन गणेश चतुर्थीच्या दिवसात पावसाने मोठाच हंगामा केला. रेल्वे मार्गावर दरड कोसळून अनेकदा वाहतुक थांबली. त्यामुळे रेल्वेने गणेश चतुर्थीसाठी येणा-या लोकांचे अतोनात हाल झाले. तर मुंबई - गोवा मार्गावर खेड जवळच्या कशेडी घाटात दरडी कोसळून काही दिवस वाहतुक थांबली. त्यामुळे एस. टी. बसने येणा-यांचेही खूप हाल झाले. कसेबसे लोक गावोगावी पोचले तर पावसाचे थैमान चालूच होते. अनेक ठिकाणी नद्या-नाल्यांना पूर येऊन पुलांवरुन पाणी वाहत असल्याने तेथील रस्ता वाहतुकही काही तास बंद राहून वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत असे. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या आनंदोत्सवात फारसा उत्साह दिसून आला नाही. महागाईमुळे व्यापारातही फारशी उलाढाल झाली नाही.
लोकांना परतीच्या प्रवासातही याच समस्यांना तोंड द्यावे लागले. कोल्हापूर मार्गे जावे तर फोंडा-राधानगरी मार्ग अत्यंत खराब झालेला. पावसाने तो आणखी खराब झाला. तर गगनबावडा घाटातही दरडी कोसळल्याने तो मार्गही काही दिवस वाहतुकीला बंद राहिला. आंबोली - आजरा मार्ग तेवढा सुरु होता. पण आंबोली घाट धोकादायक ठरल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरुनच त्या मार्गाने जावे लागले. अतिपावसामुळे भातशेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. तर डोंगराळ भागातील शेतीवरही दुष्परिणाम झाला. अजूनही पाऊस अधुनमधून सुरु आहे.
या पावसामुळे नदी नाल्यांना दुस-यांदा मोठे पूर येऊन नजिकच्या शेती - बागायतीचे नुकसान झाले. झाडांना घातलेली खतेही पुराच्या पाण्यामुळे वाहून गेली. या खेरीज पुराच्या पाण्यात सापडून अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला. अनेक गावात घरे, शेतमांगर यांचे पूर्णतः व अंशतः नुकसान झाले. या दरम्यान वीजेच्या तारांवर झाडे पडून वीज पुरवठा खंडीत होण्याचे बरेच प्रकार घडले. टेलिफोनबाबतही हीच स्थिती होती.
आतापर्यंत वेंगुर्लेतील पावसाची नोंद ३३५७ मी. मी. म्हणजे सुमारे १३४ इंच झाली आहे. तर जिल्ह्याची सरासरी सुमारे १५० इंचाहून अधिक झाली आहे.

Tuesday 13 September, 2011

संपादकीय
हे गणाराया,
तुमच्या येण्याने आणि दीड ते दहा दिवसाच्या वास्तव्याने मिळणारा आनंद आम्ही वर्षभर पुरवून घेत असतो. या आनंदाला गालबोट लावण्याचे काम अनेक पातळ्यांवर सुरु असते. पण त्या सर्वांवर मात करुन तुमचे भक्तगण आपापल्या कुवतीनुसार तुमचे आगत-स्वागत करतात. यथासांग पूजा-अर्चा करतात. हे घरोघर चालते.
हे गणराया, तुमच्या उत्सवाला एक सार्वजनिक स्वरुपही असते आणि ते प्रतिवर्षी वाढतच चालले आहे. सर्वसामान्य लोकांना सध्याच्या वाढत्या महामागाईचे कितीही चटके बसोत, ते तुमच्या आदरातिथ्यात काही कमी पडू देत नाहीत. प्रसंगी उसनवारी करतील, कर्जही काढतील. सार्वजनिक उत्सवात मात्र पैशांची कधीच कमतरता पडत नाही. परिसरातील लोकांकडून जवळपास सक्तीची उत्सव वर्गणी आणि मोठमोठ्या कंपन्यांकडून प्रायोजकत्वाच्या नावाखाली भरपूर देणग्या मिळविल्या जातात. यात आता राजकीय पक्षही मागे नाहीत. या सर्व प्रकारांतून भरपूर पैसे जमा करणे, त्यातले काही समाजहिताच्या कामांसाठी जुजबी खर्च करणे, उत्सवात अनावश्यक वारेमाप खर्च करणे या सर्व दिखावू कार्यक्रमात सर्वजण मग्न असतात.
हे गणाराया, हिदूंच्या बहुतेक सर्व सण-उत्सवात आजकाल हेच थोड्याफार फरकाने चालले आहे. नुकतीच गोकुळाष्टमी पार पडली. त्यात दहिहंडीला अतोनात महत्व आहे. उंच दहिहंडी बांधण्याची आणि मोठमोठी बक्षिसे लावण्याची स्पर्धा आली. त्यासाठी व्यावसायीक स्वरुपाची मंडळे स्थापन झाली. हे सर्व भगवान श्रीकृष्णाच्या नावाने चालते. पण त्या श्रीकृष्णांची खरी शिकवण सर्वचजण विसरलेले आहेत. तसाच नवरात्र उत्सव हाही आता प्रचंड पैशांचा खेळ बनला आहे.
हे गणराया, आजच्या मार्केटिगच्या युगात सण - उत्सवांमध्ये नाविन्य येणे, पैशांची उधळपट्टी होणे हे आता अपरिहार्यच झाले आहे. त्याला आता पर्यटनाची जोड दिली जात आहे. त्यामुळे मोठमोठ्या शहरातून तुमचा उत्सव गणेशोत्सव न राहता गणेश ‘फेस्टिव्हल‘ झाला आहे.
हे गणराया, तुमचा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यामागे लोकमान्य टिळकांचा उद्देश त्याकाळी स्वातंत्र्य लढ्याकरिता जनमत जागृत करणे हा होता. त्यामधून लोकांच्या सामाजिक प्रबोधनाचेही उपक्रम होत. स्वातंत्र्यानंतरही अशा सार्वजनिक गणेशोत्सवातून सामाजिक प्रबोधन करणा-या व्याख्यानमाला, उत्तमोत्तम संगीताचे, लोककलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होऊ लागले. या उत्सवांचे आयोजन करणारी तरुण मंडळी निरनिराळ्या सामाजिक संस्थांमध्ये सेवाभावी वृत्तीने काम करु लागली. बरेचसे राजकीय नेते अशाच प्रकारे तयार झाले.
हे गणराया, आज त्यातले काय उरले आहे? आदर्श गणेशोत्सव कसा झाला पाहिजे, याविषयी आधी काही दिवस वृत्तपत्रांतून लेख, वाचकांची पत्रे प्रसिद्ध होतात. पण त्यातले विचार कोणीच आचरणात आणत नाहीत. श्रद्धेने किवा नवस फेडण्यासाठी भाविक भक्त देणग्या देतात. काही उत्स्फूर्त देणग्या देतात. त्याहीपेक्षा भ्रष्टाचारातून, खंडणीतून मिळालेला पैसा मोठ्या प्रमाणावर या उत्सावांसाठी खर्च होत असतो. गैर मार्गाने मिळविलेल्या पैशातून देणगी देणारा आपले पाप क्षालन झाल्याचे समाधान मानून घेत असतो. यामुळेच आपल्याकडची काही देवस्थाने अतिश्रीमंत झाली आहेत. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनातून हा सगळा भ्रष्टाचार कसा थांबणार आहे? असो. तो आजचा विषय नव्हे.
हे गणराया, तुम्ही सर्वसामान्यांचे दैवत. एखाद्या आदीवासी - कातकारी पाड्यावरील झोपडीत तुमची स्थापना होते तशीच एखाद्या बड्या श्रीमंतांच्या हवेलीतही होते. भक्तिभाव तोच. किबहूना गरीब, सामान्यजनांचा अधिकच मनापासूनचा असतो. तुमच्यापाशीही आप - परभाव नसतो. याचे प्रत्यंतर आम्ही सारे घरोघरच्या उत्स्फूर्त उत्साहपूर्ण गणेशोत्सवातून घेत असतो. विभक्त झाले तरी तुमच्या उत्सवाला मुख्य घरी एकत्र येऊन सर्वजण तो एकोप्याने साजरा करतात, मुंबईकर चारकमान्यांचे प्रवासाच्या हालअपेष्टा सोसूनही चार-दोन दिवसांसाठी घरी-गावी येणे होते. मग घरी मूर्ती आणण्यापासून ती पूजेची लगबग, मिष्टान्नाचे भोजन, आरत्या, बायकांच्या फुगड्या, रात्र रात्र चालणारी भजने, मूर्ती विसर्जनावेळी ‘पुढच्या वर्षी लवकर या‘ म्हणून केलेली आर्जवे. हे सर्व घरच्या गणपती उत्सवात अनुभवायला मिळते. म्हणूनच ही परंपरा, हा उत्साह तुमच्या सणामुळे अव्याहत चालू रहावा हेच मागणे गणराया!

कोकणातील जागृत गणपती दर्शन
रेडीचा गणपती
शिरोड्यानजिक ‘रेडी‘ येथे गणपतीचे जागृत देवस्थान आहे. असंख्य भाविकांची वर्दळ तेथे सतत सुरु असते. रेडी येथे खाणीचे खोदकाम चालू असताना भव्य द्विभुज गणेशमूर्ती आढळून आली असून त्याच जागेवर सुंदर मंदिर बांधून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मंदिराच्या दक्षिण बाजूस गोवा किनारपट्टीचे विलोभनीय दृष्य दिसते. ज्या उंचवट्यावरुन हे दृष्य न्याहाळत आपण उभे असतो, तेथे खाली व बाजूस समुद्राचे व्यापक दर्शन घडते. सांजवेळेला दूरवर उभी असलेली प्रचंड देशी विदेशी जहाजे, मासेमारी करुन परतणारे लहानमोठे पडाव, अस्तास जाणार्‍या सूर्याची निळाई व मंदमंद होत जाणारी किरणे वातावरणातील कातरता व गहिरे रंग या सार्‍या अनुभवाच्या गोष्टी आहेत. द्विभूज गणेश अशी ख्याती पसरल्याने प्रत्येक संकष्टीला गोवा, बेळगाव, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथून असंख्य भक्तमंडळी येत असतात. भाविक आणि स्थानिक मंडळींच्या पुढाकाराने मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे. प्रवासमार्ग- वेंगुर्ले, सावंतवाडी येथून बसची सुविधा आहे. शेवटच्या थांब्यापासून १ कि.मी.वर मंदिर आहे. स्वतःचे वाहन असल्यास जवळपासची अन्य भव्य मंदिरेही बघता येतील. रेडी गाव गोवा हद्दीलगतच असल्याने विदेशी पर्यटकांचीही येथे वर्दळ असते.
आपट्यांचा गणपती
भटवाडी-आजगाव, ता. सावंतवाडी
गोपाळ गणेश आपटे यांना ही श्रीमूर्ती घरामागे खोदकाम करताना सापडली. १९८४-८५ ला मंदिराचा जीर्णोद्धार झाला. काळ्या पाषाणाच्या चतुर्भूज मूर्तीला तैलरंग चढविण्यात आला आहे. ही बालमूर्ती असावी असे वाटते. मंदिर कोकणातल्या पद्धतीप्रमाणे कौलारु आहे. १० न् १५ गर्भगृह असून मंदिराला सभामंडप आहे. मंदिरात गोकुळाष्टमी, दिवाळी सामुदायीकरित्या साजरी केली जाते. अंगारकी, भाद्रपद चतुर्थी या दिवशी मोठ्या संख्येने भाविक येतात. गावात मोजकीच घरे आहेत. मंदिरावर लक्ष ठेवण्यासाठी आपटे गुरुजी श्रद्धेने झटतात. त्यामुळे स्थानावर स्वच्छता आहे. प्रवासमार्ग- आजगावच्या प्रसिद्ध वेतोबा देवस्थानानंतर धाकोरे गावच्या दिशेने ५ मिनीटे चालल्यावर डाव्याबाजूला आडारी-भटवाडीत शिरावे. या वाटेवरच हे मंदिर मिळते.
कांदेरकर मराठ्यांचा गणपती
धाकोरे-आजगाव, ता. सावंतवाडी
मंदिराबाबत शके १८४६, रक्ताक्षी नामसंवत्सरे वैशाख शु. १० रोजी हे देवालय तयार केले. ही नोंद गणेशमूर्तीबाबतचे प्राचिनत्व सिद्ध करते. मूर्तीभोवतालचे मंदिर टप्प्याटप्प्याने बनले असावे. अत्यंत घनदाट अशा वृक्षराजीत गजाननाची मूर्ती विराजमान झाली आहे. धुरकट रंगाच्या पाषाणातील मूर्तीचे स्वरुप केवळ अवर्णनियच. मंदिरालगतच बारमाही वाहाणारा झरा आहे.
प्रवासमार्ग- इथे येण्यासाठी आजगावहून धाकोरे येथे यावे लागते. इथल्या प्राथमिक शाळेकडून उजव्या हाताला पंडितांच्या जमिनीतून चौकशी करीत निघावे. तिथेच एक ओहोळ वाहातो. त्याच्यावर पोफळी टाकल्या आहेत. त्यावरुन कसरत करत पलिकडे जावे लागते. मराठे यांच्या बागेतच हे मंदिर आहे. वेंगुर्ले किवा सावंतवाडी येथून आजगावपर्यंत एस.टी. बसची सुविधा आहे. राहाण्या-जेवण्याची सोय नसल्याने तालुक्याच्या ठिकाणावरच अवलंबून रहावे लागते.
फाटकांचे श्रीगणेश मंदिर
कॅम्प-भटवाडी, वेंगुर्ले
या मंदिराच्या स्थापनेचा काळ १८७७ च्या सुमाराचा आहे. १९५६ मध्ये याची प्रतिष्ठार्चा झाली. पुन्हा १९९६ साली वास्तूकला शिल्पकार शरद पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर मंदिर बनविण्यात आले. श्रीमूर्ती अत्यंत जुनी, काळ्या पाषाणाची, चतुर्भूज असून डाव्या सोंडेची आहे. मंदिरासमोरुन थोड्या अंतरावर ओहोळ वाहातो. सभोवताली गर्द वनराई आहे. या परिसरात नानाविध पक्षी आहेत. हा अनुभव पावसाच्या दिवसात आनंददायी असता प्रवासमार्ग- वेंगुर्ले एस.टी.स्टँडपासून ४ कि.मी.वर भटवाडी येथे मंदिर आहे. रिक्षा किवा अन्य वाहने येथे जाण्यासाठी उपलब्ध असतात. भटवाडी स्टॉप येथे उतरल्यास तिथूनही पायी जाण्याच्या अंतरावर हे मंदिर आहे. श्री. चंद्रकांत उर्फ मोहन फाटक आणि कुटुंबिय या मंदिराचे व्यवस्थापन पहातात.

गणेशतडीचा गणपती
कोचरा, ता. वेंगुर्ले
गणेशतडीचा गणपती हा इथून ३०० मीटरवर नदीतल्या डोहात १०० वर्षांपूर्वी सापडला असे म्हटले जाते. कोचरेकरांना प्रश्न पडला की, आपण मच्छिमार असल्याने सतत माशांच्या संपर्कात असतो. शुचिर्भूतता काय? याचा गंध नाही, मग देवाचे नीट कसे होणार? असा विचार करुन त्यांनी ती मूर्ती राजघराण्याशी संबंधीत प्रभूदेसाईंकडे सुपूर्द केली. मंदिराच्या बांधणीवरुन याची प्राचिनता लक्षात येते. काळ्या खडकात कोरलेली सुखासनातील मूर्ती अत्यंत दुर्मिळ अशी दोन हातांची आहे. सिधुदुर्गात रेडी आणि कोचरे येथेच द्विभूज गणेश पहायला मिळतात. गर्भगृहात सर्वांना प्रवेश असून हा भाग ४५ फूटाचा आहे. अलिकडेच श्री. मनोहर शंकरराव कोचरेकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. प्रवासमार्ग- अत्यंत नयनरम्य अशा वनराईत उभे असलेले हे मंदिर म्हापण गावापासून ५ कि.मी.वर आहे. कोचरे समुद्रकिना-याआधी दीड कि.मी.वर हे मंदिर आहे. रस्त्यापासून आत ३०० मीटर चालावे लागते.

श्रीसिद्धीबुद्धिविनायक
चिदरवाडी-भोगवे, ता. वेंगुर्ले
या मंदिरातील गणेश मूर्तीच्या समोरच्या बाजूस पाषाणावर माघ शु. चतुर्थी १८०७ असे कोरल्याचे दिसते. गर्भगृहात पाच फुटांच्या द्वारातून जावे लागते. ६ न् ६ फुटांचे गर्भगृह आहे. बाजूस सामंत-चिदरकर घराण्यातील एका योगी पुरुषाची संजीवन समाधी असून हे स्थान अत्यंत जागृत आहे. मूळ गणपती यांनीच स्थापन केला व समाधी घेतली. येथल्या पुजा-यांच्या स्वप्नात एकदा समाधी दिसली. त्यातून त्यांना दिव्य आवाज ऐकू येऊ लागला, ‘ही सर्व ठिकाणे माझीच आहेत.‘ श्रीगणपती मंदिराच्या गर्भगृहात पुजा-याव्यतिरीक्त कोणाला प्रवेश नाही. समाधीस्थळ जेमतेम ४ न् ४ फूटांचे आहे. घरवजा कौलारु मंदिर ३० फूट लांब तर ३५ फूट रुंद आहे. मंदिराबाहेर मोकळे अंगण आहे. माघी गणेश जयंतीला देवस्थानतर्फे मोठा उत्सव साजरा केला जातो. पंचक्रोशीतील गावांबरोबरच मुंबई, पुणे, बेळगाव आदी दूरवरील शहरांतून भाविक माघ चतुर्थीला उपस्थित राहतात. ७००-८०० भाविकांना महाप्रसाद दिला जातो. चिदर येथे स्थानावर सहज पोचणे कठीण आहे. मंदिराच्या बाजूला बारमाही वाहाणारा झरा आहे. मंदिरासमोर स्वयंपाकघर आहे पण ऐनवेळी येणा-या भक्तांच्या व्यवस्थेची शक्यता गृहीत धरु नये. प्रवासमार्ग- वेंगुर्लेपासून ३३ कि.मी.वर असलेले हे मंदिर कुडाळवरुन अधिक जवळ पडते. भोगव्याला जाणा-या बसने गणेशबावला स्टॉप येथे उतरावे. नेवाळी गावाच्या दिशेने १०० पावलांवर उतरंडीची खडबडीत पायवाट दिसते. पाचच मिनिटे चालल्यावर उजवीकडे एका बाजूला मोठ्या घराप्रमाणे हे मंदिर आहे. मालवण-देबवाग येथूनही होडीने देवबाग ते नेवाळी हा जलप्रवास अवर्णनीय आहे.
स्वयंभू श्रीसिद्धीविनायक संस्थान
देवाची डोंगरी - साळगाव, ता. कुडाळ
श्रीक्षेत्र माणगावच्या टेंबेस्वामींचा कृपाप्रसाद, टेंबेस्वामींचे अनुग्रहीत भक्तवत्सल श्री. काकामहाराज खानोलकर यांचा आशीर्वाद व गाणेश तत्वज्ञान पंडित गजानन महाराज पुंडशास्त्री यांनी गणेशभक्तांच्या पाठीशी उभी केलेली आध्यात्मिक ताकद यातून उभे राहिले हे स्वयंभू श्रीसिद्धिविनायक संस्थान. हे भगवान श्रीगणेशाचे स्वरुप मूषकवाहनारुढ व लांबलचक, उजव्या सोंडेचे आहे. मूर्ती स्वयंभू असून सहसा न आढळणा-या दगडापासून बनलेली आहे. साधारण दीड फूट उंचीची ही मूर्ती निसर्गसान्निध्यात प्रतिष्ठापीत झाली आहे. कुडाळ व सावंतवाडीच्या साधारण मध्यावर असलेल्या झाराप तिठ्यावरुन थोडी आडवळणाला ही साळगावची देवाची डोंगरी आहे. साळगावमधील विजय तानावडे, दिनेश साळगावकर, श्रीराम साळगावकर यांच्या आणि भक्तमंडळींच्या पुढाकाराने येथे मंदिराची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काही दिवसातच अनेक गणेशभक्त या स्थानावर नित्य दर्शनासाठी येऊ लागले आहेत. प्रवासमार्ग- सावंतवाडी - कुडाळ हायवेवर झाराप तिठ्यावरुन साळगावला जाताना थोड्या आडबाजूला देवाची डोंगरी दिसते. स्वतःचे वाहन असल्यास प्रवास सुखकर होतो.
श्री देव दैवज्ञ गणपती
उभाबाजार - सावंतवाडी
सावंतवाडीमधील हे अत्यंत महत्त्वाचे सिद्ध स्थान आहे. श्रीगणपतीचे प्रतिष्ठापक श्रीनारोबा स्वामी तथा नारायणस्वामी मसूरकर व त्यांच्या कारकीर्दीनंतर सावंतवाडीमध्ये अवतरलेले योगीपुरुष श्रीबालाजी स्वामी यांची समाधीस्थळे या मंदिरासमोरच असल्याने या परिसराला जागृततेची झळाळी प्राप्त झालेली आहे. श्रीदेव गणपतीची मुख्य मूर्ती इ. सन १७६५च्या श्रीगणेश जयंती माघ शुद्ध चतुर्थीला श्रीनारायणस्वामींनी प्रतिष्ठापित केली. त्यानंतर दुस-याच दिवशी आधीच तयार करुन ठेवलेल्या समाधीघरात प्रवेश करुन समाधीस्थळ बंद करावयास लावले व संजीवन समाधीस्थ झाले. आज श्रीमंदिरात आपण दर्शन घेतो ती काळ्या पाषाणातील सुबक मूर्ती अगदी अलिकडे कारवारहून आणून २९ जानेवारी १९९० रोजी प्रतिष्ठापित केलेली आहे. उच्चासनावर स्थापिलेली ही मूर्ती सिहासनाधिष्ठित अशी साडेतीन फूट उंचीची आहे. या मूर्तीसमोरच पुढे खालच्या आसनावर एक पंचधातूची एक फुटांची सुबक मूर्ती दृष्टीस पडते. हीच मुख्य मूर्ती असून ती स्वतः नारायणस्वामी महाराजांनी स्वहस्ते बनविलेली आहे. अशाप्रकारच्या या सिद्धस्थानाचा जिर्णोद्धार सन १९९० साली करण्यात आला. मंदिराचे स्वरुप प्रचंड वाढलेले असून मंदिराचा सभामंडप म्हणजे लग्नकार्यासाठी दिला जाणारा भलाथोराला (४० फुट बाय ६० फुट) हॉलच आहे. प्रवासमार्ग- सावंतवाडी एस.टी.स्टँडवरुन रिक्षाने उभा बाजारमध्ये यावे. तिथेच हे मंदिर आहे.
श्रीमोरयाचा धोंडा
छत्रपती शिवरायांची शिवलंका मालवणच्या बेटावर उभी राहिली. त्याआधी श्री गणेशपूजन झाले, ते समुद्रकिना-यावर, मालवणच्या सिधुदुर्गच्या निर्मितीआधीचे श्रीगणेश पूजन हे सागरी सत्तेवर अधिराज्य गाजविण्याआधीच पहिला श्रीगणेशा होता. चौ-याऐशी बंदरी ऐसा जागा दुसरा नाही! शुद्ध खडक! स्थल उत्तम!! इये बंदरी नूतन जंजिरा वसवावा! महाराजांचे प्रशस्तीपत्रक लाभले नि मुहूर्त करण्याचे निश्चित झाले. मालवणच्या समुद्रकिना-यावर वायरी भूतनाथाच्या हद्दीत फेरुजिनस क्वार्टझाइटचा बनलेला जांभळट रंगाचा हा खडक आहे. स्थानिक लोक जांभ्या दगडाचे चिरे ज्यापासून काढून घराच्या भितीस वा खांबास बसवतात, त्या प्रकारचा हा खडक, विघ्नहर्त्या गजाननाखेरीज चंद्र, सूर्य, शिवलिग, नंदी व पादुका त्यावर कोरल्या. त्याचे शास्त्रोक्त पूजन सुरु झाले. परशुरामाचा कोकण - अपरान्त प्रदेश - त्याचा एका नव्या मनूत प्रवेश जाहला. मार्गशीर्ष बहुल द्वितीया, शके १५८६, इ. स. २५ नोव्हेंबर १६६४. श्रीगणेश पूजनानंतर सागरपूजन झाले. सुवर्णाचे श्रीफळ समुद्रार्पण केले. नंतर होडीत बसून शिवराजे कुरटे बेटावर गेले. तिथे त्यांनी ‘सिधुदुर्ग‘च्या मुहूर्ताचा चिरा बसवला. सद्यस्थिती - या घटनेला आजमितीला ३३५ वर्षे उलटलीत. श्रीमोरयाचा धोंडा ऊनपावसाचा मारा झेलत तसाच निश्चल उभा आहे. स्थानिकांनी लावलेले एखाद दुसरे निशाण; तेवढीच एक अभिमानाची निशाणी. त्यावर छप्पर करायचे म्हटले तरी सागर किना-यावर बांधकाम करण्याविषयक लागू असलेले कायदे आड उभे आहेत. त्या मूर्तीची झीज होऊन त्या अस्पष्ट दिसत आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या हे स्थळ अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याची जपणूक झाली पाहिजे. प्रवासमार्ग- मालवण किना-यावरुन साधारण पंधरा मिनिटे चालल्यास श्रीमोरयाचा धोंड्याकडे आपण पोचतो.

कोकणात निसर्गसान्निध्यात उभारलेली ‘द्वारका‘
तुम्हाला तुमची सकाळ पक्षांचा किलबिलाट, हिरव्यागार निसर्गसान्निध्यातला ‘मॉर्निग वॉक‘, गुरांच्या गळ्यातल्या घंटांचा मंजुळ नाद, अशा वातावरणात सुरु करायची असेल आणि परिसरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेटी देण्याबरोबरच तिथली संस्कृती, लोकजीवन, शेती या सर्वांचा अनुभव घ्यायचा असेल तर दिलीप आकलेकरांनी निर्माण केलेल्या ‘द्वारकेला‘ अवश्य भेट द्या. निसर्गाला कुठेही न बिघडवता, पर्यावरणाशी समतोल साधन दिलीप आकलेकर यांनी तळवडे इथे (सावंतवाडी रोड रेल्वेस्टेशन पासून १० मिनिटाच्या अंतरावर) एक अप्रतिम ‘होम स्टे‘ म्हणजेच पर्यटकांसाठी हक्काचे घर बनविले आहे. गारमेंट एक्सपोर्टचा व्यवसाय करत असताना आकलेकरांचा अनेक विदेश लोकांशी संफ यायचा. त्या सर्वांना गोवा फिरण्याची इच्छा असायची. त्यामुळे स्वतःच्या मनःशांतीसाठी उभारलेल्या ‘द्वारका‘ निवासस्थानामध्ये पर्यटकांच्या निवासाकरीता काही बदल करावे लागले. विदेशी पाहुण्यांनी आम्हाला गोव्यात राहायचे नाही. आम्ही ‘द्वारकेतच‘ राहूनच इतर ठिकाणी फिरु असे सांगितल्याने. पर्यटकांच्या मागणीप्रमाणे घरासारखं वातावरण देणारी निवास व्यवस्था आज उपलब्ध आहे.
पंधरा एकरच्या जागेमध्ये ‘द्वारका‘ विकसित करताना आकलेकरांनी ‘स्वयंपूर्ण‘ होण्यावर भर दिला. इथल्या जागेतच १० गाईंचा गोठा आहे. डेअरी फार्म आहे. भात शेतीबरोबरच, द्विदल धान्य कुळीथ, चवळी, भूईमूग, वाली, उडीद यांची शेती सेंद्रीय पद्धतीने केली जाते. आंबा, काजू, चिकू अशी फळझाडेही आहेत. मूळा, पालक, वाल भाजी अशा भाज्याही इथे पिकवल्या जातात. त्यामुळे पर्यटकांना इथे ‘रेडी टू कुक‘ पदार्थ खाल्याचा आनंद घेता येतो आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्सुनामी जरी आली किवा बाहेर भाज्या, फळे -धान्य यांचा तुटवडा भासला तरी ‘द्वारका‘ स्वयंपूर्ण असल्याने फारशी अडचण येणार नाही.
निसर्गातून उपलब्ध होणारे पदार्थ इथे बायोगॅसवर शिजवले जातात. गाई-गुरांच्या शेणाच्या उपलब्धतेमुळे हे शक्य झालं. नंतर या शेणाचा उपयोग जैविक खत म्हणून आम्ही झाडांसाठी करतो. निसर्गचक्र कुठेही न तोडता पुनर्वापर केल्यामुळे निसर्गाला परत काही दिल्याचं समाधानही मिळतं.
इथे राहायला येणा-या पर्यटकांनाही आम्ही ए. सी. न वापरता रहा, धुम्रपान टाळा असा आग्रह करतो. साईट सीन्समध्ये इथले स्वच्छ समुद्र किनारे, मंदिरे, आंबोलीच हिल स्टेशन दाखविण्याबरोबरच गावात निसर्गाने जपलेल्या स्थळांचा अनुभवही आम्ही त्यांना देतो. आमच्या शेतीमध्येच एवढी विविधता आहे की, पर्यटकांना आपला अर्धा दिवस राखून ठेवावा लागतो. याचा आनंद विदेश पर्यटक अधिक घेतात. ब्रिटन वरुन आलेल्या एका जोडप्याने भातशेती कापल्यानंतर ‘गवताचे भारे‘ शेतक-यांच्या घरापर्यंत वाहून न्यायला मदत केली आणि त्याचा मोबदला म्हणून कोकम सरबत मागून घेतले. घरात रहायला आल्यानंतर पर्यटकांनाही घरासारखं मोकळं वातावरण मिळालं पाहिजे. अर्थात त्यांचा खाजगीपणा जपून.
जेवणामध्ये जपली इथली खासीयत
आपल्याकडे येणा-या पाहुण्यांना आपल्याकडेच मिळणा-या शाकाहारी - मांसाहारी पदार्थांची ओळख आपण करुन द्यायला हवी. वडे - सागोती, कोळंबी, माशांचे प्रकार, शाकाहारी मध्ये घावणे, उसळ, शिरवाळे, उकडीचे मोदक, कांदा भजी असा कोकणातला अस्सल खाद्यपदार्थ दिल्यावर पर्यटक कशाला चायनिज आणि पंजाबी फुडची मागणी करतील?
इथे येणा-या पर्यटकांचा जर मोठा ग्रुप असेल तर त्यांच्यासाठी १ तासाचा लोकनृत्य कार्यक्रम जसं की, समईनृत्य, गोफनृत्य, कळसुत्री बाहुल्या इथले कलाप्रकार त्यांना आम्ही दाखवितो. असे मौज-मस्तीबरोबरच आपली संस्कृती जपणारं आणि सर्वांना सामावून घेणारं पर्यटन सगळ्यांना आवडत हा आमचा वर्षभरातला अनुभव आहे.
आतापर्यंत स्वीस, अमेरिका, यू.के. नेदरलेंड इथून तसेच दिल्ली, मुंबई, पुणे इथल्या पर्यटकांनीही इथे भेट दिली आहे आणि जवळपास सर्वांनीच आम्ही पुन्हा येऊ असं सांगितलं आहे. एवढ आदरातिथ्य आम्ही जपलं आहे.
सरकारवर जबाबदारी ढकलण्यापेक्षा आपल्या भागाचा विकास आपण सर्व एकत्र येऊन करु शकतो.
पर्यटन व्यवसाय वाढीसाठी आदरातिथ्य हवं.
जर आपल्याला निवास - न्याहारी सारख्या योजना राबवून सर्वांच्या पुढाकाराने सिधुदुर्गाचं पर्यटन वाढवायचं असेल तर प्रत्येकाला आदरातिथ्याचं कौशल्य अंगात मुरवावचं लागेल. गावामध्ये स्वतःची जागा असेल जवळ समुद्र नाही तर एखादी नदी, तलाव असेल तर तुम्हीही हा घरगुती व्यवसाय सुरु करु शकता. त्यासाठी दिलीप आकलेकर मार्गदर्शन करायला तयार आहेत. कारण एकत्र येऊन, एकमेकांच्या सहकार्यानेच आपण प्रगती करु शकतो. स्वतःची जागा असेल तर ३ ते ४ लाख गुंतवणूक करुन आपण चांगल्या दर्जाची निवास व्यवस्था विकसित करु शकतो. हे सर्व करत असतांनाच स्वच्छता, निसर्गाचा समतोल राखणे आणि स्थानिक गोष्टींना प्राधान्य देणं हे आपल्याच हातात आहे. द्वारकामध्ये आम्ही हे सर्व सांभाळल म्हणूनच त्याचं वेगळेपण सर्वांना जाणवंत.
संफ - दिलीप आकलेकर, द्वारका रेसिडन्सी,
तळवडे - सावंतवाडी, मोबा. ९८६९४१०६२६, ९४०४९४४४३८९

सिधुदुर्ग पर्यटन जिल्हा लोकांचा पुढाकार
‘गोवा बचाव चळवळ‘ ३ डिसेंबर २००६ मध्ये गोव्याच्या लोकांनी सुरु केले. अनिर्बंध पर्यटनाच्या बेबंद वाढीमुळे झालेले दुष्परिणाम ढळढळीत दिसून येऊ लागले तेव्हा आमच्यावर सिधुदुर्गात असे आंदोलन करायची वेळ केव्हा येईल? खरे तर आलेली आहे.
एका नव्या पर्वाची सुरुवात करायची ही सोनेरी संधी आपल्याला मिळालेली आहे. आतापर्यंत न पाहिले गेलेल्या व अप्रसिद्ध अशा पर्यटन स्थळांची जगभरल्या पर्यटकांची आवड पुरी करणारे एक नवे जागतिक पर्यटन केंद्र आपण आकाराला आणू शकतो. सिधुदुर्ग जिल्हा हे एक वेगळ्या खासियतेचे पर्यटन स्थळ बनविण्याची विचारपूर्वक प्रक्रिया आपण चालू करुया.
आपल्या समोर एड्ढ तर इतर पर्यटन स्थळांची
नक्कल करण्याचा आणि
त्यात असणा-या सा-या
वाईट गोष्टी व समस्या
गळ्यात पडून घेण्याचा रुढ
मार्ग आहे किवा आपला
आपण विचारपूर्वक पर्यटन
विकास व विचार राबवून,
संपूर्ण जगासमोर आपला आदर्श उभा करण्याचा चांगला पर्यायही मोकळा आहे. हे पर्यटन इथल्या लोकांना आपल्या संस्कृतीला, डोंगर, नद्या, झाडे, जंगले, पशुपक्षी या सर्वांचे अस्तित्व टिकवणारे, शाश्वतीची हमी देणारे असेल. जग याचे साक्षी बनेल आणि आपला कित्ता गिरवेल.
एत्राद्या परिसराची शाश्वती मिळवायची असेल तर सरकार आणि लोक या दोघांच्या सहभागाचे संतुलन साधावे लागते. त्यात लोकांचा सहभाग हाच जास्त महत्त्वाचा. कारण तेच तर त्या परिसरात जगत असतात आणि जगणारं असतात. सरकारे येतात आणि जातात. पण त्या परिसरातील लोकांना तिथेच रहायचे, भरभराटायचे आणि विकसीत होत जायचे असते. म्हणूनच सरकारने लादलेल्या योजनांकडून लोकांनी स्वतःच केलेल्या योजना आणि पुढाकार हाच खरा बदल घडवतो.
‘शाश्वतीचे पर्यटन‘ या कल्पनेत पशुपक्षी, झाडे, झुडपे आणि परिसराची या सगळ्यांचीच श्रीमंती या वाढत्या पर्यटनाबरोबर, पाहुण्यांबरोबर अजून वाढत जाते. ती तशी शाश्वत, कायम टिकवायची असेल तर समाजाच्या सगळ्या थरांमध्ये ती समानपणे विभागली गेली पाहिजे.
या आमच्या खास माहितीपत्राचा ‘शाश्वतीचे पर्यटन-लोकांच्या पुढाकाराने‘ ज्याला आम्ही गंमतीने ‘शा.प.लो.पु.‘ म्हणतो हाच उद्देश आहे. या अंकापासून पुढे दर महिन्याला आम्ही रुढ साच्यातील पर्यटनातील धोके, त्रास, समस्या आणि मर्यादा आपल्या समोर आणू. त्याचबरोबर त्याला असलेल्या जास्त चांगल्या पर्यायी गोष्टी व योजना सुद्धा सोप्या करुन मांडायचा प्रयत्न करु. हा एक शोध असेल आपल्याच झाकोळलेल्या, अप्रसिद्ध राहिलेल्या परंपरांचा, खाद्य - वस्तू - राहणी संस्कृतीचा, कलांचा आणि हस्तकलांचा, सुंदर स्थळांचा, कार्यक्रमांचा आणि अशा अनेक केवळ आपल्याच पाशी असलेल्या खासियतींचा.
सहसा सर्वच नवीन उदयास येणा-या पर्यटन स्थळांचा अशी स्थिती असते की, वाढणा-या पर्यटनातून झटपट पैसा कॅश करायची कुतरओढ आणि चढाओढ सर्वांमध्ये लागलेली असते. या खुळ लागलेल्या घाईघाईत काहीजण परक्या लोकांना आपल्या जमिनी मिळतील त्या चढ्या दराने विकायला लागतात, काही अतिउत्साही लोक एखादे अत्याधुनिक सुखसोयीयुक्त हॉटेल वा रिसॉर्ट बनवण्यामागे धावतात. लवकरच पर्यटकांच्या वाढीचा वेग वाढत शिखराला जातो. पंचतारांकित श्रेणीच्या पर्यटक निवासांपासून इतर सर्व श्रेणीपर्यंतची निवासे उभारली जातात. उद्देश एकच. नफा. शिखरानंतर उतार ठरलेलाच.
त्यातले बडे खिलाडी त्यांचे बंदिस्त किल्ले आणि त्यात स्वप्नसुंदर इमले महागड्या उंची सुखसोयीने सर्वसंपन्न असे बांधतात. अर्थातच त्यांच्या त्या स्वप्नातल्या कल्पनांना साकार रुप देताना झाडे पाडली जातात, तळी बुजवली जातात, नद्या अडवल्या जातात, प्रवाळांची बेटे चुरडली जातात आणि वस्त्याच्या वस्त्या नजरेच्या टप्प्यातून एका बाजूला हटवल्या, हलवल्या जातात आणि त्यांच्या त्या बंदिस्त, अप्राप्य स्वर्गांना नैसर्गिकतेचा आभास निर्माण करण्यासाठी हे सारे केले जाते हे विशेष!
पण यापेक्षाही वाईट भाग हा, लोकांच्या बदललेल्या मनोवृत्तीचा असतो. गाववाले त्यांचे स्वयंपूर्ण शेती, मच्छिमारी, कारागिरीचे पारंपारिक व्यवसाय सोडून देऊन या रिसॉर्टच्या ‘पैसा फेको, तमाशा देखो‘ अर्थ व्यवस्थेला सहज बळी पडतात. लवकरच गाववाल्यांची स्वतःची सारी कमाई धंद्याची साधने बुडतात. त्यांना नवीन शब्द, नवीन प्रकारची कामे, नवीन आज्ञावल्या शिकाव्या लागातात, मिळतील ती चतुर्थ श्रेणीची कामे, पर्यायाने बिगारी स्विकारावी लागते. या असल्या पर्यटन संस्कृतीचा परिणाम हा नेहमीच (नैसर्गिक व सांस्कृतिक) पर्यावरणाच्या प्रदूषणात दिसून येतो. त्यांचा -हास हा ठरलेलाच.
आपल्याला विचार आणि योजनापूर्वक (वेगवेगळ्या आवडी परवणा-या) पर्यटन स्थळांच्या मांदियाळीत आपली जागा ठरवावी आणि नक्की करावी लागेल. न पेक्षा ज्या नैसर्गिक सदरतेच्या जीवावर आपण पर्यटनातून येणा-या समृद्धीची सुखस्वप्ने पाहतोय, त्या नैसर्गिकतेचेच दिवाळे वाजलेले असेल. साहजिकच पर्यटनाचेही. त्यामागोमाग पर्यटन व्यवसाय वाढत जाताना सोन्याची अंडी देणारी कोंबडीच मारली जायचा हा धोका हर घडी, पावलाला आपल्या समोर येत असतो. म्हणूनच सतत सावध रहावे लागते.
याचे एक खास उदाहरण सांगतो - १९९८ साली स्पेनला ५ कोटी पर्यटक भेट देत होते आणि एकट्या पर्यटन व्यवसायाचा वाटा देशाच्या एकूण आर्थिक उलाढालीत १० टक्के होता. लवकरच पूर्वी निसर्गसुंदर असणारे समुद्रकिनारे गैरबांधणींच्या हॉटेलांनी आणि रिसॉर्टनी भरभरुन व्यापले. किना-यांची प्रचंड झीज होऊ लागली. पाणी पोहण्यासाठी अयोग्य, अतिशय दुषित झाले. एकेकाळची स्वप्नसुंदर निसर्ग स्थळे, बकाल शहरीकरण झालेली भयाण स्वप्ने बनली. अगदी काही वर्षापूर्वी जिथे पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे नाचत होते तिथे आता कोणी फिरकेनासे झाले. हल्ली काही वर्षे तिथली हॉटेले रिकामीच असतात. पैशाचा ओघ पुरता घटलाय. सुखचैनीचा स्वर्ग म्हणून मिरवणारी क्रॉन्क्रीटची बांधकामे आता केवळ ढिसाळ व्यवस्थापन आणि नियोजन शून्यतेची चिन्हे म्हणून शिल्लक राहिली आहेत. गोव्यातील कळंगुटचा प्रवास याच दिशेने चालू आहे.
स्पेनमधील पर्यटन व्यवसायातील ही अधोगती आपल्या समोर या अतिगर्दीतल्या पर्यटनाचे धोके सुस्पष्ट करते. हे ‘स्वर्गा‘ च्या शोधात फिरणारे पर्यटक आणि त्यांच्या चुकीच्या मागण्या पुरवण्यासाठी धावताना, निसर्ग संवर्धनाचे नियम न पाळण्याचा आततायीपणा सरते शेवटी कसा घातक ठरतो हे दिसून येते. पर्यावरण विनाश, प्राण्यांच्या-वनस्पतींच्या प्रजातींच्या वंशसंहाराची सध्याची समस्या ही या सर्वांच्या मुळाशी असलेल्या एका चुकीच्या मानवी धारणेतून उद्भवलेली आहे. ती म्हणजे आम्ही कितीही जंगले कापली तरी ती कधीच संपणार नाहीत. हवे तेवढे कायम पुरवित राहणार आहेत आणि आधुनिक सुखसोई इतर कशापेक्षाही जास्त मोठ्या गरजेच्या आहेत. त्यालाच आपण प्रगती म्हणतो, आपल्या देशात येणा-या आधीच्या पर्यटकांची हीच मनोवृत्ती होती. आजही ‘स्वर्गा‘ चा शोध घेत येणा-या बव्हंशी पर्यटकांच्या डोक्यात तिच असते आणि त्यांच्या मागण्या पुरवण्यात सोन्याच्या संधी पाहणा-या ब-याचशा स्थानिक गाववाल्यांच्या डोक्यातही.
तर ‘शाप लोपू‘ चा उद्देश हा आपल्या सिधुदुर्गातील नैसर्गिक व सांस्कृतिक श्रीमंतीवर प्रकाशझोत टाकण्याचा आहे. आपल्या लोकांची, वस्तूंची (सिधुदुर्ग ब्रँड) ची खास किमत जागा जगात निर्माण करायचा आमचा प्रयत्न आहे. जिच्या माध्यमातून आम्ही आमची आर्थिक श्रीमंतीही वाढवू शकू. न की नैसर्गिक, सांस्कृतिक, सामाजिक गोष्टींचे मायनिग करुन त्या बाहेर रित्या करुन. तसेच आम्ही पर्यटन व्यवसायातील आमच्या लोकांना त्यांच्या व्यवसायातील वेगवेगळे उपयुक्त व पर्यावरणाची शाश्वती देणारे पर्याय आणि बदलही सुचवू.
सिधुदुर्गातले पर्यटन म्हणजे केवळ आंबोलीचा धबधबा आणि मालवणचा किल्ला नव्हे. सिधुदुर्ग जिल्हा म्हणजे केवळ वाळूचे किनारे नव्हेत आणि मालवणी खाणंपिण्याची खासियत कोंबडी, वडे - सागोती यावर संपत नाही. चितारी कला आणि गंजिफा इतकीच कला इथे आहे असेही नव्हे. सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांपेक्षाही इथल्या आठवणी, स्मृतिचिन्हे म्हणून नेण्यासारख्या इतर खूप खूप गोष्टी आहेत. ते माहित करुन घेऊया.
येत्या गणेश चतुर्थीचा शुभमुहुर्त साधत, आम्ही आमच्या मुख्यपृष्ठावर ‘कोईळ-मालवण‘ येथील अप्रसिद्ध परंतु विशेष असा गणेशोत्सव दाखवला आहे. हे सा-या गावाला समृद्ध करणारे, सर्व गाववाल्यांच्या सहभागाने साजरे होणारे खरोखर प्रेरणादायक उदाहरण आहे. ही कोईळ -वासियांची खास परंपरा सामाजिक बंधुभावाचे उत्तम प्रतिक आहे. आम्ही अभिमानाने सा-या जगाला हा आमचा सामाजिक जपलेला वारसा आणि सहजीवन दाखवू इच्छितो.
आमच्या ‘शा.प.लो.पु.‘ मधील लिखाण हे व्यावसायिक पत्रकारांकडून नव्हे तर साधारण आणि असाधारण अशा आमच्या सिधुदुर्गवासियांकडूनच लिहिलेले असेल. तसेच देशातील पर्यटन व्यावसायिकांकडूनही मुद्दामहून आमंत्रित केलेले लेख असतील.
आमचे काम आपल्या जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील जुन्या जाणत्यांना बोलते करायचे आहे. त्यांनी या नवीन आशावादी बदलांचे, आपल्या आसपास गावात असलेल्या पर्यटनासंबंधीत दडलेल्या शक्यतांचे सूतोवाच करावे. नवशिक्यांना मार्गदर्शन करावे. शाश्वतीची हमी देणा-या नव्या कल्पनांना, विचारांना आणि नवोदितांना उत्तेजन द्यावे.
आमचे हे नवशिके प्रयत्न जरुर आहेत. पण ते व्यावसायिकांच्या कुशलतेने आम्ही पार पाडू. याचसाठी सिधुदुर्गातील प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या ‘साप्ताहिक किरात‘ च्या माध्यमातून दर महिन्याला आपण भेटणार आहोत.
आपणा सा-यांना आमच्या या ‘शाश्वत पर्यटनासाठी लोकांचा पुढाकार‘ या उपक्रमात सामील होण्याचे मनःपूर्वक हार्दिक आमंत्रण.
- जॉर्ज जोएले

अंक ३३वा, ८ सप्टेंबर २०११

अधोरेखीत *
कोकणात अॅडव्हेंचर टुरिझम
नॅशनल हायवे अथॉरिटी, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, त्यांचे सार्वजनिक बांधकाम खाते, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संयुक्त सहभागाने कोकणात ‘अॅडव्हेंचर व्हेईकल टुरिझम‘ ची सोय निर्माण झाली आहे.
आतापर्यंत अॅडव्हेंचर टुरिझम म्हणजेच साहसी पर्यटन. हे पर्यटकांना समुद्रातील स्पीड बोटीच्या सहाय्याने समुद्राच्या लाटांवर स्वार होत चित्तथरारक सैर करणे, उंच डोंगरद-यांतून पॅराग्लायडींग, दोन द-यांमधले व्हॅली क्रॉसिग,साहसी गिर्यारोहण इ. पर्यंतच मर्यादित होते. कोकणातील रस्त्यांवरचा प्रवास हे देखील एक साहसी पर्यटन ठरु शकते हे
आजपर्यंत कोणी लक्षातच घेतले नव्हते!
परंतु सरकारनेच कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करता या साहसी पर्यटनाचा पर्याय पर्यटकच नव्हे तर तमाम कोकणवासियांना दिला आहे. थेट पनवेल ते गोवा हद्दीपर्यंत सुमारे ३५० कि.मी.चे हे व्यापक पर्यटन क्षेत्र समस्त प्रवास करणा-या लोकांना निःशुल्क खुले करुन दिले आहे.
सर्वसाधारण रस्ते हे वाहनांद्वारे वाहतुक सुखकर व्हावी यासाठी असतात. तसे कोकणातील रस्ते एकेकाळी होते सुद्धा.
नैसर्गिक वळणा-वळणांचे बारीक रस्ते, ज्याला सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग एन.एच.१७ असे नाव दिले आहे. हा रस्ता सुद्धा प्रत्यक्षात वळणांचा, चढ-उतारांचा आणि राज्यमार्गाएवढाच रुंदीचा आहे. आता तर तो खड्डयांमुळे धोकादायक बनलेला आहे. अशा धोकादायक रस्त्याने वेगाने प्रवास करणे हेच ‘अॅडव्हेंचर टुरिझम‘!
विशेषतः प्रगत पाश्चात्य राष्ट्रांमध्ये दुचाकी वाहनांनी डोंगर उतारावरुन, खड्डयांतून, पाण्यातून वेगाने वाहने चालविण्याची स्पर्धा असते. त्यासाठी मोठा खर्च करुन विशिष्ट पद्धतीच्या अडथळ्यांच्या ट्रॅकची रचना केली जाते. त्यावरुन वेगाने वाहन चालविणे हा एक चित्तथरारक खेळ असतो. त्यासाठी मोठमोठी बक्षिसेही असतात.
आपल्याकडे कोकणात मात्र सरकारला कोणताही खर्च करावा न लागता बनलेले महामार्ग, राज्यमार्ग, ग्रामीण रस्ते आपोआपच धोकादायक बनलेले आहेत. त्याचा लाभ साहसी पर्यटन करणा-यांनी तसेच विदेशातल्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन ज्यांना बक्षिसे मिळवायची आहेत अशा ‘बाईकर्सना‘ घेता येईल. या रस्त्यांवरुन वेगाने प्रवास करु शकणारे निश्चितच विदेशात मोठमोठी बक्षिसे मिळवतील.
पुरस्कारासाठी चुरस
महामार्गाची निगा राखण्यासाठी केंद्रीय स्तरावर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, सरकारी बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग या सरकारी यंत्रणा सज्ज असतात. संबंधित खात्यांचे मंत्री, निविदा काढणारे, मंजूर करणारे अधिकारी, पदाधिकारी हे या संस्थांच्या कारभारावर बारीक लक्ष ठेवून असतात. सन २००६ नंतर या मार्गाच्या सुधारणेसाठी कोणताही निधी नसतांना देखील सर्व खात्यांनी समन्वय साधून साहसी पर्यटनाचा ठेवा कोकणवासीयांना दिल्याबद्दल सर्व स्तरातून संबंधीत मंत्री, खात्यांचे अधिकारी, ठेकेदार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध स्वयंसेवी संस्थांनी तीनही जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते २६ जानेवारीला संबंधित खात्यांचा प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
श्रीधर मराठे

संपादकीय *
प्रवाशांना खंडणी आणि प्रवाशांनाच धक्के
मुंबईसारख्या महानगरांमधून छोटे-मोठे व्यावसायीक, बिल्डर, व्यापारी यांच्याकडून गँगस्टार - दादा लोक त्या त्या व्यावसायीकाच्या मगदुराप्रमाणे खंडणी म्हणून (त्याला ‘सिक्युरिटी - मनी‘ म्हटले जाते) दर आठवड्याला किवा दर महिन्याला एक ठराविक रक्कम घेतात. त्या बदल्यात त्यांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी ‘संरक्षण‘ देतात. गँगस्टारच्या नेत्यांनी आपापसात ‘एरिया ठरवून घेतलेला असल्याने दुस-या टोळीचा कोणी त्या व्यावसायीकाकडून कधी पैसे घेत नाही किवा काही त्रासही देऊ शकत नाही. उद्योग, व्यवसाय, धंद्यांना खरेतर सरकारचे म्हणजे पोलिसांचे संरक्षण असते, असले पाहिजे. पण तरीही असे बेकायदेशीर खाजगी धंदे चालतात. लोकही त्यांना पैसे देतात. कित्येकदा आपापसातील भांडणतंटे मिटविण्यासाठी या गँगस्टारांचीच मदत घेतात. धंदा बेकायदेशीर असला तरी त्यात प्रामाणिकपणा असतो. पोलिसांपेक्षा या ‘दादा‘ लोकांचीच लोकांना दहशत असते आणि शिस्तही असते. त्यामुळे पोलिसही सर्वसामान्यांना संरक्षण देणे, त्यांचे भांडण-तंटे मिटविणे, गुन्हेगारांना पकडणे ही सरकारचा पगार घेऊन करावयाची नित्याची कामे फारशी करीत नाहीत. अशी पोलिस खात्याशी या ना त्या प्रकारे संबंध येणा-या लोकांची तक्रार असते. पण निदान खंडणी बहाद्दर आणि पोलिस पैसे घेऊन सर्वसामान्य लोकांना त्रास होईल अशी कामे तरी करीत नाहीत.
परंतु आपले बांधकाम खाते, त्यांनी नेमलेले कंत्राटदार हे बहुधा कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी बांधलेले असतात. हे प्रामुख्याने रस्त्यांची, सरकारी इमारतीची निर्मिती आणि देखभाल करतात. तेच या खात्याचे मुख्य काम असते. पण सध्या राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, ग्रामीण रस्त्यांची झालेली व होत असलेली दुर्दशा पाहिली की हे खाते अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडावा.
बांधकाम खात्याने केलेल्या रस्त्यांबद्दल रोजच्या रोज वृत्तपत्रांतून रस्ते कसे खड्डेमय झाले आहेत ते दिसत असते. त्यावर तात्पुरती मलमपट्टी केल्यासारखी उपाय योजना केली जाते. पण काही महिन्यांतच रस्ते पुन्हा उखडतात. याच रस्त्याने बांधकाम खात्याचे अधिकारी, मंत्री प्रवास करीत असतात. पण कोणीच याकडे लक्ष देत नाहीत.
हा निगरगट्टपणा आला कोठून? कंत्राटदाराकडून मिळणा-या पैशातून, साहित्य खरेदीतून, एखाद्या कामाची निविदा प्रसिद्ध होते. अनेक कंत्राटदार ती भरतात. कोणाची कमी किवा कोणाची जास्त दराची असते. त्यांच्याशी व्यक्तिशः ‘डिलिग‘ होते. निविदा मंजूर करणे, ते काम पूर्ण झाल्यावर त्याचे पैसे कंत्राटदाराला देणे या सगळ्या टप्प्यावर संबंधीत अधिकारी पैसे घेत असतात. या टक्केवारीच्या वाट्यात लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधीही कित्येकदा सामील असतात. त्यामुळे टक्केवारी ५०-५० ची आता ६०-४० वर पोचली आहे. (६० वाटण्यासाठी आणि ४० कंत्राटदारासाठी) यातून कंत्राटदार शंभर टक्के काम कसे पुरे करणार? मग त्याच्याकडून निकृष्ट साहित्य तेही कमी प्रमाणात वापरणे, रस्त्याच्या रुंदीकरणातला काही भाग न करणे या अशा अनेक मार्गांनी आपले होणारे नुकसान भरुन काढीत असतो.
आता कंत्राटदार हा अधिका-यांचे वरकमाईचे साधन असल्याने त्याला तर टिकवला पाहिजे म्हणून न केलेल्या कामाचीच वाढीव अंदाजपत्रके करणे, खरेदीच्या कामात गैरव्यवहार करणे, क्वालिटी कंट्रोलवाल्यांना भागविणे, कंत्राटदाराला टेंडरशिवाय केली जाणारी इतर छोटी कामे देणे. अशाप्रकारे त्याची नुकसान भरपाई करुन दिली जात असते.
विषय आला रस्त्यातील खड्यांवरुन.... लोक वाहनांतून प्रवास करीत असतात. त्याकरिता सरकारला रोड टॅक्स व अन्य कर भरीत असतात. आता तर चौपदरी, सहापदरी, मोठे सरळ आरामदायी प्रवास देणारे रस्ते निर्माण होऊ लागले आहेत. त्यांचा पैसा रस्ता बांधकाम करणा-या कंपनीला सरकार देत नाही तर त्या कंपनीने त्या रस्त्याने जाण्यायेण्यासाठी पथकर (टोल) आकारणी करुन प्रत्येक वाहनाकडून तो वसूल करायचा असतो. हेही सगळे मूळ अंदाजपत्रकात नमूद असते. या ‘टोल‘द्वारे आणि पुढील दहा वर्षांच्या देखभाल दुरुस्ती करण्याएवढे पैसे जमा झाले तरीही टोल सुरुच असतो. या सर्वच रस्त्यांवर मोठा भ्रष्टाचार होत असतो. रस्त्याची देखभाल, दुरुस्तीही नीट होत नाही. त्यात काही वर्षातच खड्डे पडू लागतात. मग अपघात ठरलेले.
म्हणजे या द्रुतगती मार्गामुळे पूर्वीचा मोफत प्रवास करु देणारा रस्ता बंद, लोकांनी भरमसाठ टोल भरुन या नव्या मार्गानेच प्रवास करायचा. खड्डे पडले आणि त्यामुळे अपघात घडले तरी जबाबदारी प्रवाशांचीच. असा धक्कामय प्रवास लोकांच्या वाट्याला आला आहे. द्रुतगती मार्गामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन वाचेल हे धोरण होते. तेच मातीमोल झाले आहे. यासाठी सत्ताधा-यांनाच धक्का देणे आवश्यक आहे. पण एक पक्ष गेला तरी दुसरा पक्ष तेच करणार आहे. लोक मात्र धक्के खात राहणार आहेत.
सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनी खड्डेमय रस्त्यांची दखल घेतली असल्याचे वृत्तपत्रांतील बातम्यांवरुन दिसते. त्यासाठी खड्डयात वृक्षारोपण, (पावसामुळे रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन करता येत नाही ही सध्या अडचण) संबंधीत अधिका-यांना घेराव असे प्रकार सुरु आहेत. त्यावर खात्याकडून भर पावसात खड्डे बुजविण्याचे काम सुरु होते. ते अर्थातच वाया जाते. मग तेच काम पुन्हा केले जाते. या कामांसाठी निधीच नाही अशी खात्याची तक्रार असते. मग मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे भरपूर निधी मिळतो. तोपर्यंत पाऊस संपतो. आता पावसानंतर लगेच निवडणुकांचा पाऊस सुरु होईल. त्यामुळे खड्डयांकडे पहायला कोणालाच वेळ नसणार. कंत्राटदार खड्डे बुजविण्याची कामे करीतच असणार. त्याकडेही कोणाचे लक्ष नसणार. मग पुढच्या पावसात खड्डयांमुळे ओरड करण्याचे काम कार्यकर्त्यांना आहेच.

विशेष *
गणेशोत्सवातून पर्यटन
गणेशोत्सव हा आपल्या कोकणातील लोकांसाठी सर्वात मोठा सण. लहानग्यांसाठी तर पर्वणीच. छोट्या मुलांच्या नजरेतून पहाल तर गणपती बाप्पा म्हणजे त्यांचा सर्वात आवडता. कारण या दिवसात शाळेला सुट्टी, खाण्यापिण्याची, खेळण्याची चंगळ, फटाके वाजविण्याचा आनंद. त्यामुळे त्यांच्या उत्साहाला मर्यादाच नाहीत.
मोठ्या माणसांचं म्हणाल तर प्रत्येकाच्या तोंडी असंच ऐकायला येईल की, ‘‘आज-काल काही दम नाही ह्या उत्सवात. पण आमच्या लहानपणीचा गणेशोत्सव म्हणजे काही विचारुच नका.‘‘ असं कितीही ऐकावं तरी त्यांचा उत्साह हा तेवढाच दांडगा, कारण घरात गणपती येणार म्हणजे सर्व तयारीही त्यांनाच करावी लागणार ना!
हे सर्व झालं प्रत्येकाच्या घरातील गणेशोत्सवाबद्दल. पण त्याही पलिकडे ‘सार्वजनिक गणेशोत्सव‘ हा एक वेगळाच विषय आहे. वेगवेगळे देखावे-डेकोरेशन्स करण्यात त्यांना दिवस -रात्र पुरे पडत नाहीत. त्यांच्या उत्साहाची तुलना कशालाच नाही. लो. टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला त्याचे जिवंत उदाहरण आपल्याला पाहता येते ते म्हणजे लोकसहभाग - लोकांना एकत्र आणणे, त्यातून प्रबोधन वगैरे - वगैरे.
पण, खरच आता गणेशोत्सवाचे ते रुप राहिलं आहे का? कारण आधीचा सार्वजनिक गणपती आता नाक्या-नाक्यावर, गल्ली-गल्लीत, पक्षा-पक्षात येऊ लागला आहे. त्यामुळे होतं काय? की सामान्य माणसाची प्रत्येक गणपती मंडळाची वर्गणी देऊन-देऊन पुरती वाट लागते आणि त्यातून त्याचा परत घरातील गणपती आहेच. याचा अर्थ मी असं बिलकूल म्हणत नाही की अशी अनेक गणेशोत्सव मंडळे असू नयेत. पण जशा गल्ली-बोळात आणि वाडीवार क्रिकेट टिम तयार होतात तशी गणेश मंडळे असू नयेत.
सार्वजनिक गणेशोत्सवाचा अर्थ सर्वांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करायचा असा जर असेल तर प्रत्येक नाक्यावर गणेशोत्सव करणे म्हणजे प्रत्येकाने स्वतःचा वेगळा असा गणपती पुजणे असा होतो. मग त्याला सार्वजनिक गणेशोत्सव कसे म्हणता येईल?
बरं... आता तर वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडूनही (सार्वजनिक) गणेशोत्सव केला जातो आणि डेकोरेशनच्या बाहेर त्यांच्या त्यांच्या पक्षाचे झेंडे, बॅनर लागतात. हे कितपत योग्य आहे? म्हणजे कमीत कमी देवाकडे तरी पक्ष, राजकारण आणू नये ही त्या सर्वांना विनंतीच करावी लागेल. कारण काय होतं, मंडळाच्या बाहेर पक्षाचे झेंडे/फलक दिसले की सामान्य माणसाच्या मनात प्रश्न येतो की गणेशाच्या दर्शनाला जावे की नको, कारण मी इकडे जर गेलो तर दुसरे पक्षवाले आपल्यावर राग धरतील, म्हणजे गणपतीच्या दर्शनाला देखील खुल्या मनाने जाता येऊ नये, तर कसला उत्सव आणि कसले काय?
आपल्या कोकणवासीयांच्या सुदैवाने ही परिस्थिती आपल्या सिधुदुर्गात अजून आलेली नाही. मुंबई-पुणे-ठाणे इथपर्यंतच आहे. पण यासाठी आपणास खूष होऊन भागणार नाही. कारण ही परिस्थिती आपल्याकडे येण्यास फार काळ लागणार नाही. त्यासाठी आपण आतापासूनच सजग आणि जागृत होणे आवश्यक आहे.
गणेशोत्सव हा आपला सर्वात मोठा उत्सव. याचा उपयोग आपण पर्यटन विकासासाठी करु शकतो, किवा यातून काही रोजगार निर्मिती होऊ शकते. पाश्चिमात्य देशात त्यांच्या उत्सवांचा पर्यटनासाठी उपयोग केला जातो. तसाच आपल्या गणेशोत्सवाचा वेगळ्या धाटणीने उपयोग करुन घेता येईल. कारण पर्यटन-पर्यटन म्हणजे नुसते समुद्र किनारे, प्रेक्षणीय स्थळे दाखविणे, हॉटेल्स बांधून त्यांत पंजाबी आणि चायनिज पदार्थ ठेवणे हे नव्हे, तर अशा आपल्याकडील सणांचा पर्यटनासाठी उपयोग करुन त्यातून अर्थकारण वाढविणे हे आपण नक्कीच साध्य करु शकतो.
हे जरुर मान्य की, लगेचच अशा गोष्टी होणे शक्य नाही. पण आज जर आपण अशा गोष्टींची सुरुवात केली तर येत्या काही वर्षात आपण नक्कीच ही गोष्ट साध्य करु शकतो. पण त्यासाठी सुरुवात ही आजपासूनच झाली पाहिजे.
-जितेंद्र वजराटकर, ९८६००५२३८३

विशेष बातम्या *
वेंगुर्ले येथे गणेश मूर्तीमागील भित कोसळली
बॅ.खर्डेकर मार्गावरील एव्हरीमन बेकरीसमोर असलेल्या लीलाधर केनवडेकर बंधु-भगिनींच्या घरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. घरात लीलाधर, त्यांची पत्नी शामला, बहीण किरण चिपळूणकर व पुतणी सुनयना चिपळूकर हे राहतात. सतत पडणा-या पावसामुळे गणेश मूर्तीमागील भित पूर्णतः कोसळली. तलाठी मिनीन फर्नांडीस, बांधकाम निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे.

ओहोळात वाहून गेल्याने कुडपकर भगिनींचा मृत्यू
गणपतीनिमित्त्त वाजविलेल्या फटाक्यांचा कचरा गोळा करुन तो घरालगतच्या ओहोळात टाकण्यासाठी गेलेल्या भटवाडी येथील वैदेही संतोष कुडपकर (वय ६) व चिन्मयी संतोष कुडपकर (वय ४) या सख्ख्या बहिणी ३ सप्टेंबर रोजी ओहोळात आलेल्या पुरात वाहून गेल्या. चिन्मयीचा मृतदेह घरापासून ३ कि.मी. अंतरावर तर वैदेहीचा ६ कि.मी. नवाबाग येथे सापडला.
वैदेही व चिन्मयीचे वडील कामानिमित्त बाहेरगावी असतात. त्यामुळे त्या दोघी व तिची आई, दोन वर्षाचा भाऊ आजोबांसमवेत वेंगुर्ले-भटवाडी येथे राहत होते. कुडपकर भगिनींच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.