Friday 18 November, 2011

अंक ४२वा, १७ नोव्हेंबर २०११

अधोरेखित *
पाव रे देवा*..!
लष्कराच्या भाक-या भाजणा-या आचा-याला काय म्हणतात? बरेचदा आपण ‘सामाजिक‘ कामाकडे लष्कराची भाकरी म्हणून पाहतो. ‘तुला जगाचं काय करायचं आहे? तुझ्यापुरतं बघ.‘ असा घोषा लहानपणापासून आपण ऐकतो. वृत्तपत्रांमधील समाजात घडणा-या ब-यावाईट बातम्या चहाच्या कपाबरोबर वाचतो, ‘असंच चालायचं, जगात काही उरलं नाही, आमच्यावेळी असं नव्हतं‘ असा नकारात्मक सूर येतो. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्येसुद्धा राजस्थानमधील तरुण भारत संघाचे डॉ. राजेंद्र सिंह, कुष्ठरोग्यांच्या आयुष्याला नवीन धुमारे फोडणारे डॉ. बाबा आमटे व कुटुंबिय, तरुणांनाही लाजवतील असे अण्णांचे राळेगणमधील प्रयोग या सर्वांमधून एक मोठा दबाव गटही तयार होतो. हातातील मेणबत्तीचं रुपांतर ‘पणती‘ मध्ये होते. तसेच कर्पूरासमान ‘निर्मम‘ भावनेने जळणा-या कार्यकर्त्याच्या समुहातून स्वराज्याचे रुपांतर सुराज्यामध्ये होते. या सर्वांचा समुह, त्याचे नाव म्हणजे ‘स्वयंसेवी संस्था‘. ग़्क्रग्र् पेक्षा मला ‘स्वयंसेवी‘ हा शब्द भावतो.
आपणाला गावांगावांमध्ये एक आख्यायिका ऐकायला मिळेल की, हे मंदिर पांडवांनी एका दिवसात बांधलं. काही गावातील मंदिरं अपुरी राहिली कारण म्हणे, पांडवांनी ते गाव अचानक सोडलं. याचा सामाजिक अर्थ काय? पांडव हे समाजातील विविध प्रवृत्तीचं रुपक आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यास प्रश्न एका दिवसात सुटतात. वैयक्तिक अभिनिवेश आले की मंदिर होत नाही. चांगला दाणा मातीत गेल्याशिवाय शिवार बहरत नाही. समाजातील सर्व लोकांना ही विकास प्रक्रिया समजावून सांगणे महत्वाचे आहे.
पाषाणाला गा-हाणे घालणारा तटस्थ असतो. जो दुःखी, कष्टी आहे तो आपले म्हणणे त्याच्यामार्फत व्यक्त करतो. स्वयंसेवी संस्थेची भूमिका ही त्याच्याप्रमाणे आहे. मला फेव्हीकॉलची जाहीरात आठवते. ‘अंड फुटत नाही, तुटत नाही. असं का? तर, मालकीणीने कोंबडीला खाद्य फेव्हीकॉलच्या रिकाम्या डब्यातून दिलेलं असतं.‘ गंमतीचा भाग सोडा. स्वयंसेवी संस्था ही फेव्हीकॉल सारखी असते. सनमाईक व प्लायवुडमधला दुवा असते. शानाच्या कल्याणकारी योजना व सामान्य माणूस यामधला दुवा.
शासनाची पूर्वी गाव दत्तक योजना असायची. आता शासनाने शब्द बदलला. योजनेचं नाव झालं ‘गाव विकास योजना‘. दत्तक हा शब्द वेगळा भाव दाखवितो. जलस्वराज्य, स्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलित योजना या सर्वांमधील घोषवाक्य असते, ‘लोकांचा पुढाकार, त्यात शासनाचा सहभाग.‘ अन्यथा विकास हा पुरवठा आधारित होतो. मागणी आधारीत विकास हा शाश्वत असतो. माझं भाताचं उत्पन्न वाढलं पाहिजे म्हणून मी चारसुत्री वापरली पाहिजे. म्हणूनच वनवासी भागातील डॉ. दफ्तरदारांचे काम लोकांना भावले. आज चारसुत्री ही लोक चळवळ होत आहे. ‘बायोगॅस‘ चा उपक्रम ही लोक चळवळ होत आहे. ‘अनुदान नाही मिळालं तरी चालेल, आम्ही गॅस बांधणार‘ ही भूमिका लोककल्याणकारी राज्यासाठी पोषक ठरते. अधिकाराबरोबरच कर्तव्याची जाणीव निर्माण करायचं काम स्वयंसेवी संस्था करते. आपल्या जिल्ह्यातील कॉनबॅक, लुपिन यांची कामं आदर्शवत आहेत. आपला जिल्हा हा आप्पासाहेब पटवर्धनांचा वारसा सांगणारा आहे. विनोबाजी म्हणायचे, ‘एक आप्पा, बाकी सारे गप्पा.‘
एकाच स्वयंसेवी संस्थेचा एकछत्री अंमलही धोकादायक असतो. दहा गावांसाठी एक स्वयंसेवी संस्था असावी. सर्वांनी परस्परांमध्ये संवाद ठेवावा. पक्षीय राजकारणा पासून सुरक्षित अंतर ठेवावे. ही संस्थेची पथ्यपाणी ठरतात. अन्यथा संस्था ‘संस्थान‘ बनतात. ‘लोकांसाठी काम‘ न करता ‘लोकांबरोबरचे काम‘ अधिक शाश्वत असते. त्यातून मिळणारे समाधान वेगळेच असते. तसं पाहिलं तर पंढरपूरच्या वारीला चालत जाणारे वारकरी स्वतःच वजन घटवतात, प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहतात, शासनाचा क्रङ नसताना मोठा जनसमुदाय जमतो. रिगण जमतं. हरवलेला आत्मविश्वास पंढरपूरला सापडतो. आपपर भाव जातो. मोबाईलच्या भाषेत सांगायचं तर एक वर्ष टिकणारी व्हॅलीडीटी व रिचार्ज पंढरपूरचा विठोबा माऊली आपणाला देतो.
सारं काही सरकार, राजकारणी करतील असं न म्हणता आम्ही विकासाची प्रक्रिया सुरु करु हे आत्मभान जागं करण्याचं काम ‘भगीरथ‘ सारखी संस्था करते आहे. त्यातून लोकचळवळ उभी रहात आहे. बँक, प्रशासन, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व स्वयंसेवी संस्था हे विकासाचे पंचक असतात. तुम्ही विचाराल, यामध्ये भीम कोण? अर्जुन कोण? उत्तरादाखल एवढेच सांगतो, माणूस हा संस्काराने बदलतो. रुपक हे समजण्यासाठी असतं. कोकणी पद्धतीने त्याचे विश्लेषण करुया नको. गिरणी बंद झाल्या. चाकरमानी मनीऑर्डर बंद झाली. चीपीचे विमानतळ, सी वर्ल्ड, सेझचे पडघम वाजत आहेत. डेअरीचा मुद्दा चर्चेमध्ये येत आहे. हे सर्व शुभसंकेत आहेत. आपण या सर्वांच्या स्वागतासाठी तयार होऊया. मंदिरांचे जीर्णोद्धार करुन झाले की गावामध्ये इंटरनेट, शिष्यवृत्तीचा क्लास आपणच सुरु करुया. ही आपली सर्वांची गरज आहे. भविष्याचं हेच आपल्याला सांगणं आहे. मुळातच उशीर झालाय. आता झोप तर सोडाच पण झोपेचं सोंगही नको. एक ना एक दिवस उलटी मनीऑर्डर ‘कोकणातून मुंबईला‘ पाठवायची आहे. गावच्या पाषाणाला स्वयंसेवी संस्था म्हणून हेच आपलं
गा-हाणं आहे. पाव रे देवा!!
-डॉ. प्रसाद देवधर
भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान,झाराप,
ता. कुडाळ. ९४२२५९६५००.

संपादकीय *
सत्ता, संपत्ती हेच उद्दिष्ट?
८ डिसेंबरला होणा-या नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सरकारच्या निवडणुक आयोगाने प्रभाग रचनेत बदल करुन निवडणुक लढवू इच्छिणा-या उमेदवारांची खूपच गोची करुन ठेवली आहे. त्यात पुन्हा महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव केल्याने बरेच उमेदवार निवडणूकीपूर्वीच पराभूत झाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषतः नगरपालिकांच्या प्रभाग रचनेबाबत निवडणुक विभागाने मनमानी बदल करण्यात सातत्य दाखविले आहे. अर्थात राज्य सरकारच्या आदेशानुसारच हे प्रयोग चाललेले असतात.
लोकसंख्या आणि सलगता इत्यादी निकषांवर नगरपालिकांचे वॉर्ड पाडण्यात येतात, त्यानुसार सिधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही नगरपालिकांमध्ये प्रत्येकी १७ वॉर्ड करण्यात आले आहेत. निवडून आलेल्या सतराजणांतून एक नगराध्यक्षपदी विराजमान होतो.
स्थानिक जनतेची कोणतीही मागणी नसतांना सुमारे तीस वर्षापूर्वी नगराध्यक्ष हा संपूर्ण न.प. क्षेत्रातील सर्व मतदारांनी निवडून देण्याचा प्रयोग झाला. त्यामुळे वार्ड निहाय निवडून येणारे नगरसेवक तसे नामधारीच ठरु लागले. पाच वर्षासाठी नगराध्यक्षांचा एकछत्री अंमल सुरु झाला. त्याचे परिणाम किवा दुष्परिणाम कोकणात फारसे नाही पण पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ वगैरे पट्टयात दिसून आले. संपूर्ण शहरातून नगराध्यक्ष निवडला गेल्याने नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यात राजकीय वाद सुरु झाले. नगराध्यक्षांच्या राजकीय आकांक्षाही वाढल्या. त्यानंतर काही वर्षे निवडणुका न घेता सरकारने सरकारी प्रशासकांच्या हाती न.प.चा कार्यभार सोपविला. त्यामुळे विकास कामे करण्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसल्याने जिथे चांगले, प्रामाणिक प्रशासक आले तेथे शहरात काही सुधारणा झाल्या.
पुढच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याचा फतवा जारी झाला. त्यावेळी नगराध्यक्षाची निवड नगरसेवकांनी दरवर्षी करण्याचाही प्रयोग झाला. त्यामुळे नगरपरिषदेत कायमच निवडणुकीचे वातावरण आणि नगरसेवकांमधील गटबाजी वाढीस लागली. पुढच्या निवडणुकीत नगराध्यक्षपद पाच वर्षांसाठी स्थीर झाले. पण त्यांना नगरपरिषदेतील पक्षीय, पक्षांतर्गत गटबाजीला तोंड देत कारभार चालवावा लागला. त्यानंतरच्या निवडणुकीत पुन्हा एकदा नगराध्यक्ष शहरातील सर्व मतदारांनी निवडून देण्याचा प्रयोग झाला. त्यावेळी हे पद पाच वर्षासाठी होते. त्यातूनही अनेक ठिकाणी पक्षीय राजकारण व दबावामुळे अधिकार असूनही नगराध्यक्ष शहरातील विकास कामे करण्यात हतबल ठरले.
त्यानंतर पुन्हा नगराध्यक्ष सर्व मतदारांनी न निवडता निवडून आलेल्या नगरसेवकांतून निवडून देण्याचा फतवा निघाला. त्यातही नगराध्यक्षपद हे अडीच वर्षाकरिता ठेवण्यात आले. त्यामुळे पक्षीय आघाड्या, युत्या यांमध्ये मोडतोड होऊन राज्यात सत्ताधारी असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या सहकार्याने सत्तेत येऊन पुन्हा एकदा अजब युत्या - आघाड्यांचे दर्शन लोकांना घडले.
आता येत्या निवडणुकीत वॉर्ड रचना रद्द करुन चार - चार वॉर्ड एका प्रभागात घालण्यात आले त्या संपूर्ण प्रभागातील मतदारांनी चार उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. हाच प्रयोग पूर्वीही झालेला होता. त्यातून चांगले निष्पन्न काय झाले हे कधीच कोणाला समजले नाही. आताही तोच प्रयोग राबविला जाणार आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या कारभारात नेमक्या कोणत्या चांगल्या सुधारणा होणार ते कोणालाच सांगता येणार नाही.
नाही म्हणायला नगरसेवकांना अधुनमधून सुगीचे दिवस येतात. पूर्वीचे पक्षनिष्ठा, दिलेला शब्द पाळणे हे प्रकार मागे पडून साम -दाम-दंड आणि भेद याच गोष्टीवर भर देऊन निवडून येण्याचे प्रकार वाढीला लागले. पैशांचाही बेसुमार वापर होऊ लागला. ते पैसे पुन्हा वसुल करण्यासाठी नगरपरिषदांच्या विकासकामांतून कंत्राटदारांकडून आपली टक्केवारी ठरविणे किवा स्वतःच डमी कंत्राटदार पुढे करणे हे प्रकार वाढले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेसाठी आमदार निवडण्यासाठी एका नगरसेवकाच्या
हे सर्व पहात असलेल्या पण निवडून न आलेल्यांना, आरक्षणामुळे निवडणूक लढवू न शकलेल्यांना, नगरसेवकांची आर्थिक सुधारणा पाहून पुन्हा पुन्हा निवडणूक लढण्यासाठी स्फूर्ती आलेली आहे.
यंदाच्या निवडणुकीपूर्वी राज्यात आघाडी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यात संघर्ष पेटल्याने दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुक लढवतील आणि नारायण राणे यांचे राजकीय वर्चस्व संपविण्याकरिता राष्ट्रवादी पक्ष भाजप, शिवसेना, रिपब्लीकन युतीला निवडणुकीनंतर सत्तेचे समिकरण जुळविण्यास हातभार लावील. नवीनच उदयास आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही स्वबळावर या निवडणुकीत उतरण्याचे ठरविल्याने काँग्रेस पक्ष मनसेला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करील. या युत्या, आघाड्यांच्या मोडतोडीत पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळालेले अपक्ष म्हणून निवडणूक लढवून मतांच्या बेरीज-वजाबाकीतून किवा आपल्या आर्थिक ताकदीवर निवडूनही येतील. मग त्यांना आपल्या बाजूला वळवून सत्तेचे समिकरण जुळविण्याचे सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरु होतील.
अर्थात हे सगळे अंदाज आहेत. पण यापुढे सत्ता संपादनासाठी दुस-सा पक्षाची मदत घेण्याशिवाय पर्याय नाही याची कबुली सर्वच पक्षांच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांनी दिलेली असल्यामुळे अगदी तळाच्या नगरपालिकांच्या निवडणुकांतही हे घडणे अपरिहार्य आहे.
या सर्वांमध्ये आपल्या शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास करणे हे सूत्र कोणाकडेही नाही. येनकेन प्रकारे सत्ता मिळविणे आणि प्रत्येक विकास कामांत लोककल्याणकारी योजनांत टक्केवारीने पैसे मिळविणे हेच सर्वांचे उद्दिष्ट आहे!

विशेष *
श्री देव रामेश्वर जत्रोत्सव सोमवार २१ नोव्हेंबर २०११
प्रत्येक वेंगुर्लेकर ज्याच्या चरणी नतमस्तक होतो असे वेंगुर्लेवासीयांचे आराध्य दैवत श्री देव रामेश्वराचा वार्षिक जत्रौत्सव कार्तिक वद्य ११, सोमवार दि. २१ नोव्हेंबर २०११ रोजी संपन्न होत आहे.
ग्रामदैवताची जत्रा म्हणजे घरचा उत्सव या नात्याने उत्सव प्रिय कोकणी माणूस त्याचे स्वागत करतो. प्रत्येकाकडे या निमित्ताने पै-पाहुणे, माहेरवाशिणी यांचे आगमन होते. त्यामुळे वातावरण आनंदी असते. वेंगुर्ल्याच्या जत्रौत्सवात श्री देवी सातेरीच्या जत्रेनंतर होणारी ही दुसरी मोठी जत्रा.
पहाटे श्री रामेश्वराची विधिवत पूजा झाल्यावर जत्रौत्सवास सुरुवात होते. भाविक सकाळपासूनच दर्शनाला गर्दी करतात. नारळ, केळी, फुले, बेल श्रींचरणी अर्पण करुन मनोभावे कृपेची मागणी करतात. मंदिर फुलांनी सजविले जाते. आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. जसजशी संध्याकाळ होत जाते तशी उत्सवाची मजा वाढत जाते. मंदिराभोवती मिठाईची, खेळण्यांची, दुकाने लागलेली असतात. गर्दीने आवार फुलून गेलेला असतो.
रात्रौ सुमारे ११ वाजता श्री देवी सातेरी व तरंग देवता यांचे सवाद्य मिरवणुकीने आगमन होते. त्यानंतर या देवतांसह श्री रामेश्वर, गणपती, भगवती, दत्त, नागनाथ व लालखी या सह मंदिराला प्रदक्षिणा होते. त्यावेळी फटाके - दारुसामानाची आतषबाजी केली जाते. पालखी प्रदक्षिणे नंतर वालावलकर मंडळाचे पारंपारिक पद्धतीने दशावतारी नाटक होते. त्यानंतर जत्रौत्सवाची सांगता होते.
ज्याची जशी श्रद्धा तशी त्याला प्रचिती येते. अनेक जण इच्छापूर्तीसाठी नवस बोलतात. जत्रौत्सवाचेवेळी किवा नंतर तो फेडतात. अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र, रामेश्वराला दहीभात लिपणे, नैवेद्य दाखविणे असे नवस असतात.
या मंदिरामध्ये श्री बाराचा नितकारी, गणपती, भगवती, नागनाथ, दत्त, शनि, मारुती व राम या परिवार देवता असल्याने एकाचवेळी सर्व देवतांचे दर्शन घडते. शिवाय या देवतांचे उत्सव, जयंत्या व वर्धापनदिन साजरे होत असल्याने महिन्याला एक तरी उत्सव होत असतो. त्यात महाशिवरात्र, आषाढातील भजनी सप्ताह, श्रावणातील सोमवारी होणा-या वरदशंकर पूजा, जत्रौत्सव व माघ महिन्यातील श्री गणेश जयंती हे उत्सव मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरे होतात. त्यांची लोक आतूरतेने वाट पहात असतात.
या वर्षीच्या जत्रोत्सवाचा व त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा अशी देवस्थान ट्रस्टतर्फे विनंती करण्यात येत आहे.

श्री गावडेश्वर जत्रोत्सव - बुधवार दि. २३ नोव्हेंबर २०११
सुमारे ३५० - ४०० वर्षापूर्वीच्या या स्वयंभू देवस्थानाला शिवकालीन परंपरा लाभली आहे. मंदिराचे बांधकामही भव्य आहे. देवस्थान संपूर्ण जागृत असून समस्त भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गावडेश्वर, वस, मूळपुरुष, सिद्धपुरुष, आदिमाया, देवी, ब्राह्मण, चाळा, रक्षक, नितकारी, दांडेकर असा या देवस्थानचा पंचायतन परिवार आहे.
गावडेश्वर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा देवस्थानचा असून त्यावर घरे, दुकाने बांधली आहेत. त्या जमिनीसाठी देवस्थानला प्रतिवर्षी तेलाच्या रुपाने वंत मिळतो
कार्तिक त्रयोदशीला होणा-या जत्रौत्सवात आदल्या दिवशी महानैवेद्य दाखविला जातो. नंतर सर्वांना महाप्रसाद होतो. जत्रौत्सवाच्या रात्री श्री देव रामेश्वराची पालखी व तरंगदेवता भेटीला येतात. गावडेश्वराची पालखी बाराचा पूर्वस येथे येऊन रामेश्वराच्या पालखीची भेट होते. त्यानंतर दोन्ही पालख्या गावडेश्वर मंदिरात जातात.
जत्रेला मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट केली जाते. रात्री फटाक्यांची आतषबाजी आणि मामा मोचेमाडकर दशावतारी नाटकाने जत्रेची सांगता होते..

मतदानाचा हक्क!
आपल्या भारतामध्ये लोकशाहीला प्राधान्य दिले आहे आणि लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांकडून, लोकांसाठी चालवलेले राज्य. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या त्या देशात लोक स्वतःचे राज्य स्वतः चालवत असतात आणि माध्यम असते ते मतदानाचे आणि हेच मतदान त्या राज्याचे किवा देशाचे भविष्य ठरवते. म्हणजे मतदान किती श्रेष्ठ आणि महत्वाचे आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. लोकशाहीत प्रत्येक देशाची सत्ता त्या देशातील नागरिकांच्या हातात असते. म्हणजेच प्रत्येक नागरिकाच्या हातात देश चालवण्याची ताकद असते. पण प्रत्येक नागरिक या ताकदीचा वापर हवा तसा करतोच असे नाही. स्वतःच्या विकासा -साठी मतदानाचा हक्क योग्य प्रकारे बजावतोच असे नाही.
पूर्वी राजा-महाराजांच्या काळात ‘मतदान‘ या शब्दाला काहीच महत्व नव्हते. कारण एखाद्या प्रदेशाचा राजा त्याच्या घराण्यातूनच वारस म्हणून येईल. मग तो कोणत्याही विचाराचा असो, कितीही सुमार बुद्धीचा असो, न्यायी असो वा अन्यायी असो. पण आज आपल्या देशाचा नेता निवडण्याचा अधिकार भारतीय नागरिकांना आहे. म्हणजेच नागरिक हे या देशाचे राजे आहेत. पूर्वी एखाद्या देशाचे त्याच्या राजावरुन भविष्य ठरत असे. पण आज आपल्या देशाचे भविष्य आपण ठरवू शकतो. मतदानाच्या माध्यमातून आपण आपलाच विकास करु शकतो. असा श्रेष्ठतम हक्क आपल्याला मिळालेला आहे. देशासाठी, स्वतःसाठी हा हक्क बजावणे आपले कर्तव्य आहे.
आज आपल्या देशाची परिस्थिती पाहिली तर त्यात प्रामुख्याने भ्रष्टाचार, अनेक घोटाळे, गैरव्यवहार दिसतात. या विकसनशील देशात सत्तर टक्के भ्रष्टाचार आहे आणि तर विकसीत देशात हे प्रमाण फारच कमी आहे. विकसनशील आणि विकसीत या दोन शब्दांमधील अंतर हा भ्रष्टाचारच ठरवतो. कारण जिकडे भ्रष्टाचार कमी तिकडे विकास जास्त आणि भ्रष्टाचार जास्त तिकडे विकास कमी. मतदानाच्या हक्कामुळे आम्हीच येथील राजे आहोत ना? या देशाचे नेते आम्हीच आहोत ना? मतदानातून आम्ही जे प्रतिनिधी निवडून देतो, ते प्रतिनिधी सत्ता चालवण्यास योग्य आहेत म्हणून निवडून देतो ना? मग त्यानी भ्रष्टाचार केला तर ते दोषी का? आम्ही दोषी का नाही?
मतदानाने लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. तो हक्क आपण बजावला पाहिजे. मतदान कोणाला करायचे आहे हे लक्षात घेणे फार महत्वाचे आहे. भ्रष्टाचारी व्यक्तीला माझे मतदान होणार नाही याची खबरदारी प्रत्येक नागरिकाने घेणे गरजेचे आहे. कोणत्याही पक्षाला मत घातले तरी तो तेच करणार. मग मतदान करायचे कशाला? मतदानासाठी रांग लावायची कशाला? अशा विचारांच्या लोकांनी न्यूनगंडात न जाता, जो तुम्हाला पसंत पडेल असा प्रतिनिधी उभा करा. संघटीत व्हा आणि एकमताने त्याला विजयी करा. निदान निवडलेल्या प्रतिनिधींच्या अधिकारात असलेल्या विभागाचा विकास तुम्ही स्वतः करु शकाल. कायद्याने मतदानाचा हक्क नागरिकांना दिला आहे. पण आपले मत ‘दान‘ करण्याच्या योग्यतेसाठी आपली तयारी करणे, स्वतःला त्या पात्रतेसाठी योग्य बनवणे फार गरजेचे आहे. माझ्या प्रभागामध्ये उभे राहिलेले उमेदवार यांच्या चारित्र्याची मला जाणीव आहे का? समाजात त्यांची वागणूक चांगली आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रत्येक नागरिकाने मिळवणे फार महत्वाचे आहे. मतदान करणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे.
‘‘मी जर मतदान केले नाही, तर कोणी निवडून यायचा काही थांबणार नाही. माझ्या एका मताने काय होणार आहे? उगाच कशाला वेळ घालवायचा?‘‘ अशा नैराश्यवादी आणि अधोगतीला मदत करणा-या विचारांचे प्रवाह हे प्रत्येकाच्या मनात असतात. पण तुम्ही स्वतःला या देशाचे नागरिक समजत असाल आणि स्वतःच्या विकासासाठी प्रयत्नशील असाल तर ह्या विचारांना बांध घालणे गरजेचे आहे.
मतदानाचा हक्क बजावताना इतर काही गोष्टी ध्यानात घेणे फार महत्वाचे आहे. जसे की, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. तसेच कोणत्याही दबावाखाली मतदान करु नये. जर आपण आमिषाला बळी पडून मतदान केले तर त्या मतदानाचा काहीच फायदा नाही. उलट तो आपल्यालाच त्रास आहे. कारण एखाद्या उमेदवाराकडून घेतलेले आमिष हे आपल्याला त्या उमेदवाराचे गुलाम करुन सोडते. आपण जर आमिषाला बळी पडलो तर त्या उमेदवाराच्या चुकांवर आपण बोट ठेवू शकत नाही आणि स्वतंत्र भारतात गुलामगिरी पत्करणे याच्यासारखा अपमान कुठेच नाही. हे आमिष तत्काळ फायदा देणारे असते. त्यातून काहीच साध्य होत नाही. त्याचप्रमाणे निवडणुकीत उमेदवाराचे खरे कार्य कसे आहे? आजपर्यंत त्यांनी किती कामे पूर्ण केली आहेत? समाजाला त्याचे कार्य हितावह आहे की नाही हे नीट पहावे. आमचे घराणे, आमच्या घरातील जाणते पूर्वीपासून अमूक पक्षाचे बांधील आहेत म्हणून आम्ही त्यांच्याच बाजूने रहाणार असे न म्हणता नेहमी चांगल्या प्रतिनिधीत्वाच्या बाजूने रहावे. आपले मत कोणत्याही पक्षाशी बांधील न ठेवता ते स्वतंत्र ठेवावे. मतदान यंत्रणा कशी आहे याकडे नीट लक्ष द्यावे. मतदान काळात होणा-या गैरप्रकारांना विरोध करुन ते प्रकार होऊ नयेत यासाठी प्रयत्न करावेत. मतदानाविषयी जागरुक राहून कायद्याने ठरवल्याप्रमाणे त्या त्या पातळीवरील मतदानात सहभागी होऊन स्वतंत्र मनाने, स्वतंत्र विचाराने, आपले मत कोणाशीही बांधील न ठेवता गुप्त मतदान करुन आपला हक्क बजावला पाहिजे.
(सिधुदुर्गच्या जिल्हाधिका-यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील बक्षिसपात्र लेख, त्यांनी निवडलेल्या पहिल्या पाच नामांकनातील हा लेख संकलीत स्वरुपात दिला आहे.)
-गोविद मोरजे, वेंगुर्ले

न.प.निवडणुकीनिमित्ताने जिल्ह्यात मनाई आदेश
सिधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस नेते नारायण राणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव या आघाडी राज्य सरकारमधील दोन्ही मंत्र्यांमध्ये पेटलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ८ डिसेंबरला होणा-या दोन्ही जिल्ह्यांतील नगर -पालिकांच्या निवडणुकीत आणखी काही ‘राडा‘ होऊ नये यासाठी ८ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीकरिता दोन्ही जिल्ह्यांत मनाई आदेश जिल्हा दंडाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी जाहीर केला आहे.

कुडाळ बकालच!
एम.आय.डी.सी.,उद्यमनगरी येथील व्यवसाय-उद्योग व सिधुदुर्ग जिल्हा निर्मितीनंतर काही वर्षे तेथे असलेली सर्व जिल्हा सरकारी कार्यालये यामुळे उर्जितावस्थेस आलेले कुडाळ शहर बकालच राहिल्याचे जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी ओमप्रकाश बखोरीया यांनी कुडाळ येथे घेतलेल्या बैठकीत सांगितले. या बैठकीस कुडाळ ग्रा.पं.सदस्य, महसूल व जि.प.चे अधिकारी आदी उपस्थित होते.
निवासी संकूल इमारतींचे बांधकाम, सांडपाणी -कचरा व्यवस्था अनियमित, रस्तेही खराब, अतिक्रमित बांधकामे याबाबत योग्य नियोजन न करणारी ग्रामपंचायत व तेथील लोकप्रतिनिधी यामुळे कुडाळ शहर बकाल झाल्याचे सांगण्यात आले.

सिटीस्कॅन मृत!
सिधुदुर्गनगरीतील जिल्हा रुग्णालयात अकरा वर्षापूर्वी सुमारे अडीच कोटी रुपये ख्रर्च करुन बसविण्यात आलेले सीटीस्कॅन मशीन तंत्रज्ञ नसल्याने अनेक वर्षे बंद होते. नंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्ची घालण्यात आले. अकरा वर्षात सुमारे दहा हजार जणांनाच या सिटीस्कॅन यंत्राचा उपयोग होऊ शकला. रेडिऑलॉजिस्ट नसल्याने बाहेरुन रिपोर्ट घ्यावा लागत होता. आता पुन्हा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी सुमारे ३२ लाखाचा खर्च आहे. दरम्यान डिसेंबर ११ मध्ये या मशिनचे आयुष्य संपत आहे. त्यामुळे नवीन यंत्र खरेदी करावे लागणार आहे. सीटीस्कॅनसाठीची युपीएस यंत्रणा चार वर्षे बिघडलेली आहे. त्यासाठी १६ लाखाचा खर्च आहे. जिल्हा रुग्णालयातील २ व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील एकमेव व्हँटीलेटर बंद आहेत. जिल्ह्यासाठी २ बालरोगतज्ञ, २ भूलतज्ञ, २ अस्थिरोग तज्ञ, १ जनरल सर्जन, १ पॅथॉलॉजिस्ट, दोन भीषक पदे रिक्त आहेत. ती त्वरीत भरली जाणे आवश्यक झाले आहे.

आंबा पिशवीत ठेवा - रिलायन्सचा सल्ला
विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करुन आंबा फळ सुरक्षित वाढविता येईल अशी माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे सरव्यवस्थापक सत्यजीत भोसले यांनी हॉटेल लौकिकच्या सभागृहात घेतलेल्या आंबा बागायतदारांच्या सभेत प्रात्यक्षिकांसह दिली.
आंबा फळ हे अंडाकृती आकाराचे झाल्यावर त्यावर प्लास्टिक कोटेड बनविलेल्या पिशव्या (प्रत्येक फळास) बांधल्यामुळे थ्रीप्स, तुडतुडे, अन्य किटक तसेच हवामान, पाऊस यांपासून संरक्षण मिळते. त्या फळावर रायायनिक परिणाम होत नाही. अशा पिशव्यांचा वापर अनेक प्रगत देशात केला जातो. गेल्यावर्षी मोहन सोमण-देवगड व उमेश लांजेकर-रत्नागिरी यांच्या आंबा बागेत या पिशव्या वापरण्यात आल्या. तो प्रयोग यशस्वी ठरला. यावेळी त्यांनी वेंगुर्ल्यातील बागायतदारांना १ हजार पिशव्या मोफत वाटल्या.
आंबा मोहोरावर कीटकनाशकांच्या ४ ते ५ फवारण्या कराव्या लागतात. त्याशिवाय हवामान विपरीत आले तर अन्य रोगकिडीचाही प्रादुर्भाव होतो. त्या सा-यातून बचावलेले आंबा फळ सुरक्षित राहिले तरच या नव्या प्रायोगिक पिशव्या फळांना बांधता येणार. शिवाय जुन्या लागवडीतील उंच झाडांवरही आंबा फळांना अशा पिशव्या बांधणे अवघड आणि अशक्य कोटीतील काम आहे हे लक्षात घेऊन रिलायन्सचे अधिकारी १० फूट उंचीच्या झाडांवरील आंबा फळांना यावर्षी प्रायोगिक स्वरुपात पिशव्या बांधा व त्याचा चांगला अनुभव आला तर पुढचे पहा असा सल्ला देण्यास विसरलेले नाहीत.
ही खास पिशवी वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने प्रयोग करुन शिफारसीसाठी योग्य ठरविली आहे की नाही हे समजू शकलेले नाही.

Thursday 3 November, 2011

अंक ४०, ३ नोव्हेंबर २०११

अधोरेखीत *
ग्रामपंचायतीचा निधी पडून, विकास कामे ठप्प
मंत्रालय पातळीवर लाल फितीत योजना अडकू नयेत म्हणून पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषदा, ग्रामपंचायतींना आता थेट निधी उपलब्ध होतो. गावच्या विकासासाठी हा निधी खर्च करण्याची जबाबदारी संबंधीत सरपंच, आपण निवडून दिलेले ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पुढच्या पातळीवर पंचायत समिती सदस्य, विस्तार अधिकारी या सर्वांची असते.
पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत असणा-या कोट्यावधी रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याने या योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
अशी आहे पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्रामयोजना!
पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजने अंतर्गत गावाचा एकात्मिक विकास आराखडा बनवून लोकांच्या सहभागातून विविध योजना एकात्मिक पद्धतीने कायम राबवून गावाचा कायमस्वरुपी विकास साधण्यासाठी योजना बनविण्यात आली आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध
या योजनेमध्ये पर्यावरण समतोल राखण्यासाठी जमिनीचा विकास, जलव्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक स्वच्छता, उर्जा व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते, वृक्षारोपण, सामाजिक वनीकरण इ. च्या स्वतंत्रपणे सुरु असलेल्या योजनांचा समन्वय साधणेही अपेक्षित आहे.
‘इको व्हिलेज‘ची संकल्पना राबवून समृद्ध गाव निर्माण करणे, मोठ्या गावात शहराच्या तोडीच्या सुविधा निर्माण करणे, जलव्यवस्थापन, जलस्रोतांचे रक्षण, संवर्धन असे उपक्रम राबविणे अपेक्षित आहे.
पाण्याचा प्रश्न सुटेल आणि पर्यटकांसाठीही आकर्षण
सिधुदुर्गातल्या गावांमध्ये असणा-या देवळांच्या जवळ पाण्याची तळी असते. यामध्ये अपवाद वगळता बहुतेक सर्व तळी सुकलेली किवा गाळाने भरलेली आहेत. या योजनेअंतर्गत उपलब्ध असणा-या या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन करणे सहज शक्य होणार आहे. यामुळे तळ्यांची खोली तर वाढेलच त्याचबरोबर उन्हाळ्यात विहिरींच्या पाण्याची पातळीही वाढेल आणि त्याचबरोबर मंदिरांना भेट देणा-या भाविक, पर्यटकांसाठी एक आकर्षण स्थळ वाढेल.
सिधुदुर्गातील बहुतांश ग्रामपंचायतींनी केवळ पहिल्या टप्प्यातील निधी खर्च केला आहे. दुस-या आणि तिस-या टप्प्यातील कोट्यावधी रुपये ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे आणि सुस्तावलेल्या प्रशासकीय यंत्रणेमुळे पडून आहेत.
पूर्वी गावातील लोकांनी साकव, अंतर्गत रस्ते, जलव्यवस्थापन वगैरे कामांची मागणी ग्रामसभेत झाल्यावर निधी उपलब्ध नसल्याची सबब सांगण्यात येत असे. पण आता तर अगदी १ हजार लोकवस्तीच्या ग्रामपंचायतीपासून ते १० हजार पर्यंत लोकसंख्या असणा-या ग्रामपंचायतींना लाखो रुपयांचा निधी उपलब्ध आहे.
चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या जात नाहीत. लोकांकडून कामाची मागणी नाही असे सांगून निधी तसाच ठेवला जातो. हा निधी खर्च करण्यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, ग्रा.पं.सदस्य यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. ती बदलत नसेल तर ज्या लोकांनी ग्रामविकासासाठी त्यांना निवडून दिले आहे त्या लोकांनीच त्यांना ही सर्वांच्या हिताची कामे करायला भाग पाडले पाहिजे. मुंबईत प्रत्येक गावचे एक ग्रामविकास मंडळ असते. त्यांनाही विनंती आहे की, मंदिर जीर्णोद्धाराप्रमाणेच अशा गाव समृद्ध करणा-या योजनांचा पाठपुरावा करावा आणि उपलब्ध असणारा निधी संबंधीत यंत्रणेकडून आपल्या गावात खर्च करुन घ्यावा.
-अॅड. शशांक मराठे, ९६८९९०३३७९

संपादकीय *
आता नरकासुरांचा जयजयकार?
नरकचतुर्दशीच्या आदल्या रात्री गावागावांतून विशेषतः शहरांतून नरकासूर प्रतिमांच्या स्पर्धा झाल्या. त्यांच्या मिरवणुका निघाल्या. एका मिरवणुकीत घोषणा होती ‘‘नरकासुराचा विजय असो!‘‘ विद्यमान राजकारण आणि समाजकारणाला साजेशीच ही घोषणा होती यात काही संशय नाही.
नरकासुरांच्या लहान मोठ्या प्रतिमा बनविणे आणि रात्री त्या जाळणे, असूर प्रवृत्तीचे दहन झाले असे मानणे हा अनेक गावांच्या गावरहाटीतील एक भाग असतो.
पण, त्याच्या स्पर्धा घेऊन, त्यांचे क्रमांक लावून मोठमोठी बक्षिसे ते नरकासूर तयार करणा-या बालगोपाळ मंडळांना देणे, त्या नरकासुरांच्या वाजत गाजत मिरवणुका काडणे आणि त्यांचे पहाटे केव्हातरी दहन करणे हा प्रकार कोकणात अलिकडे फोफावू लागला आहे. कोकणात म्हणजे प्रामुख्याने सिधुदुर्ग जिल्ह्यात गोव्यातून हे लोण आले आणि त्याला विकृत स्वरुप येऊ लागले आहे.
बरीच मंडळे रस्त्यावरच नरकासूर प्रतिमा उभ्या करतात आणि जाणायेणा-या वाहनधारकांकडून वर्गणी गोळा करतात. जुन्या जाणत्या मंडळींनी या प्रकारांना विरोध करुन पाहिला. पण आजकाल कोण कोणाचे ऐकतो? ज्यांनी असले विकृत प्रकार थांबवायचे ते पोलीस खाते आपणहून काहीच करीत नाहीत. कोणी तक्रार करील म्हणून वाट पहात बसतील आणि तक्रार केलीच तर त्या मुलांच्या विकृतीला आळा घालतील असे नाही. सगळेच असूर बनल्यावर कोण कुणाचे ऐकणार?
सनातन संस्थेसारखी राष्ट्र आणि हिदू धर्मप्रेमी संस्था गेली अनेक वर्षे सातत्याने आपल्या नियतकालिकांमधून हिदू धर्माच्या सण-समारंभांना येत असलेले विकृत वळण थोपविण्याचा प्रयत्न करीत आहे. ते करतांना ही संस्था कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाही. अगदी प्रसारमाध्यमे आणि राजकारणी यांचा सुद्धा! त्यामुळे राजकारणी विशेषतः असूरी प्रवृत्तीचे राजकारणी आणि विधि -निषेधशून्य प्रसारमाध्यमे या सनातन संस्थेच्या विरोधात! म्हणूनच या संस्थेविरोधात खोटेनाटे आरोप लावून बदनामी करणे यात सारेच धन्यता मानीत आहेत. तथाकथीत निधर्मी लोकांचा यात सहभाग विशेष आहे.
प्रश्न सनातनचा नव्हे, नरकासुरांचा-असुरांचा जयजयकार करुन आपला समाज, समाजातील नवी पीढी कुठे चालली आहे? कुठले संस्कार दाखवित आहे? हा आहे. याचे प्रत्यंतर या निमित्ताने येत असते. सध्या देशात भ्रष्टाचाराच्या विरोधात जनमत जागृत होऊ लागले आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे हे शक्य होऊ शकले. त्यांच्या पाठीशी उभे राहणा-या,त्यांच्या आंदोलनाला योग्य दिशा देऊ शकणा-या मंडळींमुळे राजकारणातील या भ्रष्ट असुरांना धडकी भरली आहे. याच दरम्याने अब्जावधी रुपयांचे आर्थिक घोटाळे उघडकीला आल्याने केंद्रात मंत्रीपद भूषविणा-या (किवा दूषविणा-या) काहींना तुरुंगात जावे लागले आहे. प्रशासनातील काही बडे अधिकारीही याच कारणांनी सध्या तुरुंगवास भोगत आहेत. अशा असुरांचे समर्थन करण्यासाठी ज्यांच्यामुळे हे भ्रष्ट असूर लोकांसमोर आले, त्या अण्णा हजारे आणि त्यांच्या जवळच्या सल्लागार मंडळीना या ना त्या कराणाने बदनाम करण्याचे काम काही राजकारणी मंडळी आणि वृत्तपत्रेसुद्धा इमाने इतबारे करु लागलेली आहेत.
कोणत्याही सूक्तासूक्त मार्गाने सत्ता मिळविणे आणि त्या सत्तेच्या जोरावर देशाची म्हणजेच जनतेची सार्वजनिक संपत्ती ओरबाडणे हाच सर्व राजकीय पक्षांचा एकमेव कार्यक्रम ठरलेला आहे. त्याच दिशेने त्यांच्या हालचाली सुरु असतात. त्यामुळे राजकीय पक्ष सुद्धा अशा आसूरी प्रवृत्तींच्या विरोधात आपला आवाज उठवत नाहीत. असे हे नव्या जमान्यातले नरकासूर केवळ राजकारणात आणि वरीष्ट प्रशासनातच आहेत असे नाही. ते सर्वदूर अगदी ग्रामपंचायतीच्या राजकारणा -पर्यंत पोचलेले आहेत. आपल्याच पोळीवर तूप ओढून घेण्याची स्वार्थी वृत्ती निर्माण झालेला मध्यमवर्गीयही याला अपवाद नाही.
महागाई वाढते म्हणून सुरक्षित नोकरी असलेला नोकरदार वेतनवाढ मागतो. ती मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेला वेठीला धरण्यासाठी संप करतो. शेवटी त्याला वाढीव वेतन मिळतेच. जीवनावश्यक गरजा भागल्या की चैनीच्या वस्तूंची खरेदी सुरु होते. त्यावर वारेमाप खर्च केला जातो. इतके करुनही तो पुन्हा पाच वर्षांनी महागाई वाढली म्हणून संप पुकारायला मोकळाच! यात सर्वसामान्य, हातावर पोट असणारा गरीब वर्गच नव्हे तर कारागीर,छोटे व्यावसायीकही भरडले जाताहेत याचे भान कोणालाच नाही. ही सुद्धा नरकासुराचीच प्रवृत्ती.
केवळ दिवाळीच्या आदल्या रात्रीला नरकासूराचे नव्हे तर नववर्ष प्रतिपदेला, गुढी -पाडव्याच्या आदल्या दिवशी होणारी रंगपंचमी किवा धुळवड, श्रावण मासारंभाच्या आदल्या रात्री ‘साजरी‘ केली जाणारी ‘गटारी‘ अमावास्या, देवतांच्या विसर्जन मिरवणुकांतून होणारी मद्यधुंद बिभत्स नृत्ये असे प्रकार खूपच वाढले आहेत. या सा-या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याची, किमान जाहीरपणे शाब्दीक विरोध करण्याची ज्यांची नैतिक जबाबदारी आहे ते हाताची घडी घालून समोर घडणारे प्रकार पहात राहतात. शिक्षक, प्राध्यापक आपल्या शाळा-महा विद्यालयांतील मुलांवर संस्कार करण्याची आपली जबाबदारी आहे असे मानीत नाहीत. एरवी वेतनवाढीसाठी संघटीत होणा-या या वर्गाने समाजातील नव्या पीढीवर चांगले संस्कार कसे होतील याकडेही लक्ष द्यायला हवे आहे. सरकारी निवृत्तीवेतन घेणा-या पेन्शनरांचीही ही आपली नैतिक जबाबदारी मानली पाहिजे. या गोष्टीना काही पैसा खर्च करावा लागत नाही. यातून भ्रष्टाचार विरोधी आंदोलनांनाही बळ येईल.
सुदैवाने भारतीय सण, समारंभ, उत्सवांमध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. शेकडो संस्था, संघटना, धर्ममठ, मंदिरे यांच्याकडून त्यांचा अवलंब होत असतो. त्यासाठी आपल्याला पाश्चात्यांच्या तोंडाकडे पहायला नको. उलट तेच या खंडप्राय देशाच्या ‘विविधतेतून एकता‘ या सूत्रामुळे अचंबीत होऊन येथले समाजजीवन अभ्यासायला येत असतात.
म्हणूनच आता जयजयकार कोणाचा करायचा याचे भान समाजाला आणण्यासाठी सर्व थरावरुन प्रयत्न व्हायला वहेत. न पेक्षा सर्वचजण यापुढे नव्या नरकासुरांच्या तावडीत सापडण्याची शक्यता अधिक आहे!

विशेष *
घडवूया स्वतःला स्वयंसिद्ध!
माझे गुरुबंधू स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी लिहिलेली अल्प आयुष्याचं सार सांगणारी ही कविता मला स्वतःला फार आवडते.
क्षणभंगूर मी माझ्यापुरता, क्षणभंगूर ही माझी कविता
क्षणभंगूर डोळ्यातील आसू, क्षणभंगूर हे मधाळ हासू
क्षणभंगूर हे जिणे भोगणे, भातुकलीचा डाव मांडणे
क्षणभर येता शीतल लहरी, क्षणाभराचे वादळ जहरी
क्षणभर वाटे प्रेम अंतरी, क्षणाभराचा द्वेष नंतरी
क्षणभर वाटे श्रद्धा भक्ती, क्षणाभराची अन् आसक्ती
क्षणभर जिकून क्षणात हरणे, क्षणभर जगुनी क्षणात मरणे
क्षणभर जळता सरणावरती, क्षणभर त्यास्तव कोणी झुरती
या अशा क्षणभंगूर जीवनात किती तास झोपेत गेले (सुमारे २० वर्षे), किती तास रोजच्या दिनक्रमासाठी गेले (सुमारे १० वर्षे), किती काळ पैशाच्या मागे धावण्यात गेले (सुमारे २० वर्षे) याचा हिशेब काढत मनुष्य कधी इतिहासात जमा होतो हे सुद्धा लक्षात येत नाही.
सगळेच जण सजगपणे, जागरुकपणे जगतात असे नाही. स्वतःला जागवत जगणं फार थोड्यांना जमतं.
स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे सारं जग इच्छेवर चालतं! अनेक जन्म या इच्छा पूर्ण करता करता दमछाक होते. पण स्वतःला जागवू शकणा-या फार थोड्या व्यक्ती तीव्र इच्छा शक्तीला जागवतात आणि मग त्यातूनच कठोर निर्धार, जिद्द, दुर्दम्य आत्मविश्वास, साहसीपणा, मूल्यांची जपणूक, संयमीपणा या सा-या शब्दांचा पाऊस या व्यक्तीच्या जीवनात पडतो आणि अशी उत्तुंग व्यक्तिमत्व निश्चितपणे निर्माण होतात. त्यांचा इतिहास पुढच्या काही पिढ्यांना प्रेरणादायी म्हणून निश्चित जिवंत रहातो.
एकविसावं शतक खूप काही चांगलं घडवणार या आशेवर कितीतरी माणसं विश्वास ठेवून जगत आहेत. ११ वर्षे संपली. नवीन येणारी पिढी निश्चित भरकटणार नाही ना? मोहाचे, आकर्षणाचे बळी होऊन संस्कृती, मूल्ये यांना तिलांजली देणार नाहीत ना! या विचारांनी मन अस्वस्थ होते. नव्या पिढीची विवाहसंस्था आणि समाजव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा खूप मोठी आहे. क्षुद्र स्वार्थासाठी, अहंभावासाठी, सहनशीलतेला, संयमाला विसरुन आपली परंपरा, संस्कृती व नैतिक मूल्यांची जपणूक यांची पायमल्ली होणार नाही यासाठी गरज वाटते ती आपली जबाबदारी पूर्ण करण्याची.
आहेत, आमच्या भोवती स्वयंसिद्धा आहेत! न दमणा-या, न थकणा-या, स्वतःला जागवत जगलेल्या! डोळस रुपानं स्वतःची कुवत वाढविलेल्या. भरभरुन जगण्यासाठी हवी फक्त जिद्द. हवा प्रचंड आत्मविश्वास! मनात आणलं तर काहीही करु शकतो यावर हवी प्रचंड श्रद्धा! सभोवताली असणा-या मोहमायेचे, आकर्षणाचे, बळी न होण्यासाठी हवी आत्मपरिक्षण करण्याची वृत्ती. आपल्यासाठी योजलेल्या नाटकातल्या पात्राचे दिग्दर्शन करण्याची मानसिक तयारी. मी माझ्यासाठी लिहिलेल्या नाटकाचे लिखाणच बदलून टाकीन, असाही विश्वास काहीजण बाळगतात. तथापि नाटकाचे लिखाण बदलण्यापेक्षा आहे त्या नाटकात माझे पात्र मी कसे उत्तम रंगवेन याचा विचार माणसाला जगण्याची उमेद देईल हे निश्चित.
जग ही एक रंगभूमी आहे हे शेक्सपिअरचं म्हणणं. आहे रे म्हणणारे आस्तिक. नाही रे म्हणणारे नास्तिक. आशावादी जगायचं भरलेलं आणि असलेलं बघायचं की नाहीरे म्हणत निराशावादी वृत्तीला कवटाळून या भवसागरात गटांगळ्या खायच्या हे ज्याचं त्यानं ठरवायचं. ज्याला किना-याचं भान असतं, ज्याला लक्ष्मणरेषेचा अर्थ कळतो, तो स्वैर स्वातंत्र्याला कधीही जवळ करत नाही. अशीच व्यक्ती आमच्या संस्कृतीला जाणू शकते आणि जोपासू शकते. अशी संस्कृती जाणणारीच फक्त मोठी होतात आणि इतिहासजमा होऊनसुद्धा जिवंत रहातात. प्रत्येकाच्या हृदयात, नव्या पिढीच्या मार्गदर्शनासाठी दीपस्तंभासारखी!
आपल्या भोवती खूप काही आहे. डोळसपणे पाहिले तर अनेक उत्तम शिक्षक, शिक्षिका, उत्तम लेखिका, चित्रकार, कवी, उद्योजक, उत्तम गृहिणी, उत्तम समाजरक्षक यांचा भरभरुन इतिहास आपल्या जवळच आहे. कदाचित नसेल फार प्रसिद्धी मिळालेली या व्यक्तिमत्वांना! आपण सर्वजण पुढील वर्षभरात हाच खरा इतिहास किवा भूतकाळात दडू पहाणारा वर्तमान जागवूया आपल्या संवादातून! मी तुमची सा-यांची मदत घेणार आहे, तुम्ही बिनधास्त माझ्याशी संवाद साधू शकता!
हा मिळून सा-यांचा असेल एक प्रामाणिक प्रयत्न. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत ज्यांनी मोठ्या हिमतीनं, धीरानं, जिद्दीनं आपली पायवाट घट्ट केली, पुढच्या पिढीसाठी! या दिग्गज व्यक्तिमत्वांचं स्मरण आणि त्यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा आपण जाणून घेऊया या स्वयंसिद्धांच्या कार्यकर्तृत्वातून!
-आरती कार्लेकर, कुडाळ, फोन- (०२३६२) २२२१५८.

आरवलीची जागृत देवता जागबाई!
वेंगुर्ले तालुक्यातील आरवली गावात सोन्सुरे रस्त्यालगत असलेले श्री जागबाई देवीचे देवस्थान जागृत आहे. गोव्यातील पोर्तुगीजांच्या धर्मांतराच्या व मंदिरे उध्वस्त करण्याच्या जाचाला कंटाळून सन १५६७ साली गोव्यातील म्हापशाजवळील उसकई येथे असलेली ही मूर्ती भक्तांनी आरवली येथे आणली. मंदिरासमोरच श्री रामेश्वर, रवळनाथ, मूळपुरुष, धाडवस अशा देवता आहेत. देवीच्या उत्सवास दूरदूरहून भक्तमंडळी येतात. त्यांची भोजन, निवासाची उत्तम व्यवस्था मंदिर आवारातच आहे.
श्री देवी जागबाईची मूर्ती महिषासुरमर्दिनी स्वरुपात आहे. २००४ साली अक्षय्य तृतियेला या मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली.
येथील सर्व उत्सव परंपरेप्रमाणे पार पाडले जातात. वार्षिक जत्रौत्सव ७ दिवसांचा असतो.
या देवस्थानचे व्यवस्थापन श्री देवी जागबाई देवस्थान कमिटी, आरवली पहात आहे. देवीचे भक्त महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि परदेशातही सर्वदूर आहे.
यावर्षी जत्रोत्सव २५ नोव्हेंबरला होत आहे. श्री देव वेतोबा देवस्थानने दिलेल्या मानाप्रमाणे देवीचा जत्रोत्सव वेतोबा देवस्थानच्या जत्रेच्या एक दिवस आधी येतो.

मध्वानुभव *
काहीही म्हणा पण गप्पा मारा!
गोष्ट तशी खूप जुनी, म्हणजे ३० वर्षांपूर्वीची! एस.टी.ने पुण्याहून दापोलीला व्हाया महाबळेश्वर जात होतो. एस.टी.मध्ये अजिबात म्हणजे अजिबात गर्दी नव्हती. ड्रायव्हर, कंडक्टर, मी. पुढच्या बाकावर साधारण ४०-४५ वर्षे वयाचे एक गृहस्थ आणि शेवटच्या २-३ बाकावर ‘बेलदार‘ समाजातील ८-१० जण! या बेलदार मंडळींची कानडी भाषेतील ‘खडखड‘ आणि एस.टी.चा आवाज या ‘माहौल‘मध्ये ८-१० तासांचा प्रवास सुकर होणे शक्यच नव्हते. प्रवासात जर गप्पिष्ट शेजारी भेटला तर गप्पा मारण्यात तरी टाईमपास करता येतो. पण ही शक्यता आज मुळीच दिसत नव्हती. शिरवळलाही कोणी नवीन ‘पॅसेंजर‘ चढले नाहीत.
कंडक्टर तथा मास्तरांजवळ ‘संवाद‘ साधण्याचे प्रयत्न फारसे यशदायी ठरले नाही. २-३ प्रश्नांना त्यांनी जुजबी उत्तरे दिली आणि मग त्यांनी रितसर तंबाकूचा बार भरल्यामुळे ‘संवाद‘ थांबला. मी माझ्या जाग्यावर जाऊन बसलो. बरोबर असलेले वृत्तपत्र नजरेखाली घालून झाले. वेळ जाण्यासाठी परत एकदा अथ पासून इतिपर्यंत सिनेमा, नाटकांच्या जाहिरातींसह अन्य जाहिरातीही वाचल्या. एस.टी. खूपच कूर्मगतीने, खड्ड्यातल्या रस्त्याने चालली होती. त्यामुळे प्रवासाला १२-१४ तास लागणार असं दिसत होतं. प्रवास खूपच ‘बोअर‘ होत होता. शेवटी धीर करुन वृत्तपत्र मागण्याच्या इराद्याने पुढच्या बाकावरील पॅसेंजरकडे मोर्चा वळवला. सुरवातीपासूनच निरीक्षण केले होते त्याप्रमाणे हे गृहस्थ देशपांडे - कुलकर्णी वर्गातील असावेत हा माझा अंदाज होता. माझे वृत्तपत्र त्यांना देऊन त्यांचेकडील वृत्तपत्र घेऊन त्यांच्या शेजारीच (परवानगी घेऊन) बसलो.
मला फार वेळ गप्प नाही बसता येत. आता तर जवळ जवळ दोन अडीच तास मी ‘मौनात‘ होतो. त्यामुळे खूपच अस्वस्थ झालो होतो. शेजारचे देशपांडे/कुलकर्णी यांना कसं बोलकं करावं हे समजत नव्हतं. पँट, बुशशर्ट, चष्मा, नीट भांग पाडलेला यावरुन हे गृहस्थ सर्कारी अधिकारी असावेत असेही मी ठरवले. त्यांचा पेपर आभार मानून परत देता देता मी धाडस करुन विचारले, ‘‘सर, आपल्याला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय. आपण देशपांडे का?‘‘
गृहस्थांनी एकदा माझ्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले, ‘‘हो, मी देशपांडे! पण मी आपल्याला कुठं पाहिल्याचं नाही आठवत मला. आपला परिचय?‘‘ मी माझं नाव, गाव, नोकरी इत्यादि तपशील सांगण्याच्या निमित्ताने गप्पांना प्रारंभ केला. गृहस्थ फारसे बोलके नव्हते. पण ‘घुमेही‘ नव्हते. खरं तर देशपांडे हे नाव मी अंदाजपंचे ठोकलं होतं आणि ते खरं निघाल्याने माझी खर तर पंचाईतच झाली होती. एकदा त्या गृहस्थांना मी ‘देशपांडे‘ ठरवलं होतं म्हणून सोंग चालू ठेवण्याचं ठरवलं.
‘‘सर, आपलं गाव कराड का हो?‘‘ अन् गंमत म्हणजे देशपांडे म्हणाले, ‘‘हो!‘‘ आता मात्र माझी खूपच गोची झाली. पण सोंग चालू ठेवण्यावाचून ‘गत्यंतर‘ नव्हते. सरना मी म्हणालो, ‘‘माझे कराडला अमुक-अमुक नावाचे नातेवाईक आहेत. त्यांच्याकडच्या लग्नात आपल्याला पाहिल्यासारखे वाटते.‘‘ देशपांडे म्हणाले ‘‘शक्य आहे. पण त्यावेळी आपली ओळख झाल्याचे मला नाही आठवत. पण ऋृदन्र् ध्र्ठ्ठन्र् तुम्हाला जर आठवतय तर ठीक आहे.‘‘ येथे त्या गृहस्थांनी आपल्या जवळची ‘आवळा सुपारी‘ ऑफर केली. मी साभार देणगी स्विकारुन अक्षरशः काही तरी विचारायचं म्हणून त्यांच्या सोनेरी फ्रेमच्या चष्म्याकडे पहात विचारलं,
‘‘सर आपण ‘बांधकाम‘ खात्यात आहात काय?‘‘ या माझ्या प्रश्नालाही त्यांनी ‘होकार‘ दिल्यावर मी उडालोच. देशपांडे हे आडनाव, कराड हे गाव, बांधकाम खात्यातील अधिकारी हे सर्व माझ्या मनाचे खेळ होते आणि ते खरे ठरत आहेत हे पाहून मी अवाक - दिग्मूढ का काय म्हणतात तसा झालो होतो.
एवढ्यात महाबळेश्वर आल्याने गाडी चहा-भोजनासाठी थांबली. देशपांडेंनी रॅकवरची बॅग काढली. ते येथे उतरणार होते. देशपांडे उतरता उतरता म्हणाले, ‘‘डॉक्टर, थॅक्स फॉर कंपनी. चला, चहा घेऊया!‘‘ चहा घेता घेता देशपांडे म्हणाले, ‘‘माझं नाव देशपांडे नाही, नाही माझं गाव कराड! मलाही तुमच्यासारखं गप्पा मारायला आवडतं. म्हणून तुम्ही मला देशपांडे ऐवजी कुलकर्णी, पाटील असं काहीही म्हणाला असतात तरी मी होच म्हटलं असतं. अच्छा! भेटूया पुन्हा योग आल्यावर! ‘‘
डॉ. मधुकर घारपूरे

विशेष बातम्या *
विलास दळवी यांचा सत्कार
राज्य शासनाच्या ग्रामस्वच्छता अभियानात परबवाडा गावात अध्यक्षपदाची जबाबदारी पेलून परबवाडा गावाला स्वच्छता पुरस्कार मिळवून देणारे तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेस लोगो तयार करुन देणारे परबवाडा येथील विलास दळवी यांचा खासदार निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री.दळवी यांनी जिल्हा विकास यंत्रणेच्या ‘सिधु‘ ब्रॅन्डसाठी उत्कृष्ट लोगो तयार केल्याबद्दल केंद्रीय कृषीमंत्री एम.के.अण्णा पाटील यांच्या हस्ते तसेच ग्रामस्वच्छता अभियानात परबवाडा गावचे अध्यक्ष असतांना पुरस्कार मिळाला त्यावेळी नारायण राणे यांच्या हस्ते, मंत्री विनय कोरे यांनीही सत्कार केला होता. परबवाडा शाळा क्रमांक १ला स्वच्छता अभियान अंतर्गत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कोकण विभागात मिळाला होता. त्यावेळी विलास दळवी ग्रामस्वच्छता अभियान समितीचे अध्यक्ष होते. अलिकडेच राष्ट्रीय काँग्रेसने आयोजित केलेल्या गणेश सजावट व गणेशमूर्ती स्पर्धेत परिक्षक म्हणून श्री. दळवी यांनी काम केले होते.

परबवाडा शाळेला लाखाची देणगी
परबवाडा शाळा नं.१ साठी लोकवर्गणीतून सभागृह बांधावयाचे आहे. त्याकरिता परबवाडा येथील दानशूर ग्रामस्थ श्री. लक्ष्मीकांत परब यांनी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्याध्यापिका सौ. रेश्मा पिगुळकर यांचेकडे सुपूर्द केला आहे. याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीतर्फे लक्ष्मीकांत यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार मुख्याध्यापकांनी सत्कार केला. यावेळी सरपंच इनासीन फर्नांडीस, पं.स.सदस्य सरिका काळसेकर, सदस्य रविद्र परब, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांचे निधन
कोकणातील सहकार महर्षी म्हणून मान्यता पावलेले सिधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष शिवराम भाऊ जाधव यांचे २ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. लौकिक अर्थाने ते काँग्रेस - राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वावरले तरी सहकार क्षेत्रात त्यांनी कधी राजकारण आणले नाही. सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना बरोबर घेऊनच त्यांनी सिधुदुर्ग जिल्ह्यात अगदी खेडोपाडीही सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले आणि कोकणात सहकार रुजत नाही हे टीकाकारांचे म्हणणे खोटे पाडले.
पूर्वीच्या अखंड रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेचे ते सदस्य होतेच. त्यानंतर सिधुदुर्ग जिल्हा निर्माण झाल्यावर त्यांनी सिधुदुर्ग जिल्हा बँकेचे समर्थपणे नेतृत्व केले. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवरही जिल्ह्याचे नेतृत्व करीत बँकेचे उपाध्यक्ष तसेच अध्यक्षपदही भुषविले.
शिक्षण क्षेत्रातही शिवरामभाऊंनी अनेक माध्यमिक शाळा स्थापन केल्या आणि शैक्षणिक कार्याला त्यांची मदत व सहकार्य लाभत असे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी सर्वोदय चळवळीत काम केले. तसेच विनोबाजींच्या भूदान चळवळीतही त्यांनी काम केले होते. राजकारणात ते शरद पवारांचे नेतृत्व मानी असत. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती.
शिवराम भाऊ अलिकडे मधुमेहाने त्रस्त होते. त्यांची हृदय शस्त्रक्रिया झाली होती. तसेच दोन्ही पायही काढावे लागले होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना गोवा येथील बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची २ नोव्हेंबरच्या पहाटे प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगी, जावई व बंधू असा परिवार आहे. ३ नोव्हेंबरला माणगांव येथे त्यांचे पार्थिव दर्शनार्थ ठेवण्यात आले होते. समाजाच्या सर्व क्षेत्रातील तसेच सर्व राजकीय पक्षांच्या नेत्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. महादेवाचे केरवडे या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.